बंगळुरू : इन्फोसिस (Infosys) सारखी मोठी आयटी कंपनी (IT Company) आणि प्रचंड पैसा असतानाही साध्या राहणीमानाने जगणारे नारायण मूर्ती (Narayan Murthy) काही दिवसांपूर्वी त्यांच्या एका वक्तव्यामुळे चर्चेत आले होते. ‘तरुणांनी दर आठवड्याला ७० तास काम केले पाहिजे, तर देशाची कार्य उत्पादकता वाढेल’ असं ते म्हणाले. परंतु त्यांचे हे विधान अनेकांना रुचले नव्हते. त्यावर झालेल्या टीकेनंतर आता नारायण मूर्ती पुन्हा एकदा एका नव्या वक्तव्यामुळे चर्चेत आले आहेत.
नारायण मूर्ती बंगळुरू येथील टेक समिट २०२३ (Tech Summit 2023) कार्यक्रमात बोलत होते. यात त्यांनी निवडणुकीत राजकीय पक्षांनी मोफत सुविधा (Subsidies) देण्याच्या आश्वासनांवर भाष्य केले. नारायण मूर्ती म्हणाले की, काहीही विनामूल्य देऊ नये. सरकारकडून देण्यात येणाऱ्या सेवा आणि अनुदानाचा लाभ घेणाऱ्या लोकांनी समाजाच्या भल्यासाठी हातभार लावावा, अशी सूचनाही त्यांनी केली. भारतासारख्या गरीब देशाला समृद्ध राष्ट्र बनवण्यासाठी उदारमतवादी भांडवलशाही हा एकमेव उपाय असल्याचे मूर्ती यांनी सांगितले.
उदाहरण देताना ते म्हणाले की, मोफत वीज देणार असं जर सरकार म्हणत असेल तर ही खूप चांगली गोष्ट आहे. पण त्यांनी हेही सांगायला हवे की जर प्राथमिक आणि माध्यमिक शाळांमधील विद्यार्थ्यांची उपस्थिती २० टक्क्यांपर्यंत पोहोचली तर आम्ही तुम्हाला या सुविधा देऊ.
पुढे ते म्हणाले, मी मोफत सेवा देण्याच्या विरोधात नाही, कारण मी देखील एकेकाळी गरीब पार्श्वभूमीतून आलो होतो. परंतु मला वाटते की मोफत सुविधांचा लाभ घेत असलेल्या लोकांकडून आपण त्या बदल्यात काहीतरी अपेक्षा केली पाहिजे. त्यांच्या स्वतःच्या भावी पिढ्यांच्या कल्याणासाठी त्यांनी काहीतरी योगदान दिले पाहिजे, असं वक्तव्य नारायण मूर्ती यांनी केलं आहे.