
नवी दिल्ली: टीम इंडिया सध्या ऑस्ट्रेलियाविरुद्ध ५ सामन्यांची टी-२० मालिका खेळत आहे. या मालिकेसाठी संघातील वरिष्ठ खेळाडू तसेच कोच राहुल द्रविड(rahul dravid) यांना आराम देण्यात आला आहे. द्रविड यांचा कार्यकाळ विश्वचषक २०२३ नंतर संपला आहे. विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात टीम इंडियाला ऑस्ट्रेलियाकडून पराभव पत्करावा लागला होता. आता अशी बातमी येत आहे की बीसीसीआयने(bcci) द्रविडला पुन्हा कोच म्हणून ऑफर दिली आहे.
जर राहुलने ही ऑफर स्वीकारली तर त्यांचा कार्यकाळ वाढवला जाऊ शकतो. पुढील महिन्यात टीम इंडियाला दक्षिण आफ्रिकेचा दौरा करायचा आहे. या दौऱ्यात संघाला ३टी-२०, ३ वनडे आणि २ कसोटी सामने खेळायचे आहेत. जून २०२४मध्ये टी-२० वर्ल्डकपही होणार आहे.
माजी भारतीय कर्णधार राहुल द्रविडला टी-२० वर्ल्डकप २०२१नंतर रवी शास्त्री यांच्यानंतर टीम इंडियाचा कोच बनवण्यात आले होते. त्यांच्या कार्यकाळात टीम इंडियाने वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप आणि वनडे वर्ल्डकपच्या फायनलमध्ये स्थान मिळवले होते. दोन्ही स्पर्धांच्या अंतिम सामन्यात भारताला हार पत्करावी लागली.
गेल्याच आठवड्यात बीसीसीआयने राहुल द्रविडशी प्रशिक्षक म्हणून कार्यकाल वाढवण्याबद्दल चर्चा केल्याची माहिती आहे. दरम्यान, त्यांच्याकडून अद्याप उत्तर आलेले नाही. ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळवल्या जात असलेल्या मालिकेबाबत बोलायचे झाल्यास प्रशिक्षकाची जबाबदारी व्हीव्हीएस लक्ष्मणला देण्यात आली आहे.
१० डिसेंबरपासून दक्षिण आफ्रिका दौरा
मिळालेल्या माहितीनुसार बीसीसीआय पुन्हा एकदा राहुल द्रविड यांना कोच बनवण्याच्या तयारीत आहे. याचे मोठे कारण गेल्या २ वर्षात त्यांनी जे स्ट्रक्चर बनवले ते कायम राखणे होय. नवा कोच आल्यानंतर गोष्टी बदलू शकतात. जर द्रविड यांनी बीसीसीआयचा प्रस्ताव स्वीकारला तर त्यांच्या दुसऱ्या कार्यकालात पहिला दौरा दक्षिण आफ्रिकेचा असेला. टीम इंडिया १० डिसेंबरपासून दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर आहे.
या ठिकाणी टी-२० मालिका खेळणार आहे. त्यानंतर ३ वनडे सामने होतील. यानंतर दोन कसोटी सामने रंगतील. यानंतर मायदेशात टीम इंडिया इंग्लंडविरुद्ध पाच सामन्यांची टी-२० मालिका खेळणार आहे. दरम्यान, आतापर्यंत भारतीय संघ दक्षिण आफ्रिकेच कसोटी मालिका जिंकलेला नाही त्यामुळे हा दौरा खेळाडूंसोबत प्रशिक्षकासाठीही महत्त्वाचा असेल.