पुणे : राज्यातील अनेक भागाला रविवारी अवकाळी (Unseasonal Rain) पावसाने जोरदार तडाखा दिला. अनेक भागात गारपीट झाली आहे. त्यामुळे पिके व फळबागांचे मोठे नुकसान झाले आहे. पुणे, नाशिक, नगर, सातारा या जिल्ह्यांना अवकाळी आणि गारपीटीचा फटका बसला. उभे पिक नजरेसमोर उद्धस्त झाल्यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे.
हवामाने विभागाने राज्यातील काही भागात मुसळधार पावसाबरोबर गारपिटीचा अंदाज दिला होता. रविवारी दुपारनंतर जोरदार अवकाळी पावसाला सुरुवात झाली. अनेक भागात जोरदार पाऊस कोसळला. पावसाबरोबर गारपीटही झाली. त्यामुळे भाजीपाला, फळबागा व सध्या लावलेल्या रब्बी पिकांचे मोठे नुकसान झाले.
नाशिकमध्ये द्राक्ष बागांना फटका
नाशिकमधील चांदवड, निफाड, येवला, सिन्नर या तालुक्यांना गारपिटीचा मोठा फटका बसला. द्राक्ष, डाळिंब, पपई, केळी पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. काढणीला आलेल्या द्राक्षांचा बागांचे मोठे नुकसान झाले आहे.
रविवारी नगर शहरासह पारनेरमध्ये जोरदार पावसाने हजेरी लावली. पारनेरमध्ये तर जोरदार गारपीट झाल्याने शेतकऱ्यांच्या शेतातील उभी पिकं जमीनदोस्त झाली आहेत. यामुळे बळी राजा अवकाळी पावसामुळे मोठा संकटात सापडला आहे. नगर शहरात देखील रात्रीच्या सुमारास जोरदार पावसाने हजेरी लावली.
यंदा कमी पाऊस पडला आहे. पिके घेता न आल्याने बळीराजा चिंताग्रस्त होता. दरम्यान पुन्हा एकदा अवकाळी पावसाने हजेरी लावत शेतामधील झालेली पिके व गारपिटीने पुन्हा एकदा जमीनदोस्त झाली आहेत.
शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेले पीकं वाया गेल्यानं शेतकरी चिंतेत आहे. वादळी पावसासह आलेल्या गारपिटीने बळीराजाच्या डोळ्यात पाणी आणलं. दरम्यान, थंडीच्या मोसमात पाऊस सुरू झाल्यानं हंगामी पिकांवर रोग पडण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
नंदुरबारमध्ये मिरची खरेदी करणाऱ्या व्यापाऱ्यांना अवकाळी पावसाचा सर्वाधिक फटका बसला आहे. शेतकऱ्यांकडून व्यापाऱ्यांनी खरेदी केलेली सुमारे २० ते २५ हजार क्विंटल मिरची पाण्यात भिजली आहे. त्यामुळे ३० टक्के मिरची खराब होण्याची शक्यता आहे. २ ते ३ कोटींचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.
नाशिक जिल्ह्यातील चांदवड, निफाड, येवला, सिन्नर आणि धुळे जिल्ह्यातील साक्री तालुक्यात गारपीट झाली. नाशिक जिल्ह्यात गारपिटीमुळे दोन जनावरांचा मृत्यू झाला. सुरगाणा तालुक्यातील फणस पाडा येथील शेतकरी बनशे पवार यांचा बैल आणि इगतपुरी तालुक्यातील घोटी येथील शंकर निसरड यांचा अवकाळी पावसामुळं गोठा कोसळल्याने म्हैस मृत्यूमुखी पडली.