भारतात झालेल्या दहशतवादी हल्ल्यांमधील अनेक हल्ले मुंबईवर झाले आहेत. या हल्ल्यातील बरेचसे दहशतवादी हवा भरलेल्या तराफ्यावजा बोटींवरून समुद्रमार्गे शहरात आले. या बोटी समुद्रात उभ्या केलेल्या मोठ्या जहाजावरून सोडण्यात आल्या होत्या.
२६ नोव्हेंबर रोजी रात्री ८:१० वाजता अशाच एका बोटीतून आठ तरुण कफ परेडच्या मच्छीमार नगरजवळ आले होते. आठ पैकी सहाजण भारी बॅगा घेउन उतरले तर उरलेले दोघे बोटीतून किनाऱ्यालगत पुढे गेले. स्थानिक कोळ्यांनी या सहाजणांची चौकशी केली असता त्यांनी स्वतः विद्यार्थी असल्याचे भासवले. ८:२० वाजता याच प्रकारे इतर दहा व्यक्ती अशाच बोटींतून कुलाब्यात उतरल्या. उर्दू बोलणाऱ्या या लोकांना विचारले असता तुम्ही आपले काम करा असे गुरकावून ते दोन गट करून निघून गेले. कोळ्यांनी याची पोलिसांत बातमी दिली असता त्याकडे फारसे लक्ष दिले गेले नाही.
२६ नोव्हेंबर ला रात्री ९:२० वाजता हल्ला सुरू झाला. ए.के. ४७ असॉल्ट रायफली घेउन दोन दहशतवादी छत्रपती शिवाजी टर्मिनसच्या प्रवासी कक्षात घुसले आणि तेथे गोळ्या चालवून त्यांनी हातबॉम्ब फेकले. यात कमीतकमी दहा व्यक्ती ठार झाल्या.याच सुमारास इतर दोघांनी ताज होटेलमध्ये सात परदेशी नागरिकांसह १५ जणांना ओलिस घेतले. रात्री अकरा वाजता महाराष्ट्र पोलीस मुख्याधिकाऱ्यांचा हवाला देऊन सी.एन.एन.ने अहवाल दिला की ताज होटेलमधील परिस्थिती निवळली आहे आणि सगळ्या ओलिसांना सोडविण्यात आले आहे, पण नंतर उघड झाले की होटेलमध्ये अजूनही ओलिस होतेच. इकडे ओबेरॉय ट्रायडेंट होटेलमध्ये इतर काही दहशतवाद्यांनी ४० ओलिस धरले. यावेळी ताज व ओबेरॉय मिळून सहा बॉम्बस्फोट झाल्याची बातमी होती. २८ला पहाटे ४:२२ला ताजमहाल होटेल पुन्हा पोलिसांच्या नियंत्रणात आल्याची बातमी आली. यावेळी कमांडोंनी दोन दहशतवाद्यांना ओबेरॉय होटेलमध्ये ठार मारून इमारतीचा ताबा घेतला.
या वेळी दोन्ही होटेलना आगी लागलेल्या होत्या व लष्कर व रॅपिड ऍक्शन फोर्सच्या सैनिकांनी त्यांना वेढा घातलेला होता. सुमारे ४०० लश्करी कमांडो आणि ३०० एन.एस.जी. कमांडो तसेच ३५-१०० मार्कोस कमांडो घटनास्थळी पाठविण्यात आले होते. या शिवाय नेपियन सी रोड आणि व्हिले पार्ले येथे दोन बॉम्ब स्फोट झाले.
या हल्ल्यांमध्ये कमीतकमी १९७ व्यक्ती ठार झाल्या. तर २९३ जण जखमी झाले आहेत. यांत १२१ भारतीय नागरिक, १७ सुरक्षा कर्मचारी आणि ३४ परदेशी नागरिक आहेत. परदेशी नागरिकांपैकी चार ऑस्ट्रेलियन, चार अमेरिकन, तीन केनेडियन, तीन जर्मन, दोन इस्रायली-अमेरिकन, दोन इस्रायली, दोन फ्रेंच तर प्रत्येकी एक ब्रिटिश-सायप्रॉइट, चिनी, इटालियन, जपानी, जॉर्डनी, मलेशियन, मॉरिशयन, मेक्सिकन, सिंगापूरी, थाई आणि मेक्सिकन आहेत. इतर सांख्यिकी उजवीकडे दिलेली आहे.
धारातीर्थी पडलेल्या प्रमुख व्यक्ती:
- तुकाराम ओंबळे – सहाय्यक उपनिरिक्षक, मुंबई पोलिस. यांनीच कसाबवर झडप घालून पकडून ठेवले व स्वतःचे प्राण गमावले.
- हेमंत करकरे – मुंबई दहशतवाद विरोधी पथक मुख्याधिकारी
- अशोक कामटे – ऍडिशनल पोलीस कमिशनर
- विजय साळसकर – एनकाउंटर स्पेशालिस्ट
- शशांक शिंदे – वरिष्ठ पोलीस निरिक्षक
- मेजर संदीप उन्नीकृष्णन – एन.एस.जी. कमांडो अधिकारी
- हवालदार चंदर – एन.एस.जी. कमांडो
- हवालदार गजेंदर सिंह बिष्ट – एन.एस.जी. कमांडो
- छत्रपती शिवाजी टर्मिनस येथे तीन रेल्वे कर्मचारी गोळीबाराला बळी पडले.