
कल्याण : कल्याण, डोंबिवली, टिटवाळा, वडवली, आंबिवली, शहाड, अटाळी आदी परिसराला पाणीपुरवठा करणा-या महानगरपालिकेच्या जलशुध्दीकरण केंद्रांमध्ये दुरुस्तीची कामे करण्यात येणार आहेत. यामुळे कल्याण डोंबिवली क्षेत्रात मंगळवारी पाणी येणार नाही.
कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या बारावे जलशुध्दीकरण केंद्र, नेतिवली जलशुध्दीकरण केंद्र व मोहिली जलशुध्दीकरण केंद्र येथील विद्युत व यांत्रिकी उपकरणांची देखभाल व दुरुस्तीची कामे करण्याकरिता मंगळवार दि. २८ नोव्हेंबर रोजी सकाळी ९ ते रात्री ९ वाजेपर्यंत महानगरपालिकेच्या बारावे, नेतिवली, व मोहिली जलशुध्दीकरण केंद्रातून कल्याण (पूर्व व पश्चिम), डोंबिवली (पूर्व व पश्चिम), व कल्याण ग्रामिण विभाग (टिटवाळा, वडवली, आंबिवली, शहाड, अटाळी सह ग्रामिण विभागातील इतर गावे) या भागात होणारा पाणी पुरवठा बंद राहणार आहे.
तरी या परिसरातील नागरिकांनी पाण्याचा साठा करुन महापालिकेस सहकार्य करावे, असे आवाहन यांत्रिकी विभागाचे कार्यकारी अभियंता राजू राठोड यांनी केले आहे.