Monday, July 1, 2024
Homeसाप्ताहिकश्रध्दा-संस्कृतीGondavlekar Maharaj : भगवंत कल्पनेच्या पलीकडे...

Gondavlekar Maharaj : भगवंत कल्पनेच्या पलीकडे…

  • अध्यात्म : ब्रह्मचैतन्य श्री गोंदवलेकर महाराज

मनुष्याचा स्वभावच असा असतो की, आपल्या कल्पनेत जेवढे येते तेवढेच आपण सत्य मानतो. पण आपली कल्पनाच किती संकुचित असते, याचा कोणी विचार करीत नाही. जो कल्पनेच्या पलीकडे आहे, जिथे कल्पना थांबते, ज्याला कल्पना बांधू शकत नाही, त्याला कल्पनेने कसे ओळखता येईल? जो ज्ञानाच्या पलीकडे राहिला आहे त्याला माझ्या तोकड्या ज्ञानाने कसे अजमावता येणार? माझ्या बुद्धीच्या पलीकडे तो आहे. तेव्हा त्याच्या इच्छेनेच त्याचे खरे ज्ञान होणार आहे. अविद्या ती हीच की, आपल्या कल्पनेने होणारे ज्ञान हेच खरे मानणे. याकरिता श्रद्धा आणि कल्पना यांतला फरक ओळखावा. खरी श्रद्धा तीच की जी कल्पनेच्या पलीकडे राहते. प्रल्हादाइतके आपण नामाला सत्यत्व देत नाही. कल्पनेची मजल प्रल्हादाने नाही चालविली. कल्पनेच्याही पलीकडच्या गोष्टी जर आपल्या य:कश्चित् संसारातसुद्धा घडतात, तर भगवंत त्या कल्पनेच्या पलीकडे राहिला असे मानायला काय हरकत आहे?

सूर्यप्रकाश जसा सर्व ठिकाणी भरलेला असतो, त्याप्रमाणे देवळात, घरात, तीर्थक्षेत्रांत, सर्व ठिकाणी परमात्मा भरलेला आहे. परमात्मा फक्त विद्वानांचा किंवा श्रीमंतांचा नसून तो सर्वांचा आहे. भगवंत सर्वांचा आहे, म्हणूनच सर्वांना तो सुसाध्य असला पाहिजे. एखादा मोठा गणिती हिशेब लवकर करू शकतो; परंतु खेडेगावातले अडाणी लोक गणित न शिकताही हिशेब बरोबर करतात, आणि त्यांचा व्यवहार बरोबर चालतो. तसे विद्वानाला कदाचित् भगवंत लवकर प्राप्त होईल, पण अडाणी माणसालादेखील तो प्राप्त होऊ शकेलच. भगवंताची दृष्टीच अशी आहे की, त्याला आपले अंत:करण स्पष्ट दिसते. ते जसे असेल त्याप्रमाणे भगवंत आपल्याला जवळ किंवा दूर करतो. मनुष्य जन्माला आला की सगळी नाती त्याला आपोआप येतात, त्याचप्रमाणे, परमात्मा आनंदरूप आहे असे म्हटले की बाकीचे सर्व गुण त्यामध्ये आले असे समजावे. जसा मारुतीमध्ये देवअंश होता तसाच तो आपल्यामध्येही आहे. त्याने तो फुलविला. पण आपण झाकून तो विझवून टाकला, याला काय करावे? मामलेदाराला बरोबर असलेल्या शिपायाची भीती वाटत नाही, चोराला मात्र त्याच्याबरोबर असलेल्या शिपायाची भीती वाटते. त्याचप्रमाणे भगवंत आपल्या पाठीमागे आहे ही जाणीव ज्याला असते, त्याला उपाधीची भीती वाटत नाही, कारण ती त्याच्याच इच्छेने आली आहे, अशी त्याची खात्री असते. आपण आपले मागले घडलेले सर्व भगवंताला अर्पण करावे, मग पुढची जबाबदारी त्याच्यावर पडते. जे निश्चित नाही त्याचे नाव कल्पना होय. देव आहे असे निःशंकपणाने वाटणे, हे ज्ञान होय.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -