कारागृहाच्या सुरक्षेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह
पुणे : मागील काही दिवसांत पुण्याच्या येरवडा कारागृहातून (Yerwada Jail Pune) कैदी पसार होण्याच्या घटना वारंवार घडत आहेत. अशीच एक धक्कादायक घटना पुन्हा एकदा घडली आहे. एका खुनाच्या आरोपाखाली पुण्याच्या येरवडा तुरुंगात शिक्षा भोगत असलेला कुख्यात गुंड आशिष जाधव (Aashish Jadhav) हा पळून गेला आहे. पोलिसांच्या हातावर तुरी देऊन तो तुरुंगातून पळून गेल्याने एकच खळबळ उडाली आहे. यामुळे पोलिसांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात आहे.
काल दुपारच्या सुमारास कारागृहातील कैद्यांची तुरुंग अधिकाऱ्यांनी मोजणी केली. त्यावेळेस अशिष जाधव हा कारागृहातील अधिकाऱ्यांना आढळून आला नाही. त्यामुळे जाधव फरार झाल्याचं लक्षात आलं. राज्यातील सर्वात संवेदनशील आणि कडक सुरक्षेसाठी ओळखल्या जाणाऱ्या येरवडा करागृहातूनच तो पळाल्याने कारागृहाच्या सुरक्षेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात आहे.
आशिष जाधव हा वारजे माळवाडी पोलीस स्टेशनच्या हद्दीतील एका खुनाच्या गुन्ह्यात २००८ पासून येरवडा कारागृहात शिक्षा भोगत होता. जाधवला येरवडा कारागृहातील रेशन विभागात काम देण्यात आलं होतं. त्याच दरम्यान तो पळून गेला असावा असा पोलिसांना संशय आहे. सध्या या प्रकरणी अधिक तपास सुरु आहे.