मुंबईत कचरा जाळण्यास बंदी! प्रदूषण मुक्त मुंबईसाठी मनपा सज्ज
मुंबई : मुंबई प्रदूषण (Mumbai Pollution) मुक्त करण्यासाठी मुंबई महापालिका सज्ज झाली असून प्रदूषण नियंत्रणासाठी पालिकेने आता कठोर पावले उचलण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार, आता कुणी कचरा जाळताना आढळल्यास याची थेट ऑनलाईन तक्रार करता येणार आहे. यासाठी ‘मुख्यमंत्री स्वच्छ मुंबई हेल्पलाईन क्रमांक ८१६९६ ८१६९७ सुरू करण्यात आला आहे. या मदत सेवा क्रमांकावर तक्रार नोंदवावी, असे आवाहन पालिका प्रशासनाने केले आहे. सोबत छायाचित्र जोडावे, असेही आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.
महानगर क्षेत्रातील धूळ नियंत्रण आणि वायुप्रदूषण नियंत्रित करण्यासाठी पालिका प्रशासनाकडून निरनिराळ्या उपाययोजना राबवण्यात येत आहेत. तसेच नियमांचे उल्लंघन करणाऱ्यावर कारवाई केली जाणार आहे.
महाराष्ट्र शासनाच्या पर्यावरण व वातावरणीय बदल विभाग यांच्यामार्फत २६ ऑक्टोबर रोजी वायुप्रदूषण नियंत्रणासाठी काढलेल्या चार हजार ८२ ऑनलाईन सोडतीतील पात्र मार्गदर्शक तत्त्वे जारी करण्यात आली. आता उघड्यावर कचरा जाळून प्रदूषण करणाऱ्यांची गय केली जाणार नाही, असा स्पष्ट इशारा पालिका घनकचरा व्यवस्थापन विभागाने दिला आहे. उपायुक्त (घनकचरा व्यवस्थापन) चंदा जाधव म्हणाल्या की, मुंबई महानगर व परिसरात वायुप्रदूषणाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता सर्व नागरिकांनी वायुप्रदूषण रोखण्याच्या दृष्टीने प्रशासनास सहकार्य करावे. कचरा जाळताना कोणी आढळल्यास त्याची तक्रार ताबडतोब नोंदवावी. सोबत छायाचित्र जोडावे, असे आवाहन केले आहे.