पवार कुटुंबाच्या एकत्रित दिवाळी साजरी करण्यावर शरद पवारांचं मोठं वक्तव्य
पुणे : राज्यात राजकारणात मोठमोठ्या घडामोडी घडवून आणणारे पवार कुटुंबिय (Pawar family) चार महिन्यांपूर्वी दोन गटांत विभागले गेले. अजित पवार (Ajit Pawar) सत्तेत सामील होत उपमुख्यमंत्री झाले तर शरद पवार (Sharad Pawar) यांनी सरकारच्या विरोधी भूमिका कायम ठेवली. यामुळे दोन्ही गटांत प्रचंड वाद प्रतिवाद झाले. राष्ट्रवादी पक्ष, चिन्ह नेमका कोणाचं, अध्यक्ष कोण इतका हा वाद शिगेला पोहोचला. सध्या यासंबंधी कोर्टास केस सुरु आहे. त्यामुळे प्रत्येक दिवाळी एकत्र साजरं करणारं पवार कुटुंबिय यंदाची दिवाळी (Diwali Festival) एकत्र साजरी करणार का हा मोठा प्रश्नच सगळ्यांना पडला होता. त्यानुसार सणासुदीला एकत्र यायचं ठरवत या कुटुंबाने काल एकत्र दिवाळीचा सण साजरा केला.
डेंग्यूची लागण झाल्याने अजित पवार गेले काही दिवस कोणत्याही सांस्कृतिक अथवा सामाजिक कार्यक्रमात सहभागी झाले नाहीत. अनेक सभांना देखील जाणं त्यांना शक्य झालं नाही. पण काल दिवाळीच्या पहिल्या दिवशी मात्र आपल्या कुटुंबासमवेत वेळ घालवणं अजित पवारांनी पसंत केलं. एकमेकांविषयी टीका करणारे पवार कुटुंबिय काल सणानिमित्त बाणेरमध्ये प्रतापराव पवारांच्या निवासस्थानी जमले होते. यावेळी शरद पवार, अजित पवार, सुप्रिया सुळे (Supriya Sule) हे तिघेही उपस्थित होते.
‘माणसाच्या आयुष्यात चढ उतार असतात, अडचणी असतात वेळप्रसंगी अडचणींना तोंड द्यावे लागते पण काही दिवस संकटांचे विस्मरण करून कुटुंबासमवेत दिवस घालवावे लागतात’, असं मोठं वक्तव्य यावेळी शरद पवारांनी केलं. यानंतर मात्र अजितदादांनी थेट दिल्लीची वाट धरली आहे. यामुळे आता यंदाच्या दिवाळीत नेमके काय राजकीय फटाके फुटणार याची चर्चा रंगू लागली आहे.