Dnyaneshwari : असा हवा एक चष्मा…


  • ज्ञानेश्वरी : प्रा. मनीषा रत्नाकर रावराणे


चष्मा घातला की सारी सृष्टी लख्ख दिसू लागते. अगदी तसेच माऊलींची ‘ज्ञानेश्वरी’ हा देखील एक चष्मा आहे. तो आपल्या डोळ्यांवर चढला की, आपल्यासह सारं जग नीट दिसायला लागतं, कळायला लागतं, जाणवायला लागतं. काही गोष्टी आपल्याला माहीत असतात, पण त्या कळत नाहीत. कळल्या तरी ‘वळत नाहीत’ हे वळण देण्याचं काम माऊलींची ‘ज्ञानेश्वरी’ करते.


क साधासा प्रसंग, रोजच्या जगण्यातला! काही दिवसांपूर्वी लक्षात आलं की, मला धुसर दिसतं आहे. चष्मेवाल्याकडे गेले तेव्हा कळलं, काचेवर ओरखडे उमटले आहेत. मग डॉक्टरांनी डोळे तपासले, तर क्रमांक वाढलेला. त्याप्रमाणे चष्मा बनवून घेतला. मग सारी सृष्टी लख्ख दिसू लागली. छोट्या, मोठ्या गोष्टी स्पष्ट पाहताना किती आनंद!



हे सांगायचं कारण म्हणजे माऊलींची ‘ज्ञानेश्वरी’ हा देखील एक चष्मा आहे. तो आपल्या डोळ्यांवर चढला की, आपल्यासह सारं जग नीट दिसायला लागतं, कळायला लागतं, जाणवायला लागतं. काही गोष्टी आपल्याला माहीत असतात, पण त्या कळत नाहीत. कळल्या तरी ‘वळत नाहीत’ हे वळण देण्याचं काम माऊलींची ‘ज्ञानेश्वरी’ करते. आपण अनेकांकडून ऐकलं आहे, या जगात टिकाऊ काय आहे! शरीर, तारुण्य, पैसा, प्रसिद्धी, नातीगोती? हे काहीच नाही. पण तरीही आपल्याला या गोष्टींचा नको इतका मोह असतो. हा मोह दूर करण्याचं कार्य ‘माऊली’ करत आहेत… तब्बल सातशे पंचवीस वर्षं!



तेराव्या अध्यायात ज्ञानदेवांनी काय करावं, याचबरोबर काय करू नये हे सांगितलं आहे. आजच्या भाषेत बोलायचं, तर ‘Do’s & Don’t’ याविषयी आपण मागच्या लेखात बोललो. आज त्याचाच पुढील भाग पाहू या.



श्रीकृष्णांच्या तोंडून ज्ञानदेव बोलतात - “हे धनंजया, जो आपले घरदार, संपत्ती, देह व आपला सध्याचा जन्म याविषयी काहीसुद्धा विचार करीत नाही” (ओवी क्र. ७२८)



तर अशा माणसाविषयी बोलताना ज्ञानदेवांनी कोणते दाखले दिले आहेत!
‘द्वाड कुत्र्याचे कान आणि शेपूट कापून त्याला घरातून हाकून लावले, तरी ते रक्त गळत असताना जसे पुन्हा त्याच घरात शिरते’ (ओवी क्र. ७३०)



‘त्याप्रमाणे अंगात लूत भरून नऊ दार वाहत असतानाही ज्याच्या मनात आपली अशी स्थिती होण्याचे कारण काय याचा विचारसुद्धा येत नाही.’ (ओवी क्र. ७३२)



किती किळसवाणं चित्र आहे हे! मुद्दामून काढलेलं! माणूस म्हणून जन्माला आल्यावर आपलं ध्येय काय हे अज्ञानी समजत नाही. तो नको त्या गोष्टींच्या मागे लागतो, अगदी मरेपर्यंत! त्यात गुरफटतो. हे विषय, वासना यांच्यात अडकणं किती भयंकर आहे! याचं चित्र कुत्र्याच्या उदाहरणातून देतात, जणू आरसा धरतात. सर्वांना त्यापासून दूर होण्यासाठी ज्ञानदेव असं जागं करतात. त्यासाठी दाखल्यांची मालिकाच मांडतात.



त्यासाठी पुढे ओवी येते, “हे महाबाहो अर्जुना, तो (असा मनुष्य) अज्ञानरूप देशाचा राजा या म्हणण्यात काही शंका नाही.” (ओवी क्र. ७५३)



‘अज्ञानाचा राजा!’ एरवी राजा ही पदवी चांगली! पण इथे ती अज्ञानाच्या संदर्भात ते वापरतात. अशा उपरोधामुळे, तिरकस पद्धतीमुळे उपदेशाचा परिणाम खूप वाढतो. तो उपदेश श्रोत्यांच्या मनात अधिक नीटपणे पोहोचतो. ही ज्ञानदेवांची अलौकिक प्रज्ञा आणि प्रतिभा!



पर्वताच्या शिखरावरून धोंडा सुटल्यावर त्याला ज्याप्रमाणे आपलं पुढे काय होईल, हे माहीत नसते, त्याप्रमाणे जो आपल्याला वृद्धावस्था येऊन आपली काय स्थिती होईल याकडे लक्ष देत नाही. ती ओवी -
कडाडीं लोटला गाडा। कां शिखरौनि सुटला धोंडा॥
तैसा न देखे जो पुढां। वार्धक्य आहे॥ (ओवी क्र. ७५५)



किती प्रभावी पद्धतीने वर्णन, उपदेश केला आहे! हे वाचून आपण त्यासंबंधी विचारप्रवृत्त होणार नाही काय!



ही आहे ‘ज्ञानेश्वरी’तून मिळणारी अचूक दृष्टी - “सांगा कोण राहील मग दुःखी-कष्टी!”



(manisharaorane196@gmail.com)

Comments
Add Comment

भाग्यविधाता

सद्गुरु वामनराव पै, जीवन संगीत आपला जो विषय आहे, अंधारातून प्रकाशाकडे त्याचा सरळ अर्थ आहे. तो म्हणजे अज्ञानातून

जैमिनीमुनी (पूर्वार्ध)

डॉ. अनुराधा कुलकर्णी, भारतीय ऋषी …anuradh.klkrn@gmil.com फार पूर्वी सर्व वेदमंत्र एकत्रच होते. त्या सहस्त्रावधी मंत्रात काहीत

मोह

प्राची परचुरे-वैद्य, आत्मज्ञान भाणूस जन्माला आला की त्याचे आयुष्य सुरू होते ते अगदी मरेपर्यंत. त्या

गुरू : एक किल्ली मुक्तीची

ऋतुजा केळकर, ऋतुराज गुरू प्रकाशी ज्ञानदीप, शिष्य हृदयी उजळतो । संसारसागर पार करावा, श्रद्धा विश्वास आधारतो

अध्यात्मिक जागृतीचे प्रतीक... कुंकुमतिलक

अर्चना सरोदे, मानाचा गाभारा हिंदू धर्मात विविध प्रकारच्या रुढी, परंपरा पाळल्या जातात. हिंदू धर्मात कपाळावर

Ayodhya Ram Mandir : अयोध्येत 'रत्नजडित' रामाचे आगमन; १० फूट उंच, ३० कोटींची सुवर्णमूर्ती आणि तंजावर कलेचा अजोड संगम!

अयोध्या : रामजन्मभूमी अयोध्येत प्रभू श्रीरामाच्या भक्तीचा एक नवा अध्याय सुरू झाला आहे. कर्नाटकातील अज्ञात