Saturday, July 6, 2024
Homeताज्या घडामोडीगावातल्या तरुणीशी प्रेमसंबंध जीवावर बेतले!

गावातल्या तरुणीशी प्रेमसंबंध जीवावर बेतले!

गर्लफ्रेंडचे लग्न ठरल्याने तरुणाला स्फोटकांनी उडवले

उदयपूर : राजस्थानमधील उदयपूर जिल्ह्यातील ऋषभदेव पोलीस ठाणे हद्दीतल्या गावात एक धक्कादायक घटना घडली असून प्रेमासाठी बळी गेलेल्या त्या प्रेमवीराने आत्महत्या केली की त्याची हत्या करण्यात आली, याबाबत मोठा पेच निर्माण झाला आहे.

प्रेयसीचा विवाह दुसऱ्या तरुणाशी ठरल्याच्या वैफल्यग्रस्तेतून त्याने स्वत:ला शरीराला चक्क स्फोटके (Detonator) बांधून उडवून दिल्याचे पोलिसांनी म्हटले आहे. नीलेश मीणा (२४) असे या तरुणाचे नाव आहे. रविवारी (५ नोव्हेंबर) रात्री उशीरा ही घटना घडली.

तर तरुणाच्या कुटुंबीयांनी तरुणीच्या कुटुंबीयांविरोधात दिलेल्या तक्रारीवरुन पोलिसांनी भारतीय दंड संहिता कलम ३०२ (हत्या) अन्वये गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी घटनेची नोंद घेतली असून तपास सुरु केला आहे.

येथील प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, नीलेश मीणा (मृत) याचे गावातीलच एका तरुणीसोबत प्रेमसंबंध होते. त्याला तिच्यासोबत विवाह करण्याची तीव्र इच्छा होती. मात्र, दोघांचेही गोत्र एकच असल्याने कुटुंबीयांनी या लग्नाला विरोध केला. परिणामी तिचा विवाह दुसऱ्या ठिकाणी ठरवला. या घटनेमुळे प्रचंड निराश झालेल्या या तरुणाने स्वत:ला स्फोटकांनी उडवून दिले.

प्राथमिक माहितीमध्ये पुढे आले आहे की, नीलेश याने रविवारी दुपारीच कोठून तरी डेटोनेटर आणले होते. त्यानंतर त्याने रात्र होण्याची वाट पाहीली. त्यानंतर रात्रीच्या अंधारात तो घरापासून १०० मीटर अंतरावर दूर गेला. तिथे त्याने आपल्या शरीराला डेटोनेटर लावून स्वत:ला उडवून दिले. स्फोटकांचा आवाज ऐकून कुटुंबीय आणि परिसरातील लोक घटनास्थळी आले असता तरुणाचे शीर धडावेगळे झाल्याचे पाहायला मिळाले.

सदर घटनेमुळे तरुणाच्या कुटुंबीयांना प्रचंड धक्का बसला आहे. त्यांनी तरुणीच्या कुटुंबावर हत्येचा आरोप केला आहे. त्यांनी आरोप केला आहे की, तरुणीच्या कुटुंबीयांनीच त्याचे शीर धडावेगळे केले. नीलेश हा शेतकरी कुटुंबातून येतो. त्याचे घर शेतीवर आणि मोलमजुरीवर चालते. प्रत्यक्षदर्शींनी सांगितले की, त्याच्या शरीराचे तुकडे झाले होते. त्याचे डोकेही धडासोबत राहिले नव्हते. नीलेशच्या पश्चात आई, वडील, मोठा भाऊ आणि एक बहीण आहे.

पोलिसांमध्ये दिलेल्या तक्रारीत नीलेशचे वडील राजमल मीणा यांनी आरोप केला आहे की, रविवारी रात्री बारा वाजण्याच्या सुमारास काही लोक माझ्या मुलाला घरातुन बोलवून घेऊन गेले होते. त्यांनीच माझ्या मुलाचा गळा कापला आहे. मात्र कोणाला संशय येऊ नये म्हणून त्यांनी स्फोटके उडवून प्रकरणाला वेगळे वळण देण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र पोलीस योग्य तपास करतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -