Saturday, May 10, 2025

देशमहत्वाची बातमी

Bharat Atta: सणासुदीच्या दिवसांत महागाईपासून दिलासा, २७.५० रूपये प्रति किलो सरकार विकणार भारत ब्रँड पीठ

Bharat Atta: सणासुदीच्या दिवसांत महागाईपासून दिलासा, २७.५० रूपये प्रति किलो सरकार विकणार भारत ब्रँड पीठ

नवी दिल्ली: गव्हाच्या किंमतीमध्ये मोठी वाढ झाल्यानंतर पिठाच्या वाढलेल्या किंमती पाहून सरकारने सामान्य लोकांसाठी स्वस्त दरात पीठ उपलब्ध करण्याचा निर्णय घेतला आहे. याच दिशेने सरकारने एक पाऊल टाकले. सरकारने स्वस्त दरात पीठ विकण्याचा निर्णय घेतला आहे. २७.५० रूपये प्रति किलो दराने भारत आटा सरकार ग्राहकांना विकणार आहे.



सरकार विकणार स्वस्त दरात पीठ


भारत ब्रँड नावाने पीठ विकण्यासाठी केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांनी १०० मोबाईल व्हॅनला राजधानीच्या कर्तव्य पथावर हिरवा झेंडा दाखवत रवाना केले. भारत पीठ २७.५० रूपयांत विकले जाईल. या मोबाईल व्हॅनशिवाय भारत आटा केंद्रीय भंडारावरही उपलब्ध असेल. सोबतच सरकारच्या एजन्सी नेफेड आणि एसीसीएफमध्येही स्वस्त दरात पीठ उपलब्ध केले जाणार आहे.



२७.५० रूपये किलोने पीठ उपलब्ध


गव्हाच्या वाढत्या किंमती पाहता सरकारने २.५ लाख टन गहू २१.५० रूपये किलोच्या भावाने केंद्रीय भंडार, एनसीसीएफ आणि नाफेडसारख्या एजन्सीना ओपन मार्केट सेल स्कीम अंतर्गत उपलब्ध केले आहे. यात भारत आटा ब्रँड २७.५० रूपये किलो दराने ग्राहकांना स्वस्त दरात उपलब्ध करून दिला जाणार आहे.



वाढत्या किंमतीवर नियंत्रण


केंद्रीय मंत्री पियुष गोएल म्हणाले की सरकारने वेळीच दखल घेतल्याने अनेक महत्त्वाच्या गोष्टींवर नियंत्रण मिळवण्यात यश मिळाले आहे. याआधी सरकारने टोमॅटो आणि कांद्याच्या किंमतीवर नियंत्रण मिळवण्यासाठी अनेक पावले उचलली आहेत. सरकार आधीपासूनच ६० रूपये प्रति किलो दराने भारत डाळ ग्राहकांना विकत आहे.

Comments
Add Comment