Poems : काव्यरंग

जंगलातील थंडी


भल्या पहाटे
जंगलात पडली थंडी
सर्व पशुपक्ष्यांची
उडाली घाबरगुंडी

सर्वत्र पसरले
पांढरे दाट धुके
गारठलेला कुत्रा
जोरजोराने भुके

चिमणीची पिल्लं
खोप्यात बसली दडून
हरणाच्या अंगावरील शाल
कोल्ह्याने घेतली ओढून

हत्तीने घातला
उलनचा जाड कोट
बटण गेले तुटून
उघडे राहीले पोट

कुडकुडणाच्या माकडाने
घातली कानटोपी
जाडे भरडे पोते पांघरून
गाढव गेला झोपी

थंडीने केली
सर्वांची अशी दैना
उन्हाची वाट पाहे
राघू आणि मैना

खोकडून खोकलून
सिंह वैतागला जाम
गारठणाऱ्या थंडीत
सर्वांना फुटला घाम

- रवींद्र व्ही. चालीकवार, महागाव, जि. यवतमाळ


चेहरे...


माणसांचे चेहरे, इथे
‘मुखवट्यात’ जगताहेत,
स्वतःच्याच प्रतिबिंबाकडे
प्रश्नांकित बघताहेत! ...१

सरड्यासारखे घडी-घडिला
रंग नवे बदलताहेत,
सावली हरवून, स्वतःचे
अस्तित्व मात्र जपताहेत! ...२

कर्तृत्वाची कोरी पाटी
कोळशाने गिरवताहेत,
चारित्र्याला काळे फासून
सफेदित मिरवताहेत! ...३

विवेकाला टोपी घालून
जुनी कात टाकताहेत,
व्यभिचाराचं पोट फुगवून
उघडं पितळ झाकताहेत! ...४

कावळ्यासारखे खरकट्यावर
ताव मारीत ढेकरताहेत,
बेडकाच्या औलादीचे
बैलाएवढे फुगताहेत! ...५

हरिनामाचा टिळा लावून
टाळ-मृदंग कुटताहेत,
अभंगाचे शील-सत्व
लावणीसंगे लुटताहेत! ...६

लाज-शरम चुलीत घालून
लिंगपिसाट पेटताहेत,
वासनेचे कुल्ले थोपटीत
आपलं घोडं रेटताहेत! ...७

‘थुकी’ लावून कर्तव्याला
पोळी आपली शेकताहेत,
हात बांधून ढुंगणावरती
इमान आपले विकताहेत! ...८

बुडाखालच्या अंधारात
दिशाहीन भटकताहेत,
आणि अखेर ‘तोंड घेऊन’ एकदाचे
भिंतीवर जाऊन लटकताहेत! ...९
- पांडुपुत्र, कल्याण (पश्चिम), जि. ठाणे


नावडतीचं मीठ अळणी...


भेंडीची भाजी चिकट चिकट
मिरच्या खायला खूपच तिखट

कारल्याची भाजी कडूच कडू
कांद्याला पाहताच येतंय रडू

हिरवा चुका लागतोय आंबट
शेपू मेथीचं दाताला संकट

गाजर मुळे आणि बटाटा बीट
चवीला कुठे लागतात नीट

लेकरं धरतात पक्कीच गुळणी
नावडतीचं मीठच अळणी

सर्वच भाज्यांना ठेवतात नाव
केवळ मागतात बटर पावं
- भानुदास धोत्रे, परभणी

देव माझा शोधताना


राऊळाच्या पायरीचा देह तो उरणार आहे
मोहमाया लोभसारा कोणता सरणार आहे..

त्या तुक्याच्या सोबतीने देव माझा शोधताना
माणसाचा चेहराही आतला छळणार आहे..

या युगाचा हुंदका पण ओळखीच्या आसवांचा
काळजाचा घाव सारा शेवटी झरणार आहे

वेदनांचा गाव माझा आत माझ्या जागताना
ऐनवेळी जाणिवांचा पार तो रडणार आहे

मोक्ष देण्या पावलांना सावळ्या ये मायदारी
उंब-याचा कोंडमारा काय तो कळणार आहे...

- डॉ.पल्लवी परुळेकर-बनसोडे
Comments
Add Comment

भुकेलेल्यांना अन्न न दिल्यास...

महाभारतातील मोतीकण ; भालचंद्र ठोंबरे पद्म पुराणातील एका कथेनुसार, वनवासात असताना प्रभू श्रीराम एकदा अगस्ती

चिरतरुण...

संवाद ; गुरुनाथ तेंडुलकर अलीकडेच मी एक व्हिडीओ पुन्हा एकदा नव्याने पाहिला. जग‌द्विख्यात गायिका आशा भोसले

‘रूक जा रात, ठहर जा रे चंदा...’

नॉस्टॅल्जिया ; श्रीनिवास बेलसरे पूर्वी अनेक सिनेमा असे निघाले की त्यांनी प्रेक्षकांना ढसढसा रडवले होते. त्याची

धीर धरी...

आनंदी पालकत्व ; डाॅ. स्वाती गानू टीनएजर्स मुलांना संयम कसा शिकवाल? संयम हा एक चांगला गुण आहे, मात्र तो जन्मतःच

आत्मप्रतिष्ठेचं भान

स्मृतिपटल; अनिल तोरणे कोणत्याही गोष्टीचा कैफ प्रमाणाबाहेर चढणे केव्हाही अनिष्टच ठरते. गतकाळातील एका

सुरक्षित उत्पादने, आश्वस्त ग्राहक

ग्राहक दिन ; स्नेहल नाडकर्णी माणसाचं समाधान वाढण्याऐवजी अपेक्षा वाढतात तेव्हा तो अधिक भौतिक सुखं मिळवण्याच्या