- कोकणी बाणा : सतीश पाटणकर
देवीचे स्वयंभू मूर्तिस्थान अडीच फूट उंच आहे. देवीच्या हातात शंख, चक्र, ढाल व तलवार आहे. पूर्वाभिमुख असलेली देवी महिषासुरावर आरूढ झालेली आहे. वर्षातून दोन वेळा एक नवरात्रोत्सव आणि दुसरा शिमगोत्सवाला देवीचे उत्सव होतात. सर्व ग्रामस्थ हिरीरीने उत्सवात भाग घेतात.
रत्नागिरी शहरापासून अवघ्या २-३ कि.मी.वर असणारा रत्नदुर्ग हा पर्यटकांसाठी मुख्य आकर्षणाचा विषय ठरला आहे तो त्यावरील अत्यंत सुंदर भगवती मंदिरामुळे, येथून दिसणाऱ्या समुद्राच्या विहंगम दृश्यामुळे आणि समुद्रापर्यंत जाणाऱ्या किल्ल्यातील भुयारी मार्गामुळे. रत्नदुर्ग रत्नागिरी शहराच्या अत्यंत जवळ असून अरबी समुद्राच्या काठावरील डोंगरावर बांधण्यात आला आहे. किल्ल्याचा आकार घोड्याच्या नालासारखा असून क्षेत्रफळ १२० एकर आहे. रत्नदुर्ग तीनही बाजूंनी समुद्राने वेढलेला असून याच्या आग्रेय दिशेला जमीन आहे. किल्ल्याच्या पायथ्याशीच मिरकरवाडा हे बंदर आहे. रत्नदुर्गाची बांधणी फार पूर्वी बहामनी काळात झाली. १६७० साली शिवाजी महाराजांनी हा किल्ला अदिलशहाकडून जिंकून घेतला. धोंडू भास्कर प्रतिनिधी यांनी १७९० साली किल्ल्याची डागडुजी करून याला अधिक मजबुती आणली. १७५५ मध्ये रत्नदुर्ग आंग्रे यांच्या ताब्यात होता, तर त्यानंतर तो पेशव्यांच्या अंमलाखाली होता. १९५० मध्ये भगवती मंदिराची दुरुस्ती होऊन १९८९ मध्ये या किल्ल्याची डागडुजी करण्यात आली.
रत्नागिरी शहराच्या पश्चिमेला २ कि.मी. अंतरावर अरबी समुद्राच्या काठावरील डोंगरावर रत्नदुर्ग किल्ल्यात श्रीदेवी भगवतीचे शिवकालीन मंदिर आहे. किल्ल्याचे क्षेत्रफळ सुमारे १२० एकर आहे. किल्ल्याच्या तीन बाजूंना समुद्र आहे. १९६० मध्ये कान्होजी आंग्रे यांचे वडील शेखोजी आंग्रे यांनी भगवती देवीसाठी हेमाडपंथी घुमट बांधला. नंतर १७०० मध्ये शाहू महाराजांनी बावडेकर संस्थानचे रामचंद्रपंत नाईक परांजपे यांना मंदिरासाठी आर्थिक मदत दिली. त्यावेळी भगवती देवीचे मंदिर बांधले गेले.
या मंदिराचा दुसरा जीर्णोद्धार १९४१ मध्ये रत्नागिरीतील कै. भागोजीशेठ बाळोजी कीर यांनी केला. त्यानंतर १९५१ आणि १९५८ मध्ये मंदिरावर वीज पडली. मंदिराच्या डागडुजीसंदर्भात विश्वस्तांसमोर मोठे संकट उभे राहिले. त्यावेळी विश्वस्तांनी देणगी स्वरूपात पैसा गोळा करून मंदिराची डागडुजी केली. त्यानंतर १९८८-८९ मध्ये पुन्हा जीर्णोद्धार करण्यात आला.
मंदिर परिसरामध्ये आता अद्ययावत सुविधा उभारण्यात आल्या आहेत.या मंदिराचा दुसरा जीर्णोद्धार १९४१ मध्ये रत्नागिरीतील कै. भागोजीशेठ बाळोजी कीर यांनी केला. त्यानंतर १९५१ आणि १९५८ मध्ये मंदिरावर वीज पडली. मंदिराच्या डागडुजीसंदर्भात विश्वस्तांसमोर मोठे संकट उभे राहिले. त्यावेळी विश्वस्तांनी देणगी स्वरूपात पैसा गोळा करून मंदिराची डागडुजी केली. त्यानंतर १९८८-८९ मध्ये पुन्हा जीर्णोद्धार करण्यात आला. मंदिर परिसरामध्ये आता अद्ययावत सुविधा उभारण्यात आल्या आहेत. किल्ल्यावरील भगवती देवी ही मूळची रत्नागिरीतील नव्हे, तर कोल्हापूरनिवासी आहे. या देवीची आख्यायिका सांगितली जाते ती अशी की, कोल्हासूर, करवीर व रत्नासूर असे तीन राक्षस मातले होते. या राक्षसांचा संहार करण्याचे काम अंबा देवीकडे होते. कोल्हासुराचा नाश अंबाबाईने केला, तेथे कोल्हापूर वसले. करवीराला अंबाबाईने मारले, तेथे करवीरनगरी वसली. महाबलाढ्य रत्नासुराचा वध करण्याचे काम बाकी होते. त्यावेळी अंबाबाईने भगवान शंकराला प्रसन्न करून घेतले. भगवान शंकराने देवीला आणखी दोन वर्षे तपसाधना करायला सांगितली. दोन वर्षांनंतर देवीला भगवान शंकराने डोळे उघडायला सांगितले. त्यावेळी श्री देवी टेंबलाई व देवी भगवती समोर उभ्या होत्या. कालांतराने या तिन्ही देवींनी जोतिबाच्या वाडीतील खिंडीत रत्नासुराला गाठले. भगवतीने दैत्यावर शस्त्र चालविले व मुंडके उडवले. त्या वाडीचे नाव ‘वाडी रत्नागिरी’ असे पडले. दैत्यांचा नाश झाल्यावर अंबाबाईने वाट दिसेल तिथे जा, अशी सूचना केली. त्यावेळी टेंबलाईने कोल्हापुरात राहण्याचे ठरवले. भगवतीने कोकणची दिशा ठरविली. ती विशाळगडावरून दर्ग्याचे दर्शन घेऊन हातखंबा येथील कदम यांच्याकडे आली. त्यामुळे देवीचे ते मानकरी बनले. त्यानंतर रत्नदुर्गतील बालेकिल्ल्याच्या पायथ्याशी सावंत यांच्या घरी देवी बसली. नंतर किल्ल्यात आली व स्वयंभू रूपाने येथे वास करू लागली.
भगवती मंदिर चौसेपी बांधणीचे आहे. मंदिराचा गोपूर जमिनीपासून सुमारे ७० फूट उंचीचा आहे. मंदिर परिसरात श्रीदेव गणपती, खंडोबा, वेताळ, होळदेव व चव्हाटा ही देवस्थाने आहेत.
अलीकडेच या मंदिर व परिसरातील भागाचे सुशोभीकरण करण्यात आले आहे. याचप्रमाणे भक्तनिवासाची सोय विश्वस्तांनी केली आहे. देवीचे स्वयंभू मूर्तिस्थान अडीच फूट उंच आहे. देवीच्या हातात शंख, चक्र, ढाल व तलवार आहे. पूर्वाभिमुख असलेली देवी महिषासुरावर आरूढ झालेली आहे. वर्षातून दोन वेळा देवीचे उत्सव होतात. एक नवरात्रोत्सव आणि दुसरा शिमगोत्सव. या उत्सवांच्या वेळी देवीला संपूर्ण सोन्या-चांदीचे रूपे आणि दागिने घालून सजवले जाते. ही रूपे सावंत खोतांकडे ठेवलेली असतात. नवरात्रातील नऊ दिवस देवीला माळ घातली जाते.
(लेखक मुख्यमंत्र्यांचे माजी माहिती अधिकारी आहेत.)