ठाकरेंकडून पगार आणि सिल्व्हर ओकची चाकरी... अशी संजय राऊतची कामगिरी
आमदार नितेश राणे यांचा हल्लाबोल
मुंबई : आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी (PM Narendra Modi) यूपीएच्या (UPA) काळात कृषीमंत्री असलेल्या शरद पवारांनी (Sharad Pawar) या देशातल्या शेतकर्यांसाठी काय केलं, हा प्रश्न विचारला. पण जेवढं शरद पवार साहेबांच्या गटाला किंवा त्यांच्या कुटुंबियांना झोंबलं नाही तेवढं उद्धव ठाकरेच्या (Uddhav Thackeray) कामगाराला झोंबलं. म्हणजे हा कामगार नेमका कुठल्या मालकाकडून आपला पगार घेतो, हे काही स्पष्ट झालेलं नाही. यूपीएच्या काळात झालेली कर्जमाफी जी शेतकर्यांसाठी करण्यात आल्याचं सांगितलं होतं त्याचा नेमका किती शेतकर्यांना लाभ मिळाला, हा वेगळ्या संशोधनाचा विषय आहे, अशी जळजळीत टीका भाजप आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांनी केली. पंतप्रधानांवर टीका करणार्या आणि शरद पवारांचे गोडवे गाणार्या संजय राऊतांना (Sanjay Raut) त्यांचेच पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या कारकीर्दीचे दाखले देत नितेश राणे यांनी खडे बोल सुनावले.
आज सकाळी संजय राजाराम राऊत यांनी पुन्हा एकदा मी सतत संजय राजाराम राऊत का म्हणतो, का त्यांच्या वडिलांचं नाव घेतो याची आठवण करुन दिली. आता 'सामना' (Saamana) वृत्तपत्र हे ठाकरेंचं आहे, पगार ठाकरेंकडून घ्यायचा आणि चाकरी करायची सिल्व्हर ओकची. पंतप्रधानांनी काय केलं याबद्दल अग्रलेख आज सामनामध्ये आला आहे. कदाचित येणारी दिवाळी आणि दिवाळीमध्ये मिळणारा बोनस हा सिल्व्हर ओकमधूनही मिळावा, या उद्देशाने आजचा अग्रलेख लिहिलेला आहे,
पुढे नितेश राणे म्हणाले, मोदीजींच्या काळात किसान सन्मान योजनेच्या निमित्ताने दोन हजारचा हप्ता मिळून वर्षाला सहा हजार रुपये सातत्याने काही वर्षांपासून प्रत्येक शेतक-याच्या खात्यात जमा होत आहेत. असंख्य कृषी आणि शेती संग्रामातल्या योजना व शेतकर्यांबद्दल याअगोदर कुठल्याच काँग्रेस सरकारने विचारही केला नव्हता त्या मोदीसाहेबांच्या सरकारच्या काळात शेतकर्याला मिळतायत आणि शेतकरी समृद्ध होत आहे. आपला शेतीप्रधान भारत याच मोदीसाहेबांच्या काळात जगातील पहिल्या पाच अर्थव्यवस्थांमध्ये उभा आहे. येणार्या २०३० ला आपला भारत देश हा पहिल्या तीन क्रमांकामध्ये असेल, असे गौरवोद्गार काढत नितेश राणे यांनी संजय राऊतांना आव्हान दिलं की तुमच्यात एवढीच हिंमत असेल तर यावर खुल्या व्यासपीठावर चर्चा होऊ देत.
उद्धव ठाकरेंच्या काळात महाराष्ट्राची प्रतिमा मलीन
संजय राऊतांना उद्देशून नितेश राणे म्हणाले की, पंतप्रधानांनी काय केलं हे विचारण्यापेक्षा तुझ्या मालकाने मुख्यमंत्री असताना दोन-सव्वादोन वर्षांमध्ये महाराष्ट्रासाठी काय केलं, महाराष्ट्राची किती वाट लावली, गुंतवणुकीमध्ये महाराष्ट्र मागे पडला, कोरोना काळात सर्वात जास्त मृत्यू दर हा महाराष्ट्रात होता, बेरोजगारी असेल, भ्रष्टाचार असेल या सगळ्यांत महाराष्ट्राची प्रतिमा मलीन करण्याचं काम हे तुझ्याच मालकाच्या काळात झालं आहे. म्हणून हिंमत असेल तर एक अग्रलेख उद्धव ठाकरेंच्या कारकीर्दीवर लिहिण्याची हिंमत कर, असं नितेश राणे म्हणाले.
उद्धव ठाकरे पवारांविषयी खालच्या पातळीवर आणि घाणेरडं बोलायचे
शरद पवारांना मिळालेल्या पद्मविभूषणाचा उल्लेख विरोधकांकडून करण्यात येत आहे. यावर प्रत्युत्तर देताना नितेश राणे म्हणाले की, तुम्ही मोदीसाहेबांच्या जुन्या आठवणी काढताय मग आम्हीपण उद्धव ठाकरे यांची पवार साहेबांविषयी जी खालच्या पातळीवरील भाषणं आहेत, पवारसाहेबांच्या शरीरावर, त्यांच्या एकत्रित कारकीर्दीवर केलेली टीका आहे त्यांचं एकत्रित मोठं स्क्रिनिंग सिल्व्हर ओकच्या बाहेर लावायचं का? आठवण करुन द्यायची का की हेच उद्धव ठाकरे किती घाणेरड्या भाषेत शरद पवारांविषयी बोलायचे, असं नितेश राणे म्हणाले.
मराठा बांधवांनो थोडा संयम ठेवा
मराठा समाजाला आरक्षण मिळणारच अशी छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ घेऊन मुख्यमंत्र्यांनी माहाराष्ट्राला शब्द दिलेला आहे. कुठलाही मराठा हा महाराजांची खोटी शपथ घेणार नाही. म्हणून जे जे आंदोलनकर्ते आहेत त्या सगळ्या समाज बांधवांना मी पुन्हा हेच सांगेन की आपलं महायुतीचं सरकारच तुम्हाला टिकणारं आरक्षण देऊन दाखवेल, जे पिढ्यानपिढ्या मराठा समाजाला आधार देईल. म्हणून थोडा संयम ठेवा, असा सल्ला नितेश राणे यांनी दिला.
देशद्रोही आमदारांना लवकरच अटक करण्यात येईल
सकल हिंदू समाजाच्या मागणीनुसार धुळ्यामध्ये आमचे रोहित चंडोल यांनी दाखल केलेल्या तक्रारीनुसार, धुळ्याचे आमदार फारुक शहावर टिपू सुलतानचा पुतळा उभारण्यासाठी आणि त्यासाठी शासकीय निधी वापरण्यासाठी काल १२० आणि अजून कडक कलमे टाकण्यात आली. सोबतच कोर्टाला कळवण्यात आलं की देशद्रोहींवर गुन्हा टाकण्याची प्रक्रिया सुरु आहे. आमचा विश्वास आहे की, ज्यांनी आमच्या देशामध्ये, महाराष्ट्रामध्ये टिपू सुलतानचा पुतळा उभारण्याची हिंमत दाखवली अशा देशद्रोही आमदारांना लवकरच अटक करण्यात येईल, असा विश्वास नितेश राणे यांनी व्यक्त केला.