Thursday, July 4, 2024
Homeमहत्वाची बातमीNitesh Rane : उद्धव ठाकरेंचा कारभार कुत्र्याच्या शेपटासारखा!

Nitesh Rane : उद्धव ठाकरेंचा कारभार कुत्र्याच्या शेपटासारखा!

मातोश्रीत बसून कागदामध्ये छापलेली उबाठाची कार्यकारिणी नियमबाह्य

उबाठाच्या टीझरमध्ये बाळासाहेबांचा आवाजच नाही

आमदार नितेश राणे यांनी घेतला उबाठाचा समाचार

मुंबई : मुंबईचं प्रदूषण यावर सामनामध्ये एक अग्रलेख लिहून आमच्या सरकारवर आणि नेतृत्वावर टीका केली आहे. आमचं सरकार प्रदूषण कमी करण्यावर काम करतच आहे पण मुंबईच्या प्रदूषणाची जर तुम्हाला चिंता आहे, मुंबईमध्ये मुंबईकर घुसमटतायत याची तुम्हाला चिंता आहे तर उबाठामध्ये जे प्रदूषण वाढत चाललं आहे, केवळ दोन चार निष्ठावान शिवसैनिक उरले आहेत, त्यांचाही श्वास घुसमटत आहे, त्याबद्दल तुम्हाला अग्रलेख लिहावासा वाटत नाही का? असा जळजळीत सवाल उपस्थित करत भाजप आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांनी संजय राऊतांना (Sanjay Raut) सणसणीत चपराक लगावली. यावेळेस वेगवेगळ्या मुद्द्यांवर भाष्य करत त्यांनी उबाठाची (Ubatha) चांगलीच जिरवली.

उबाठा सेनेने नवी कार्यकारिणी जाहीर केली. यावर नितेश राणे त्यांच्याकडे असलेली शिवसेनेची (Shivsena) मूळ घटना दाखवत म्हणाले, या घटनेत कार्यकारिणी कशी आणि कोणी जाहीर करावी, याबद्दल नियम आणि कायदे आहेत. यातील नियम पाहता उबाठासारखी घरात, मातोश्रीत बसून कागदामध्ये छापलेली कार्यकारिणी ही नियमबाह्य आहे. अशा प्रकारच्या कार्यकारिणीला शिवसेनेच्या मूळ संविधानानुसार काही स्थान नाही. आम्हाला नियमबाह्य आणि घटनाबाह्य बोलणारे स्वतः एक नियमबाह्य संघटना चालवत आहेत, उरलेला पक्ष चालवत आहेत. कुत्र्याची शेपूट जशी कधीच सरळ होत नाही तसा उद्धव ठाकरेंचा कारभार आहे, अशी टीका नितेश राणे यांनी केली.

उबाठाच्या कार्यकारिणीवर टीका करताना नितेश राणे म्हणाले, काँग्रेस आणि शरद पवारांप्रमाणे यांचे विचार चालवणारे काही कंत्राटी कामगार नेमलेले आहेत. संजय राऊतसारख्या काही लोकांना कंत्राट देण्यात आलं आहे. ज्या लोकांच्या नावाने पाच कार्यकर्ते जमू शकत नाहीत, अशा लोकांना सचिव आणि उपनेते बनवलेलं आहे. त्यांचं बाळासाहेबांच्या विचारांशी काही देणंघेणं नाही. उबाठाची ही नेमणूक प्रायव्हेट कंपनीसारखी आहे, असं नितेश राणे म्हणाले.

संजय राऊतवर जेलमध्ये संडासासाठी भांडायची वेळ येणार

आज सकाळी संजय राजाराम राऊतला अचानक वाटायला लागलं की, आम्हाला परत जेलमध्ये टाकणार आहेत का? राखी सावंत यांना स्पर्धा देणार्‍या सुषमा अंधारेंना अश्रू अनावर झाले, भीती वाटायला लागली. पण ललित पाटील याला अटक झाल्यानंतर संजय राऊतला असं का वाटायला लागलं? असं काय बाहेर येणार आहे? याचा थोडासा ट्रेलर आमचे गृहमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी काल दाखवला. ललित पाटीलला भांडुप ते नाशिक गाडीने कोण घेऊन गेलं? कोण त्याला घेऊन फिरायचा? ही सगळी माहिती हळूहळू बाहेर येणार आहे. कधीही परत आर्थर रोड जेलमध्ये जाऊन सकाळी चार वाजता संडासासाठी भांडायची वेळ येणार आहे, याची त्याला भीती वाटते, म्हणून सगळा थयथयाट सुरु आहे.

उबाठाच्या टीझरमध्ये बाळासाहेबांचा आवाजच नाही

ठाकरे गटाच्या दसरा मेळाव्यासाठी रिलीज झालेल्या टीझरबाबत बोलताना नितेश राणे म्हणाले, त्या टीझरमध्ये बाळासाहेबांचा आवाज आहे का? म्हणजे ती बाळासाहेबांची सेना नाही. मी एकनाथ शिंदे साहेबांच्या मेळाव्याचा टीझर पाहिला, त्याच्यामध्ये थेट बाळासाहेब दिसतात. म्हणजे उबाठाचं बाळासाहेबांशी काही देणंघेणं नाही, हे स्वतः उद्धव ठाकरे म्हणत आहेत. निष्ठावान शिवसैनिक कार्यकारिणीच्या बाहेर आणि मातोश्रीचे निष्ठावान, यांच्या चपला आणि भांडी धुणारे कार्यकारिणीच्या आत, ही यांची निष्ठा, अशी टीका नितेश राणे यांनी केली.

राणे समितीनेच मराठा आरक्षण दिलं होतं

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी केलेल्या वक्तव्यासंबंधी पत्रकाराने प्रश्न विचारला असता नितेश राणे म्हणाले, मराठा आरक्षणाला कोणाचाही विरोध नाही, उलट राणे समितीनेच मराठा आरक्षण दिलं होतं. मराठ्यांना आरक्षण मिळालं पाहिजे असं म्हणणार्‍या कुठल्याच नेत्याला आजपर्यंत जे जमलं नाही ते आरक्षण राणे साहेबांनी मिळवून दिलं. ज्याला जसं जात प्रमाण घ्यायचं आहे, ते तुम्ही घ्या असं राणे साहेब म्हणाले. सर्वांनाच मराठा आरक्षण हवं आहे. पण केवळ मराठे आपापसात कसे भांडले पाहिजेत यासाठी प्रयत्न केले जात आहेत, असं नितेश राणे म्हणाले.

हिंदूद्वेष्टी लोकांनी कधीही भाजपवर टीका करु नये

‘देवाच्या नावाखाली लूट सुरु आहे’ या नाना पटोलेंच्या वक्तव्याला प्रत्युत्तर देताना नितेश राणे म्हणाले, भाजप राष्ट्रभक्त म्हणून देवीदेवतांचं जेवढं संरक्षण करतं तेवढं काँग्रेसला दहा वर्षात किंवा दहा पिढ्यांमध्ये देखील जमणार नाही. ते केवळ जिहाद्यांचं समर्थन, त्यांना मदत करतात. म्हणून हिंदूद्वेष्टी लोकांनी कधीही भाजपवर अशी टीका करु नये, असे नितेश राणे यांनी सुनावले.

उद्धव ठाकरेंना रात्री गोळ्या घेऊन झोपावं लागलं

गृहमंत्र्यांचं इंटेलिजन्ट किती मजबूत आहेत हे कालच्या पत्रकार परिषदेवरुन उबाठावाल्यांना कळलं असेल. त्यामुळे उद्धव ठाकरेंना रात्री गोळ्या घेऊन झोपावं लागलं किंवा वाईनचा एक्स्ट्रा ग्लास घ्यावा लागला असं आम्ही ऐकलं. एकीकडे आम्ही पोलीस कोठडीत होतो तेव्हा आम्हाला त्रास व्हावा यासाठी उद्धव ठाकरे आदेश द्यायचे आणि दुसरीकडे एका ड्रग्ज माफिया ललित पाटीलला १४ दिवस कसा आशीर्वाद मिळेल, त्याचं इंटरोगेशन देखील होणार नाही, याची काळजी उद्धव ठाकरेच घेत होते. याचाही लवकरच पर्दाफाश होईल, असं नितेश राणे म्हणाले.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

 

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -