
खोटे शपथपत्र दाखल केल्याचा आरोप, आजोबा वारल्याचा आदित्य ठाकरेंचा दावाही खोटा
दिशा सॅलियन, आदित्य ठाकरे, राहुल कनाल, सूरज पांचोली, सचिन वाझे, एकता कपूर, सुशांतसिंह राजपूत, रिया चक्रवर्ती, अरबाज खान, संदिप सिंह, शौविक चक्रवर्ती या सर्वांचे मोबाईल लोकेशन तपासण्याची मागणी
मुंबई : दिशा सालियन आत्महत्येच्या प्रकरणी शिवसेना ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांच्या अडचणींमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे. आदित्य ठाकरे यांनी न्यायालयात या प्रकरणी खोटं आरोपपत्र दाखल केल्याचा आरोप मूळ याचिकाकर्ते राशिद खान पठाण यांनी केला आहे. न्यायालयाचा अवमान केल्याप्रकरणी आदित्य ठाकरे यांच्यावर कारवाई करावी अशी मागणीही त्यांनी केली आहे.
दिशा सालियानच्या मृत्यूचा तपास अजून संपला नाही. दिशाचा मृत्यू ज्या वेळी झाला होता त्यावेळी आदित्य ठाकरे यांच्या मोबाईल त्याच परिसरात कसा काय होता, असा सवालही याचिकेतून विचारण्यात आला आहे.
आजोबा वारल्याचा आदित्य ठाकरेंचा दावाही खोटा असल्याचं राशिद खान पठाण यांनी केला आहे. त्यामुळे आदित्य ठाकरे यांनी न्यायालयाला खोटी माहिती दिली असून त्यांच्यावर न्यायालयाने कारवाई करावी, अशी मागणी मूळ याचिकाकर्ते राशिद खान पठाण यांनी केला आहे.
बॉलिवूड अभिनेता सुशांतसिंह राजपूत आणि दिशा सालियन आत्महत्या प्रकरणी शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांची चौकशी करण्यात यावी अशी मागणी करत राशिद खान पठाण यांनी एक याचिका दाखल केली आहे. ८ जून २०२० रोजीच दिशा सॅलियन, आदित्य ठाकरे, राहुल कनाल, सूरज पांचोली, सचिन वाझे, एकता कपूर यांचं मोबाईल लोकेशन तपासलं जावं, कारण त्या रात्री हे सगळे १०० मीटरच्या परिसरात एकत्रच होते. तसेच १३ व १४ जून २०२० रोजीचे सुशांतसिंह राजपूत, रिया चक्रवर्ती, आदित्य ठाकरे, अरबाज खान, संदिप सिंह, शौविक चक्रवर्ती या सर्वांचेही मोबाईल लोकेशन तपासले जावेत. तसेच या दोन्ही दिवसांचं आसपासच्या परिसरातील आदित्य ठाकरेंशी संबंधित सारं सीसीटीव्ही फुटेज तपासलं जावं. सुशांतचा मृत्यू झाला त्यादरम्यान आदित्य ठाकरे आणि रिया चक्रवर्ती यांच्यात ४४ वेळा फोनवर काय बोलणे झाले? याची चौकशी व्हायला हवी. सुशांत आणि दिशाच्या मृत्यूवर सवाल उठवणाऱ्या सर्व साक्षी पुराव्यांची सखोल चौकशी व्हावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.
दरम्यान, दिशा सॅलियन आणि सुशांत सिंह राजपूत प्रकरणात आदित्य ठाकरे यांनी हायकोर्टात कॅव्हेट दाखल केलं आहे. या प्रकरणात कोणताही निर्णय घेण्यापूर्वी आमची बाजू ऐकून घ्यावी अशी मागणी आदित्य ठाकरे यांनी केली आहे.