पुणे: कोहलीला आपले शतक पूर्ण करण्यासाठी ३ धावा हव्या होत्या तर भारताला विजयासाठी २ धावांची गरज होती. कोहली आपले शतक साजरे करणार का की त्याआधीच भारताचा विजय होणार याकडे समस्त चाहत्यांचे लक्ष लागले होते. मात्र कोहलीने तो षटकार ठोकला आणि सगळं कन्फ्युजनच दूर केले.
कोहलीने ४२व्या षटकातील तिसऱ्या बॉलवर नसूमला षटकार ठोकला आणि आपले शतक पूर्ण केलेच मात्र भारताला विजयही मिळवून दिला. भारताने बांगलादेशविरुद्ध ७ विकेटनी विजय मिळवला. बांगलादेशने विजयासाठी दिलेले २५७ धावांचे आव्हान भारताने ४१.३ षटकांत पूर्ण केले.
विराटचे शानदार शतक
भारताकडून विराट कोहलीने शानदार शतक साजरे केले. त्याने ९७ बॉलमध्ये १०३ धावांची खेळी साकारली. भारताची सुरूवात दमदार झाली. सलामीवीर रोहित शर्माचे अर्धशतक दोन धावांनी हुकले. त्याने ४८ धावांची खेळी केली. तर शुभमन गिलने मात्र आपले अर्धशतक साजरे केले. त्याने ५३ धावांची खेळी केली. विराट कोहलीने या सामन्यात दमदार शतक तडकावले. त्याने ९७ बॉलमध्ये १०३ धावा केल्या. श्रेयस अय्यर पुन्हा अपयशी ठरला. त्याने केवळ १९ धावा केल्या. लोकेश राहुलने ३४ धावांची खेळी केली.
बांगलादेशच्या २५६ धावा
तत्पूर्वी, बांगलादेशने पहिल्यांदा फलंदाजी करताना ५० षटकांत २५६ धावा केल्या होत्या. बांगलादेशने सुरूवात चांगली केली. दोन्ही सलामीवीरांनी प्रत्येकी अर्धशतक ठोकले. सलामीवीर तांझीद हसनने ५१ धावा केल्या तर लिटन दासने ६६ धावा ठोकल्या. मात्र त्यानंतर मधल्या फळीतील फलंदाज एकामागोमाग एक बाद होत गेले. त्यानंतर खालच्या फळीतील महमदुल्लाहने ४६ धावांची खेळी करत बांगलादेशला अडीचशे पार धावसंख्या नेण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. मात्र त्याची ही खेळी व्यर्थ ठरली.
भारताकडून जसप्रीत बुमराह, रवींद्र जडेजा, मोहम्मद सिराज यांनी प्रत्येकी दोन विकेट मिळवल्या तर शार्दूल ठाकूर आणि कुलदीप यादव यांनी प्रत्येकी एक विकेट मिळवला.
भारताचा सलग चौथा विजय
भारताचा विश्वचषकातील हा सलग चौथा विजय आहे. भारताने पहिल्या सामन्यात ऑस्ट्रेलियाला, दुसऱ्या सामन्यात अफगाणिस्तानला, तिसऱ्या सामन्यात पाकिस्तानला तर चौथ्या सामन्यात बांगलादेशला हरवले आहे.