
आता व्हायब्रंट गुजरातच्या नावाने चटके लागत आहेत?
हिंदूंवरील अन्यायावर मुल्ला उद्धव ठाकरे एका तोंडाने बोलायला तयार नाही
आमदार नितेश राणे यांनी घेतला खरपूस समाचार
मुंबई : समृद्धी महामार्गावर (Samruddhi Highway) होणार्या अपघातासारख्या दुर्दैवी घटनांचे राजकारण करणार्या ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांना भाजप आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांनी चांगलेच सुनावले आहे. आजच्या पत्रकार परिषदेत नितेश राणे यांनी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि संजय राऊतांचा खरपूस समाचार घेतला. आता मारू मुंबईवर भाष्य करणार्या संजय राऊतांना त्यांच्याच पक्षाचे पुराव्यांसकट दाखले देत नितेश राणे यांनी तोंडावर पाडले आहे.
नितेश राणे म्हणाले, आज समृद्धी महामार्गावर दुर्दैवी अपघात झाला ही अतिशय दुखद घटना घडली. त्या अपघातावर घाणेरडं राजकारण करण्याचं काम संजय राऊतने सुरु केले आहे. राज्य सरकार म्हणून मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री यांनी राज्यात विकासाची दालने खुली व्हावीत या स्तुत्य हेतूने हा महामार्ग तयार केला. ज्या जनतेसाठी हा महामार्ग तयार करत आहोत, त्यांच्यावर दुखाःचा डोंगर कोसळावा, अशी कोणाचीच इच्छा नसते. ज्या महामार्गाचं नाव हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आहे, त्याला शाप म्हणण्याचं काम हा संजय राऊतसारखा नालायकच करु शकतो अशी टीका नितेश राणे यांनी केली.
आमचं सरकार समृद्धी महामार्गावर अपघात टाळण्यासाठी शक्य तितके प्रयत्न करत आहे. या ठिकाणी एअर अॅम्ब्युलन्स उपलब्ध व्हावी याकरता देखील मुख्यमंत्र्यांनी संबंधित मंत्र्यांशी बैठक घेतली. पण हा महामार्ग बनत असताना जेव्हा याचा मालक मुख्यमंत्री होता तेव्हा आमचा यातील हिस्सा काय असं ब्लॅकमेल कोण करत होतं, याची संपूर्ण माहिती एकनाथ शिंदे साहेबांकडे आहे, त्या कंत्राटदाराने तोंड उघडले, तर उद्धव ठाकरे मातोश्रीतून बाहेर पडणार नाही, असं नितेश राणे म्हणाले.
समृद्धी महामार्गावर अपघात झाला तर तुम्ही लगेच राज्य सरकारला दोषी ठरवता, जसं काय आम्हीच हा अपघात घडवून आणला आहे. तसंच कोस्टल रोड हा जो तुमचा ड्रीम प्रोजेक्ट म्हणून मिरवत आहात, त्यावर उद्या अपघात झाला तर त्यासाठी उद्धव ठाकरे यांना दोषी ठरवायचं का? म्हणून अशा कुठल्याही दुर्दैवी घटनेवर कोणीही राजकारण करु नये अशा मताचे आम्ही आहोत, असं नितेश राणे म्हणाले.
आता व्हायब्रंट गुजरातच्या नावाने चटके लागत आहेत?
आज सामना वृत्तपत्रात मारू मुंबई, मारू घाटकोपर यावर भाष्य केलं आहे. पण उद्धव ठाकरे यांनी काही वर्षांपूर्वी जी मोहिम केली होती त्याच्या घोषणेची या गजनीला (संजय राऊत) आठवण करुन देतो. ती घोषणा होती, 'मुंबई मां ना जलेबी ना फाफडा, उद्धव ठाकरे आपडा'. तेव्हा तुम्हाला गुजराती चालत होते. तेव्हा तुम्हाला वाटलं नाही की हे फाफडा आणि जलेबी खाणारे उद्या मुंबईला काबीज करतील. तेव्हा तुम्हाला गुजराती मतं पाहिजे होती. तेव्हा शिवसेनेने गुजरातीमध्येच एक पत्रदेखील लिहिलं होतं आणि शाह नामक पदाधिकार्यामार्फत सर्व गुजरात्यांमध्ये वाटलं होतं. आणि आता गुजरातचे मुख्यमंत्री इथे आल्यावर व्हायब्रंट गुजरातच्या नावाने तुम्हाला चटके लागत आहेत? असा जळजळीत सवाल नितेश राणे यांनी उपस्थित केला.
जिहादींकडून तुम्ही सुपारी घेतली आहे का?
३० नोव्हेंबर २०२१ रोजी ममता बॅनर्जी मुंबईत आल्या होत्या, उद्योजकांची भेट त्यांनी घेतली होती. तेव्हा मुख्यमंत्री म्हणून तुझ्या मालकाने स्वागत केले होते. या ममता बॅनर्जी त्याच बंगालच्या मुख्यमंत्री आहेत, जिथे हिंदूंना जीवंत जाळले जाते. मग ज्या गुजरातमध्ये हिंदू सुरक्षित आहेत, गुजराती माणसाचं योगदान मुंबईत आहे, त्या गुजराती माणसांसाठी तुम्हाला चटके का लागतात? हिंदूंमध्ये फूट पाडणाऱ्या जिहादींकडून तुम्ही सुपारी घेतली आहे का? असे सवाल नितेश राणे यांनी उपस्थित केले.
एका शब्दाने मुल्ला उद्धव बोलत नाहीत
जिहाद्यांचीच भाषा हे लोक करत आहेत. सनातन धर्मावर आक्रमण झालं, हिंदू समाजाचा अपमान झाला, पण मुल्ला उद्धव ठाकरे एका तोंडाने बोलायला तयार नाही. हिंदूंना तोडायचं कसं या तुमच्या कटकारस्थानाचाच हा एक भाग आहे. पण तुम्ही कितीही प्रयत्न केले तरी मुंबईतील विविध भाषिक असलेला एक हिंदू कधीही विभाजित होणार नाही. मराठी असो, गुजराती असो, सिंधी असो, पंजाबी असो, दक्षिण भारतीय असो सगळे एकत्र एक हिंदू म्हणून तुझ्याविरुद्ध लढणार आणि मुंबई महापालिकेवर हिंदुत्वाचा भगवा फडकवणार, हे मी स्पष्टपणे सांगतो, असं नितेश राणे म्हणाले.
दाऊदला बोलवून दिवाळीचा फराळ खायला घाला
बाळासाहेबांच्या पोटी असा नालायक जन्माला आला यापेक्षा दुसरं दुर्दैव नाही. ज्या समाजवाद्यांच्या विरोधात बाळासाहेबांनी इतिहास घडवला, मराठी माणसाचा आवाज म्हणून शिवसेना मोठी झाली आणि आज त्यांच्या समाजवाद्यांच्या, कधी रझा अकादमी, तर कधी डीएमके, कधी लालूप्रसाद यादव यांच्या खांद्याला खांदा लावून उद्धव बसत आहेत. आता पुढचा टप्पा केवळ दाऊद इब्राहिमसोबतच राहिलेला आहे. आता त्यालाही बोलवा आणि त्याला दिवाळीचा फराळ खायला घाला, कारण यापेक्षा मोठा बाळासाहेबांचा अपमान होऊच शकत नाही, अशी टीका नितेश राणे यांनी केली.