
तुळजापूर : नवरात्र उत्सव (Navaratri Utsav) अगदी तोंडावर आला असताना महाराष्ट्रातील साडेतीन शक्तिपीठांपैकी एक असलेल्या तुळजापूर येथील तुळजाभवानी मंदिर (Tuljapur Bhavani Mandir) विकास प्रारूप आराखड्यातील दर्शन मंडपाच्या जागेवरून वाद सुरु झाला आहे. यासाठीच तुळजापूर बंदची (Tuljapur Bandh) आज हाक देण्यात आली आहे. दर्शन मंडप मंदिरातच व्हावा, या आग्रही मागणीसाठी आज तुळजापूर बंद ठेवण्यात आले आहे.
तुळजापूर येथील भवानीच्या मंदिरात दर्शन मंडप घाटशीळ येथे करण्यास पुजार्यांचा, व्यापारी आणि काही स्थानिक लोकांचा विरोध आहे. त्यांच्याकडून तुळजापूर बंदचे आवाहन करण्यात आले आहे.
यंदा शारदीय नवरात्र उत्सव १५ ऑक्टोबरला सुरू होणार आहे. त्यामुळे मंदिरातही तयारी सुरू आहे. देवीची मंचकी निद्रा सध्या सुरू असून १५ ऑक्टोबरला घटस्थापना होईल. आता या नवरात्रीची तयारी सुरू असताना विकास आराखडा सह अनेक मुद्द्यांवरून आक्षेप घेतले जात आहेत.
महाराष्ट्र राज्य सरकार कडून १३०० कोटींचा तुळजापूर तीर्थक्षेत्र विकास आराखडा देण्यात आला आहे. शहरवासियांच्या मागणीनुसार नव्याने दर्शन मंडप हा राजे शहाजी महाद्वार आणि राजे जिजाऊ महाद्वार यांच्या समोर विजय वाचनालय, अॅडमिन बिल्डिंग, उंबर झरा आणि त्याच्या नजिकच्या जागेवर व्हावा, अशी मागणी आहे. ही जागा सार्यांसाठीच सोयीची असेल. पण आतापर्यंत झालेल्या प्रेझेंटेशनमध्ये या दर्शन मंडपाची जागा दाखवण्यात आलेली नाही. काही दिवसांपूर्वी सोशल मीडियातून जाहिरात दिल्यानंतर या दर्शन मंडपावरून वाद झाला आणि आज बंदची हाक देण्यात आली आहे.
आज शांततेच्या मार्गाने तुळजापूर मध्ये बंद पाळला जाईल अशी माहिती देण्यात आली आहे. त्याबाबतचे एक निवेदनही देण्यात आले आहे. विकास अरखड्यानुसार दर्शन मंडप घाटशीळ भागात बांधण्यास काही पुजारी, व्यापारींचा विरोध आहे. तुळजापूरच्या नव्या विकास आराखड्यानुसार, वातानुकुलित सभागृह उभारून तेथून दर्शनाची रांग जाणार आहे. या मार्गावर १० वातानुकुलित सभागृह असतील. लाखभर भाविक क्षमता असलेले हे भव्य सभागृह उभारण्यात येणार असून एका सभागृहातून दुसऱ्या सभागृहात पाठवून भाविकांना टप्प्याटप्प्याने मंदिरात दर्शनासाठी सोडले जाणार आहे. त्यामुळे दर्शन घेणे सोपे होणार आहे.