
टोलवसुलीवरुन मनसे आक्रमक
ठाणे : राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी काल केवळ व्यावसायिक वाहनांकडून टोल घण्यात येतो, प्रवाशांच्या दुचाकी, तीन चाकी व चार चाकी वाहनांना राज्यात टोल (Toll) नाही, असं वक्तव्य केलं. मात्र याला मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी विरोध केला. शिवाय या वाहनांकडून टोल घेतल्यास आम्ही टोलनाके जाळून टाकू, असा इशारा दिला होता.
राज ठाकरेंचा हा इशारा मिळताच मनसैनिक (MNS supporters) लागलीच राज्यातील वेगवेगळ्या टोलनाक्यांवर दाखल झाले होते. त्यातच मनसैनिकांनी मुलुंड येथील पहिला टोलनाका पेटवून दिला. टोलनाक्याच्या केबिनमध्ये पेट्रोल टाकून तो पेटविण्याचा प्रयत्न करण्यात आला.
मनसेचे ठाणे अध्यक्ष अविनाश जाधव (Avinash Jadhav) यांनी राज ठाकरेंच्या पत्रकार परिषदेनंतर रस्त्यावर उतरुन टोलनाक्यांची पाहणी केली. अविनाश जाधव यांनी मुंबईतील मुलुंड टोलनाक्यावर धाव घेत आंदोलन सुरु केलं. लहान वाहनांना विना टोल सोडण्याची मागणी त्यांनी केली. दरम्यान, दुपारी अविनाश जाधव यांनी आंदोलन केल्यानंतर, संध्याकाळी मनसैनिकांनी मुलुंड टोलनाका पेटवला. यावेळी अविनाश जाधव तिथे नव्हते.
राज ठाकरे यांनी आज सकाळी पत्रकार परिषद घेऊन टोलबाबत आक्रमक भूमिका घेतली होती. आम्ही टोलनाक्यांवर आमची माणसे उभी करू व प्रवाशांच्या वाहनांना टोल आकारु देणार नाही. मात्र, आम्हाला कुणी विरोध केला तर तो टोलनाकाच जाळून टाकू, असं राज ठाकरे म्हणाले होते. त्यानंतर मनसैनिकांनी पहिला टोलनाका पेटवून दिला. राज्यात अन्यत्रही मनसेने टोलवसुलीला विरोध केला आहे, यामुळे आता हे प्रकरण चांगलंच पेटण्याची शक्यता आहे.