मायभाषा: डॉ. वीणा सानेकर
१९९० नंतरच्या बदललेल्या जगाचा चेहरा मराठी कवितेत स्पष्टपणे उमटला आहे. हे बदललेले जग विविध रंग ल्यायलेले आहे. यात भीती, नैराश्य, वैफल्य, असे रंग आहेत, तर काही रंगांच्या आकारांची एकमेकांत इतकी सरमिसळ झाली आहे की त्यातून वेगळेच आकार तयार झाले आहेत. वसंत डहाके यांच्या कवितेच्या ओळी आहेत :
“काहीतरी विचित्रच आहे…
समीकरणं बदलली शब्दांचे अर्थ बदलले…
शक्य आहे की, मला कीटकांची भाषा समजेल आणि माणसांच्या भाषेपासून माझी सुटका होईल…
काळ तर काळोखाचा आला आहे……”
जागतिकीकरणाच्या रेट्याने समाज ढवलून काढला. सर्व क्षेत्रांतील स्पर्धेचा अतिरेक, हरवलेला विवेक, बाजाराने कवेत घेतलेला समाज, टोकाला गेलेला चंगळवाद, जगण्याचा आत्मकेंद्री दृष्टिकोन ही या काळाची काही वैशिष्ट्ये. मुख्य म्हणजे मानवी नात्यांवर या बदलांचा परिणाम झाला. नात्यांमधली ओढ हरवली आणि तकलादूपणाला खरेपणाचे स्थान मिळाले. सुहास जेवलीकर म्हणतात,
व्हेलेंटाइन किंवा फ्रेंडशिप डेच्या निमित्ताने प्लास्टिकच्या कागदात लपेटलेल्या फुलांनी आणि कृत्रिम रेशमाच्या बँड्सनी प्रेमाला मैत्रीला बांधून ठेवण्याचा नवा अट्टहास! माणसा-माणसांमधले अंतर वाढल्याने ती कशी एकाकी झाली याचा प्रत्यय अरुण काळे यांच्या शब्दांतून साकार होतो.
“रस्ते चौपदरी झाले, माणसं एकपदरी…
सुंंदर वाहतूक बेटे झाली आणि लोक राहू लागले बेटावर……”
गर्दीत असूनदेखील माणसांच्या वाट्याला एकाकी जगणे आले. आनंद लुटण्याचे हजारो मार्ग, पण दुःख वाटून घेताना आपली माणसे सापडत नाहीत. माणसांची बेटे होणे हे या काळाचे वास्तव आहे. आपल्याला खूप काही सांगायचे असते, तेव्हा मित्राचा फोन ‘बिझी’ येत राहतो किंवा मग फोनवर लगेच शब्दसंदेश ‘आय विल कॉल यू लेटर.’
मनातली सांगायची उर्मी तशीच जिरून जाते. प्रदीप पाटील यांच्या कवितेचा संदर्भ आठवतो.
“कोरड्या विहिरीचा दिसू लागे तळ
ओलाव्याचे बळ कमी झाले.”
माणसा-माणसांतील ओलावा ही ताकद होती. पण तो आता आटत चालला, ही तीव्र जाणीव या ओळी व्यक्त करतात. वातावरणात वाढलेले प्रदूषण, तर आहेच पण दुसऱ्या बाजूने वेगवेगळ्या स्तरांवर प्रदूषण आहे. कुठलीच गोष्ट अस्सल राहिलेली नाही. सुहास जेवलीकर त्यांच्या एका कवितेत म्हणतात,
“पर्यावरणात सर्वदूर पसरलेला कर्बवायू शोषून,
विशाल अंत:करणानं प्राणवायू देणारी
खोलवर रुजलेल्या मुळांची विराट झाडं अभावानेच आढळतात आता या महानगरात…”
सखोल असे सापडणे कठीण नि वरवरचे, उथळ मात्र जागोजागी उपलब्ध असे दृश्य आज दिसते. परकीय संस्कृती व परकीय भाषा लादली जाणे हेही या काळानेच आपल्याा दाखवले. आपल्या भाषेवरही याचा मोठा परिणाम झला. इंग्रजी ही विश्वसंपर्काकरता गरजेची हे कुणीच अमान्य करणार नाही. पण अंतर्गत दैनंदिन व्यवहारांकरिता आपल्या प्रादेशिक भाषा मोलाच्या आहेत हे देखील आपण विसरलो. या भाषांमधला संपर्कव्यवहार नि ज्ञानव्यवहार दोन्ही आपण दुबळे ठेवले. आपली भाषिक व सांस्कृतिक एकता ही आपली ताकद आहे हे विसरून चालणार नाही. वर्जेश सोलंकी यांच्या कवितेत त्यांनी हे नेमकेपणाने साकारले आहे.
“इन्फोटेकने वामनासारखी पादाक्रांत केली पृथ्वी…
हरवू लागलोय आता आपण आपली बोलीभाषा…
विसरू पाहतोय परवचे… इडलीच्या पीठासारखे भाषेचे तयार पॅक बाजारात मिळताना… पाटीवर गमभन गिरवलेल्या बोटातून तुटत चाललीय काही लिहिण्याची सवय……”
आपल्या भाषेतला अनमोल ठेवा, तिची शब्दकला, त्यातून निर्माण झालेले तिचे सौंदर्य हा सगळा आनंद पुढल्या पिढीपर्यंत पोहोचवणे गरजेचे आहे. श्वासाइतकी अनमोल मायभाषा ही आपल्या जगण्याची मूलभूत गरज केव्हा होणार?
मुंबई : उन्हाळ्याचा प्रभाव खुपच वाढत आहे.उन्हाळ्यात बहुतेक लोक शरीर थंड ठेवण्यासाठी दही खातात. पण…
हैदराबाद : दाक्षिणात्य अभिनेता महेश बाबू (Mahesh Babu) यांना रिअल इस्टेट (Real Estate Groups) गुंतवणूकदारांच्या…
वादळ, हिमनद्या वितळणे, अवकाळी पावसासारख्या वाढल्या आपत्तीच्या घटना ठाणे (प्रशांत सिनकर) : जगभरात २२ एप्रिल…
ऑर्लँडो : अमेरिकेतील ऑर्लँडो आंतरराष्ट्रीय विमानतळावर (Orlando International Airport) डेल्टा एअरलाइन्सच्या विमानाला आग लागली. मात्र,…
मुंबई: यंदाच्या वर्षी ३० एप्रिलला अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त आहे. या दिवशी कोणतेही शुभ कार्य केले…
मुंबई(ज्ञानेश सावंत): दिल्लीचा संघ सध्या अव्वल तीन संघा मध्ये आहे व पहिल्या फेरीत दिल्लीने लखनऊ…