‘हे असे आहे तरी पण, हे असे असणार नाही
दिवस अमुचा येत आहे, तो घरी बसणार नाही,’
या सुरेश भटांच्या गीतातील ओळी आहेत. मुंबईकरांना त्या पक्क्या लागू पडतात. घड्याळ्याच्या काट्याप्रमाणे आपल्या आयुष्याची वाटचाल करणारा मुंबईकर हा तुम्हाला घरी बसलेला सापडेल असा प्रकार विरळाच. तोच मुंबईकर चाकरमानी हा कामाचे ठिकाण ते घर यांमधील प्रवासासाठी बहुतेक करून उपनगरीय लोकलचा वापर करतो. त्याला मुंबईकर लोकल सेवा असे संबोधतात. ही लोकल पाच ते दहा मिनिटे उशिरा आली की, त्याचा जीव मेटाकुटीला आल्यासारखा होतो. गर्दीत लोंबकळत प्रवास करण्याची त्याला इतकी सवय झाली आहे की, कामावर जाण्यासाठी उशीर होऊ नये यासाठी तो जीवाचा आटापिटा करताना दिसतो; परंतु गेल्या-आठ दिवसांत मुंबई लोकलच्या सेवेत तांत्रिक बिघाडामुळे प्रवाशांचा खोळंबा झाल्याचे दिसून आले आहे. मुंबई उपनगरी रेल्वे (लोकल) ही मुंबई शहर आणि उपनगरात असलेली एक सार्वजनिक वाहतूक प्रणाली आहे. भारतीय रेल्वेचे मध्य रेल्वे व पश्चिम रेल्वे हे दोन क्षेत्रीय विभागामार्फत ही सेवा दिली जाते. ३८५ मार्ग किलोमीटरच्या विस्तारामध्ये पसरलेल्या उपनगरी रेल्वेने मुंबईत ७५ लाखांहून अधिक प्रवासी दररोज प्रवास करतात. रोज सुमारे तीन हजारांहून अधिक ट्रेन सेवा चालवण्यासाठी १२ कार आणि १५ कार रचनांचे २७७ रेक (ट्रेन सेट) वापरले जातात.
पश्चिम रेल्वेवरील मुंबई सेंट्रल येथे बुधवारी सकाळी ११.२० च्या सुमारास लोकल रुळावरून घसरली. ही लोकल कारशेडमध्ये जात होती. त्यात प्रवासी नसले तरी या घटनेमुळे पश्चिम रेल्वेवरील लोकल सेवा विस्कळीत झाली. मध्य रेल्वेवरील पनवेल-कळंबोली येथे नुकतीच मालगाडी घसरल्याची घटना घडली होती. तांत्रिक बिघाड झाल्याने लोकल सेवा विस्कळीत झाली. परिणामी कामावर जाणाऱ्या मुंबईकरांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला होता. मध्य रेल्वेच्या लोकल सेवेत ऐन गर्दीच्या वेळी बिघाड झाला. त्यामुळे कल्याणहून कर्जतच्या दिशेने जाणारी लोकल सेवा विस्कळीत झाली होती. बदलापूर आणि वांगणी स्टेशनच्या दरम्यान इंजिन बंद पडल्याने त्याचा लोकल सेवेवर परिणाम झाला होता. कल्याणहून कर्जतकडे जाणारी लोकल सेवा विस्कळीत झाल्याने प्रवाशांचे हाल झाले. कार्यालयीन कामाची वेळ संपल्यानंतर लोक घरी परतत असतात. त्यामुळे लोकलमध्ये मोठ्या प्रमाणावर गर्दी असते. अशात लोकल सेवेचा खोळंबा झाल्याने मध्य रेल्वेचे वेळापत्रक कोलमडले.
कल्याण रेल्वे स्थानकावर तांत्रिक बिघाड झाल्याने मुंबईतील मध्य रेल्वे लाइनवरील वाहतूक विस्कळीत झाल्याने सकाळी साडेसहा वाजेपासून मुंबईतील लोकल सेवा ठप्प झाली. परिणामी सकाळी कामावर जाणाऱ्या नागरिकांना मोठ्या मनस्ताप सहन करावा लागत आहे. त्यामुळे वेळेवर कामावर जाणाऱ्या प्रवाशांचे लेटमार्क टाळता आले नाहीत. सकाळी कामावर जाणारे मुंबईकर वेगवेगळ्या स्थानकांवर अडकून पडले. लोकल नसल्याने चाकरमान्यांची चांगलीच तारांबळ उडाली. त्यानंतर कल्याण स्टेशनवर प्रवाशांची मोठी गर्दी झाल्याचे पाहायला मिळाले. त्यामुळे सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेवरही त्याचा परिणाम पाहायला मिळाला. सेन्ट्रल लाइनवर तांत्रिक बिघाड झाल्याने अनेक लोकल तसेच लांब पल्ल्यांच्या रेल्वेगाड्यांचे वेळापत्रक कोलमडले. त्यानंतर आता रेल्वेचे अधिकारी कल्याण रेल्वे स्टेशनवर दाखल झाले आणि तांत्रिक बिघाड दूर करण्याचे काम हाती घेण्यात आले.
अंबरनाथ आणि बदलापूर दरम्यान मालगाडीच्या इंजिनमध्ये बिघाड झाल्याने मध्य रेल्वेची वाहतूक सेवा ठप्प झाली होती. यामुळे कर्जतकडून मुंबईच्या दिशेने येणारी लोकल वाहतूक विस्कळीत झाली. कल्याण लोको शेडमधून इंजिन मागविण्यात आले होते. बदलापूर आणि वांगणी या दोन मध्य रेल्वे मार्गावर असलेल्या स्टेशन्सच्या दरम्यान इंजिनमध्ये बिघाड झाला. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसहून सुटलेली कर्जत लोकल ही पुढे जाऊ शकलेली नाही. इंजिन कशामुळे बिघडले हे अद्याप समोर आलेले नाही. मुंबई लोकल ही मुंबईकरांची लाईफलाईन मानली जाते. दररोज मुंबई आणि उपनगरांमधून लाखो प्रवासी या लोकलने प्रवास करून आपल्या कार्यालयापर्यंत पोहोचतात. तसेच संध्याकाळ झाली की याच लोकलने घरीही परतत असतात. सकाळी कार्यालयात पोहोचण्याची वेळ आणि संध्याकाळी कार्यालयातून घरी परतण्याची वेळ ही मुंबई लोकलसाठी आणि चाकरमान्यांसाठी खूप महत्त्वाची असते. त्यामुळे या वेळेत जर लोकलमध्ये काही बिघाड झाला, तर मुंबईकरांचे बरेच हाल होतात. तसे तांत्रिक बिघाड होऊ नये याची काळजी रेल्वे प्रशासनाने घ्यावी, अशी माफक अपेक्षा प्रवासी करतात, त्यात काय चूक आहे.