नितेश राणे यांचा संजय राऊतांवर पलटवार
मुंबई : मुंबईतील मुलुंडसारख्या ठिकाणी केवळ मराठी असल्यामुळे तृप्ती देवरुखकर (Trupti Deorukhkar) यांना ऑफिससाठी जागा नाकारण्यात आली ही बाब आता सर्वच राजकीय पक्षांनी (Political Parties) उचलून धरली आहे. त्यांना न्याय मिळाला पाहिजे अशीच सर्वांची भूमिका आहे. मात्र, उबाठा गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut)यांनी या घटनेला भाजप आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांना जबाबदार धरत गलिच्छ राजकारण करण्याचा प्रयत्न केला आहे. यावर भाजप आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांनीदेखील त्यांच्यावर पलटवार केला आहे.
नितेश राणे म्हणाले, मुलुंड घटनेला जबाबदार भाजप आणि शिंदे आहेत असं बोलण्याअगोदर संजय राजाराम राऊतला लाज वाटली पाहिजे. मुंबईतला मराठी माणसाचा टक्का का घसरला? इतकी वर्षे महापालिकेत उद्धव ठाकरे यांची सत्ता होती ना? मग तरीही मुंबईतला मराठी माणूस आज मीरा रोड, वसई, विरार, भाईंदर, कल्याण, डोंबिवली या ठिकाणी का राहायला गेला? मुंबईमध्ये त्यांना का घर घ्यावंसं वाटलं नाही? का त्याला आर्थिक सक्षम केलं नाही? का वडापावच्या गाडी पुरतं ठेवलं? असे प्रश्न उपस्थित करत नितेश राणे यांनी संजय राऊतांचा खरपूस समाचार घेतला.
पुढे नितेश राणे म्हणाले, पत्राचाळमध्ये काय मराठी माणसं राहत नव्हती? खंबाटा आणि एअर इंडियामध्ये मराठी कामगार काम करत नव्हते का? मग त्याला जबाबदार कोण आहे? स्वतःच्या अंगावर मराठी माणसाच्या भविष्याचा खून करून बरबटलेलं जे रक्त आहे ते आधी पुसा आणि मग भाजप आणि शिंदे साहेबांवर बोट ठेवा, असा हल्लाबोल नितेश राणे यांनी केला.