आशी चौक्सीने मिळवून दिले कांस्यपदक
आतापर्यंत भारताची १८ पदकांची कमाई
हांगझोऊ : चीनमध्ये रंगलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत (Asian Games 2023) भारत आपल्या उत्तमोत्तम खेळाडूंसह चमकदार कामगिरी करत आहे. नेमबाजीत तर आजच्या दिवसात दुसरे सुवर्णपदक मिळवत भारताने आतापर्यंत एकूण पाच सुवर्णपदकांची कमाई केली आहे. ५० मीटर रायफल स्पर्धेत भारताच्या सिफ्ट कौर सामरानं (Sift kaur samra) सुवर्णपदक पटकावलं आहे. तर भारताची नेमबाज आशी चौक्सीनं (Ashi Chouksey) कांस्यपदक मिळवलं आहे. दरम्यान, भारताच्या खात्यात ५ सुवर्ण, ५ रौप्य आणि ८ कांस्यपदक अशी एकूण १८ पदकं आली आहेत.
याआधी २५ मीटर एअर पिस्तुल टीम इव्हेंटमध्ये मनु भाकर, इशा सिंह आणि रिदम सांगवानच्या टीमने सुवर्णपदक पटकावले. ५० मीटर रायफल स्पर्धेत सामरा हिने ४४३ गुणांसह अव्वल स्थान पटकावले. तर दुसऱ्या स्थानी ४४१.९ गुणांसह चीनची क्युंगो झांग आणि भारताची आशी चौकसी ४३७.८ गुणांसह तिसऱ्या स्थानी आहे.