धनगर शिष्टमंडळाच्या बैठकीनंतर गिरीश महाजन यांचं वक्तव्य
अहमदनगर : मराठा समाजाला आरक्षण (Maratha Samaj reservation) देण्याचा मुद्दा मार्गी लागतो न लागतो तोच धनगर आरक्षणाचा (Dhangar Reservation) मुद्दा पेटून उठला आहे. गेल्या २१ दिवसांपासून अहमदनगर (Ahmednagar) येथील चौंडी येथे सुरेश बंडगर आणि अण्णासाहेब रुपनवर हे उपोषण करत असून त्यांची प्रकृती अत्यंत खालावली आहे. त्यामुळे आज उपचारासाठी १५ जणांची विशेष वैद्यकीय टीम पाठवण्यात आली. शिवाय ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन (Girish Mahajan) यांनीदेखील चौंडी या ठिकाणी जाऊन उपोषणकर्त्यांची भेट घेतली. यावेळी झालेल्या चर्चेनंतर धनगर आरक्षणावर जवळपास मार्ग निघाला आहे, असं मोठं वक्तव्य गिरीश महाजन यांनी केलं आहे.
याआधी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी धनगर आंदोलकांशी फोनवरुन संवाद साधला होता. त्यांनी सरकार पाठीशी असल्याचे सांगत उपोषण मागे घेण्याचे आवाहन केले होते. मात्र कोणतेही ठोस आश्वासन नसताना कोणत्या आधारावर उपोषण सोडायचे असा सवाल आंदोलकांनी उपस्थित केला. त्यामुळे आज मंत्री गिरीश महाजन यांनी आज आंदोलनस्थळी जाऊन धनगर शिष्टमंडळाची भेट घेतली. यावेळेस झालेल्या बैठकीत सविस्तर चर्चा झालेली आहे. जवळपास मार्ग निघालेला आहे. उपोषणकर्त्यांना भेटून त्यांच्याशी चर्चा करून यातून मार्ग काढणार आहोत, असं महाजन यांनी स्पष्ट केलं.
दरम्यान, मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर महाजन म्हणाले, मराठा आरक्षणाची मुदत संपलेली नाही. त्यासाठी एक समिती नेमलेली आहे. न्यायमूर्ती शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली समितीचा तपास सुरू आहे आणि यातून निश्चित मार्ग निघेल. ठरवलेल्या कालावधीत निश्चितपणे चौकशी करून यातून योग्य तो मार्ग काढू, असं महाजन यांनी म्हटलं.
Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra