
नागपूर : मुसळधार पावसामुळे अंबाझरी तलाव ओव्हरफ्लो झाल्याने काही भागात पाणी शिरले. फक्त ४ तासात १०० मिमीपेक्षा जास्त पाऊस झाला. नागपूर जिल्हाधिकारी, मनपा आयुक्त हे घटनास्थळी पोहोचले असून तातडीने उपाययोजना केल्या जात आहेत. सखल भागात अडकलेल्या लोकांना आधी तातडीने मदत करावी अशा सूचना दिल्या आहेत. एनडीआरएफची एक आणि एसडीआरएफच्या दोन टीम बचाव कार्यात तैनात करण्यात आल्या आहेत, अशी माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.
राज्यात मान्सून पुन्हा सक्रिय झाला आहे. काल राज्यातील अनेक जिल्ह्यात जोरदार पाऊस (Maharashtra Rain) झाला. आजही हवामान विभागाने अनेक ठिकाणी पावसाची शक्यता व्यक्त केली आहे. हवामान विभागाने (Weather Update) दिलेल्या अंदाजानुसार, पुढील ४८ तासांत राज्यात पाऊस सक्रिय राहणार आहे. रायगड, भंडारा, गोंदियात तुरळक पाऊस होईल. नागपूरात सध्या प्रचंड पाऊस सुरू आहे.
नागपुरात काल रात्री मुसळधार पावसामुळे अंबाझरी तलाव ओव्हरफ्लो झाल्याने काही भागात पाणी शिरले आहे. अवघ्या 4 तासात 100 मिमीपेक्षा अधिक पाऊस झाल्याची माहिती जिल्हाधिकारी यांनी मला दिली. नागपूर जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्त हे घटनास्थळी पोहोचले असून तातडीने आवश्यक त्या उपाययोजना…
— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) September 23, 2023
पुढील दोन दिवसात अनेक जिल्ह्यांत विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस होईल. नाशिक, जळगाव, जालना, धुळे, नंदूरबार, छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यांत मुसळधार पावसाची शक्यता आहे. तर उर्वरित जिल्ह्यांना ग्रीन अलर्ट देण्यात आला आहे. पुण्यात रविवारी पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. या दिवशी पुणे शहरात मुसळधार पाऊस होईल अशी शक्यता आहे. ठाणे, रत्नागिरी, रायगड या जिल्ह्यांतही रविवारी मुसळधार पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. कोकण आणि गोव्यातही अनेक ठिकाणी जोरदार पाऊस बरसेल अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.
तसे पाहिले तर यंदा जुलै महिन्याच्या सुरुवातीचे काही दिवस सोडले तर समाधानकारक पाऊस झालेला नाही. ऑगस्ट महिना तर कोरडाच गेला. आता सप्टेंबर महिन्यात काही ठिकाणी पाऊस होत असला तरी तो अत्यंत अल्प आहे. मोठ्या पावसाची अनेक ठिकाणी प्रतिक्षा कायम आहे. आता जो पाऊस होत आहे तो पुरेसा नाही. त्यामुळे अनेक ठिकाणी दुष्काळसदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे चांगला पाऊस होईल याची वाट पाहिली जात आहे. समाधानकारक पाऊस झाला तर खरीप पिकांना जीवदान मिळेल. आता पावसाचा परतीचा प्रवास सुरू होईल त्यामुळे या काळात चांगल्या पावसाची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
रस्त्यावर वाहने बुडाली, दुकाने आणि घरांमध्ये शिरले पाणी
नागपूर शहरामध्ये न भूतो ना भविष्यती असा पाऊस झाला. त्यामुळे शहरातील अनेक भागांत नागरिकांच्या घरात पाणी शिरले. बसस्थानकातील बस पाण्यात बुडाल्या आहेत. प्रशासनाने महाविद्यालये आणि शाळांना सुट्टी जाहीर केली आहे.
एका रात्रीत अवघ्या ४ तासात १०६ मिलीमीटर झालेल्या पावसाने विस्कळीत झालेले नागपुरातील जनजीवन पूर्वपदावर आणण्यासाठी प्रशासन संपूर्ण क्षमतेने मदत कार्याला लागले आहे. मी स्वतः शहरात पाणी शिरलेल्या अनेक भागात फिरतो आहे. जनतेला दिलासा देत मदत करतो आहे. प्रशासनाशी संवाद करून अडचणी सोडवतो… pic.twitter.com/ertHlRV6Uv
— Chandrashekhar Bawankule (@cbawankule) September 23, 2023
दरम्यान पूरात अडकलेल्या लोकांना बाहेर काढण्यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उपाय-योजनाकरण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यानुसार एनडीआरएफची एक आणि एसडीआरएफच्या दोन तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत. मदत कार्य सुरू आहे. त्यामध्ये भाजपचे प्रदेशाध्यक्ष आणि नागपूरचे माजी पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी देखील या परिस्थितीचा आढावा घेतला. याबद्दल त्यांनी ट्विट करत माहिती दिली.