मुंबई : बदली झाल्यानंतरही कामावरती रुजू न झालेल्या महसूल विभागातील ११ अधिका-यांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. कामावरती रुजू होण्यासाठी या अधिका-यांना एप्रिल पासून अनेकदा कारणे दाखवा नोटीसही बजावण्यात आलेल्या होत्या. मात्र या अधिका-यांकडून प्रतिसाद न आल्याने अखेर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईमुळे महसूल विभागाने अधिका-यांना थेट गर्भित इशारा दिलेला पाहायला मिळतोय. मात्र वर्षानुवर्ष अनेक अधिकारी क्रीम पोस्ट वरती राहतात. त्यांचाही प्रश्न आता ऐरणीवर आला आहे.
आपल्या आवडीप्रमाणेच पोस्टिंग मिळाली पाहिजे हा अनेक शासकीय अधिकारी आणि कर्मचा-यांचा नेहमीच आग्रह पाहायला मिळतो. यासाठी ते मोठ्या प्रमाणावर वेगवेगळ्या माध्यमातून मनासारखी पोस्टिंग मिळवण्यासाठी कसरत करत असतात. हीच कसरत महसूल विभागातील काही अधिका-यांची ही सुरू होती. मात्र महसूल विभागाने या अधिका-यांवर कारवाईचा चांगलाच बडगा उगारलेला पाहायला मिळतोय. बदली झाल्यानंतर तब्बल पाच महिन्यानंतर ११ अधिकारी कामावर रुजू झाले नाही. या सर्वांवर थेट निलंबनाची कारवाई करण्यात आलेली आहे. त्यामुळे महसूल विभागातील अधिका-यांचे चांगलेच धाबे दणाणलेले आहेत.
एप्रिलमध्ये महसूल विभागातल्या बदल्या झाल्यानंतर जवळपास ३५ अधिकारी कामावर रुजू झालेले नव्हते. महसूल विभागाकडून त्यांना रुजू होण्यासाठी अनेकदा नोटीस काढल्या होत्या. त्यातील अनेक अधिकारी कामावर रूजू झाले. मात्र काही अधिकारी अद्यापही रुजू झाले नाही. अखेर या अधिका-यांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.
राज्यात मुंबई, पुणे, अमरावती, औरंगाबाद नागपूर आणि नाशिक असे सहा महसूल विभाग आहेत. या महसुली विभागापैकी नागपूर आणि अमरावतीसाठी अधिकारी रुजू हेण्यास शक्यतो तयार होत नाहीत. त्यामुळे नागपूर विभागात रुजू न होणा-या सात तहसीलदारांना निलंबित करण्यात आल आहे.
निलंबित झालेल्या अधिका-यांची यादी
– विनायक थविल – (वडसादेसांगज, गडचिरोली)
– सरेंद्र दांडेकर – (धानोरा, गडचिरोली)
– बी. जे. गोरे – (ऐटापल्ली, गडचिरोली)
– पल्लवी तभाने – (संजय गांधी योजना, वर्धा)
– सुनंदा भोसले – (खरेदी अधिकारी, नागपूर)
– बालाजी सूर्यवंशी – (अप्पर तहसीलदार, नागपूर)
– सुचित्रा पाटील – (करमणूक शुल्क अधिकारी, नाशिक).
– इब्राहिम चौधरी – (निवासी उपजिल्हाधिकारी, यवतमाळ)
– अभयसिंग मोहिते – (निवासी उपजिल्हाधिकारी, अहमदनगर)
वर्षानुवर्षे क्रीम पोस्टिंगवर काम करणा-यांचे काय?
नाण्याच्या दोन बाजू असतात तशा प्रत्येक घटनेला दोन बाजू असतात. त्यातील या घटनेतील एक बाजू म्हणजे जे अधिकारी कामावर रुजू झालेले नाही, त्यांच्यावर थेट निलंबनाची कारवाई करून या विभागातील अधिका-यांना थेट इशारा दिलेला पाहायला मिळतो. मात्र दुसरी बाजूही तेवढीच महत्त्वाची आहे. विशिष्ट अधिकारी विशिष्ट क्रीम पोस्टिंगवरतीच वर्षानुवर्षे पाहायला मिळतात. त्याचा ही विचार कधी होणार का? हा ही प्रश्न तेवढाच ऐरणीवर आला आहे.