आपण विकसित भारत ते विकसनशील भारत या प्रवासाला निघालो
आता मोठी स्वप्ने पाहून आपण जागतिक स्तरावर आपला ठसा उमटवू
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा विश्वास
नवी दिल्ली : भारताच्या इतिहासात आजपासून संसदेच्या दोन्ही सभागृहांचे कामकाज नव्या इमारतीतून सुरु झाले आहे. परंतु जुन्या संसद भवनात अनेक ऐतिहासिक निर्णय घेण्यात आले. त्यामुळे आतापासून जुन्या संसदेच्या वास्तूला ‘संविधान सदन’ म्हणून ओळखले जाणार आहे. भारत नव्या ऊर्जेने पुढे सरसावतोय. मी लाल किल्ल्यावरून भाषण करताना सांगितले होते हीच योग्य वेळ आहे. देश ज्या दिशेने वाटचाल करत आहे त्यानुसार अपेक्षित परिणाम मिळणार आहेत. आपण जितक्या वेगाने काम करू तितक्या वेगाने आपली प्रगती होईल, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) यावेळी म्हणाले.
सेंट्रल हॉलला संबोधित करताना पीएम मोदी म्हणाले, अनेक महिला, तृतीयपंथीयांना या संसदेत न्याय मिळाला आहे. या संसदेने कलम ३७० हटवले. सेंट्रल हॉल आमच्या भावनांनी भरलेला आहे. या संसदेत ४१०० हून अधिक कायदे मंजूर झाले. जम्मू-काश्मीर आता विकास आणि शांततेच्या मार्गावर आहे. आता आम्ही नवीन संसद भवनात एका नवीन भविष्याचे उद्घाटन करणार आहे.
Addressing a programme in the Central Hall of Parliament. https://t.co/X1O1MBiOsG
— Narendra Modi (@narendramodi) September 19, 2023
मोदी म्हणाले, 1952 नंतर जगभरातील सुमारे 41 राष्ट्रप्रमुखांनी सेंट्रल हॉलमध्ये येऊन आपल्या खासदारांना संबोधित केले. येथेच 1947 मध्ये ब्रिटिश सरकारने सत्ता हस्तांतरित केली. हा सेंट्रल हॉलही त्या ऐतिहासिक क्षणाचा साक्षीदार आहे. याच दिवशी आपण आपले राष्ट्रगीत आणि तिरंगा स्विकारला होता. आता आपण विकसित भारत ते विकसनशील भारत या प्रवासाला निघालो आहोत. आता छोटी स्वप्ने पुरणार नाहीत. मोठी स्वप्ने पाहून आपण जागतिक स्तरावर आपला ठसा उमटवू शकतो. आपण सर्वाधिक लोकसंख्या असलेला देश आहोत. सर्वात मोठ्या लोकसंख्येमध्ये सर्वाधिक तरुणांची ही पहिलीच वेळ आहे.
ते पुढे म्हणाले, राजकीय फायद्यासाठी आम्ही कठोर निर्णय पुढे ढकलू शकत नाही. ते घ्यावेच लागतील. भारताला आता थांबायचे नाही, नवीन ध्येये ठेवायची आहेत. चांद्रयान-३ च्या यशानंतर भारतातील तरुणांचा कल विज्ञानाकडे वाढत आहे आणि आता आपण ही संधी घालवायची नाही.