- निसर्गवेद : डॉ. महालक्ष्मी वानखेडकर
पावसाळा, हिवाळा आणि उन्हाळा अशा प्रकारचे मिश्र हवामान भारतात असल्यामुळे भारत देश हा या पृथ्वीवरील सर्वात सुरक्षित आणि सुपीक देश आहे. विशेषतः भारतामध्ये ज्या देवभूमी आहेत, त्या सकारात्मक ऊर्जेमुळे आपण सर्वात जास्त सुरक्षित आहोत. निसर्गाने या भूमीचे संरक्षण आणि पंचतत्त्वाचे संतुलन याचे गणित अगदी व्यवस्थित केलेले आहे. निसर्गाचे हे गणित मानवाला कधीही समजणार नाही; परंतु त्या गणितात चुका हा मानव निसर्गाला करायला भाग पाडत आहे. परिणामी सर्वच जीवसृष्टीला नैसर्गिक आपत्तींना तोंड द्यावे लागत आहे. समुद्राकडून भूमीचे संरक्षण व्हावे यासाठी नैसर्गिक खारफुटीची रचना करण्यात आलीच आहे, या भूमीला सकारात्मक ऊर्जा देण्यासाठी पर्वतांवर नैसर्गिक औषधी वनस्पतींची योजना करण्यात आली आहे. अशा अनेक गोष्टी निसर्गाने त्याच्या योजनेनुसार या पृथ्वीचे संरक्षण आणि संवर्धन करण्यासाठी दिल्या आहेत. या सर्व पंचतत्वांच्या संतुलनाची पूर्ण जबाबदारी ही नैसर्गिक घटक तर पूर्ण करीत आहेतच; परंतु त्यांच्या संरक्षण आणि संवर्धनाची जबाबदारी ही मानवाची आणि या जीवसृष्टीची आहे. ब्रह्मांडातील अद्भुत शक्ती या जीवसृष्टीसाठी नैसर्गिकरीत्या कार्यरत आहे.
आपल्या ऋषीमुनींनी हा सर्व विचार करूनच या पंचतत्त्वाच्या सुदृढीकरणासाठी ग्रंथांप्रमाणेच शक्तिशाली मंत्रोच्चारातून समाजापर्यंत हे पोहोचविण्याचा प्रयत्न केला आणि त्यासाठी वेगवेगळ्या सणांच्या निर्मिती जीवसृष्टीतील घटकांचा विचार करूनच या प्रत्येक हवामान बदलानुसारच केलेल्या आहेत. आरोग्य सुदृढीकरणासाठी निसर्ग नियमानुसारच जीवनक्रम केला आहे; परंतु मानव आता अनेक सण साजरे करीत नाही, मंत्रोच्चार करत नाही. हिंदू संस्कृती आणि संस्कार पूर्णपणे विसरत चालला आहे. त्याचे परिणाम येणाऱ्या पिढीवर होत आहेत. आपले हिंदू ग्रंथ, मंत्र, सण पंचतत्त्वाबरोबर आपल्या दैनंदिन जीवनावर सकारात्मक परिणाम करणारे आहेत. सोने की चिडिया असणारा भारत आज सोने की चिडिया का नाही? याचा आपण विचार केला पाहिजे.
कोरोनानंतर हवामानामध्ये जो काही बदल झाला आहे तो समाजापर्यंत पोहोचला का? आपल्या प्रगती प्रकल्प आणि विध्वंसक प्रवृत्तीमुळे जे काही पृथ्वीवर बदल होत चालले आहेत ते किती भयावह आहेत याचा कधी कोणी विचार केला आहे का? जर विचार केला असता, तर आता तरी पूर्णपणे घातक विचारांची दिशा बदलून सर्व पंचतत्व सुदृढीकरणासाठी अगदी शुद्धपणे प्रयत्न केले असते. आधी तर हवामानातील बदल हे अत्यंत घातक होतेच; परंतु कोरोनानंतर ते अजून कित्येक पटींनी घातक झाले आहेत. याचे परिणाम सर्व जीवसृष्टीवर नकळतपणे होतच आहेत. कोरोनामध्ये आपण सर्वजण घरात बंद होतो. त्यामुळे खऱ्या अर्थाने प्रदूषणमुक्त ही धरती होती. ज्याचा आनंद इतर जीवसृष्टी म्हणजेच पशू-पक्षी, कीटक, वनस्पती सर्वजण घेत होते, स्वच्छंदीपणे जगत होते आणि त्यामुळे पूर्ण वातावरण-पंचतत्त्व स्वतःची शुद्धीकरण प्रक्रिया नैसर्गिकरीत्या करत होते. रोज सकाळी पावणेचार वाजता उठणारे पक्षी अडीच वाजता उठायचे आणि आता ते साडेपाच वाजता उठतात. याचे कारण आपण समजायला हवे.
लॉकडाऊन नंतर आपण परत विध्वंसक वृत्तीला सुरुवात केली आणि पंचतत्त्वाची अर्धवट शुद्धीकरण प्रक्रिया आपल्याला परत दुपटीने घातक झाली. वातावरणात नायट्रोजन, ऑक्सिजन, आरगॉन, कार्बन डायऑक्साइड, बाष्प आणि इतर वायू घटकांचा समावेश असतो. वायूमध्ये कार्बन डायऑक्साइडचे प्रमाण वाढले आहे आणि ऑक्सिजनचे प्रमाण कमी झाले आहे, एवढेच आपल्याला माहीत असते. हवेतील पातळपणा संतुलित राहण्यासाठी नायट्रोजनचा उपयोग होत असतो. खरं तर वातावरणातील या वायू घटकांचे प्रमाण असंतुलित झाले आहे. यामुळे खऱ्या अर्थाने अथपासून इतिपर्यंत असलेल्या सर्व जीवसृष्टीला हृदय कमकुवत होण्यासाठी पूरक आहे. फक्त झाडे लावल्याने पर्यावरण सदृढीकरण होत नाही, तर असे पर्यावरण संतुलनासाठी आवश्यक असणारे उपक्रम करणे आवश्यक आहे. या जगात खऱ्या अर्थाने या धरती मातेला वाचविण्यासाठी ज्या काही कर्मबंधन माहीत असणाऱ्या व्यक्ती कार्य करीत आहेत, त्याचमुळे आज आपण सर्वजण टिकून आहोत.
निसर्ग आपल्या कर्मात कधीच चुकत नाही; परंतु त्याच्या गणिताचे शेवटचे उत्तर “यथा ददाति, तथा गृह्णाति। यथा गृह्णाति, तथा ददाति।” म्हणजेच “जसे देतो तसे घेतो, जसे घेतो तसे देतो” हेच आहे.
dr.mahalaxmiwankhed [email protected]