
अजित पवार यांचा सल्ला
पुणे : गणेशोत्सव अवघ्या चार दिवसांवर येऊन ठेपला आहे. सगळीकडे गणरायाच्या आगमनाने लोक आनंदित झाले आहेत. मात्र सण-उत्सव साजरे करताना आपण परिस्थितीचे, कायदा आणि सुव्यवस्थेचे भान ठेवायला हवे, यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नागरिकांना काही महत्त्वाच्या सूचना दिल्या. आज पुण्यात बोलत असताना आपल्या राज्यातील शेतकऱ्यांसमोर उभं ठाकलेलं बिकट संकट, जातीय तेढ या सगळ्या मुद्द्यांवर भाष्य करत त्यांनी नागरिकांना प्रशासनास सहकार्य करण्याचे आवाहन केले. कृषी आणि क्रीडा क्षेत्रासाठीच्या सरकारच्या उपाययोजनांवर ते विशेषतः बोलले.
अजित पवार म्हणाले, श्री छत्रपती शिवाजी मार्केट यार्ड गणेशोत्सव मंडळातर्फे देण्यात येणारे विविध पुरस्कार आणि शेतकरी बांधवांसाठी मोफत भोजनाचा उपक्रम चांगला आहे. शेतकरी कष्टकरी आहे, लाखाचा पोशिंदा आहे. शेतमालातील चढउतार लक्षात घेऊन बाजारभाव शेतकऱ्यांना आणि ग्राहकांना परवडण्याच्यादृष्टीने शासनाकडून समन्वय साधण्याचा प्रयत्न केला जातो. राज्यातील काही भागात सध्या अवर्षणाची परिस्थिती आहे. गेल्या चार-पाच दिवसात काही ठिकाणी पाऊस झाला असला तरी तो पुरेसा नाही. शेतकऱ्यांसमोर बिकट संकट उभे राहिले असून पिकांचे नुकसान होत आहे. पीक विम्याची रक्कम शेतकऱ्यांना मिळवून देण्यासाठी, शेतकऱ्यांपुढील संकटावर मात करण्यासाठी शासन निधीची कमतरता पडू देणार नाही, असं ते म्हणाले.
कृषी उत्पन्न बाजार समितीच्या अडीअडचणी, शेतकऱ्यांच्या काही सूचना असतील तर त्या सोडवण्यासाठीचा प्रस्ताव सादर करावा. पणन मंत्री, संबंधित अधिकाऱ्यांसोबत बैठक घेऊन शेतकऱ्यांचे प्रश्न मार्गी लावले जातील. स्वच्छतेबाबत मार्केट यार्ड आणि पुणे महानगरपालिकेने समन्वय ठेवावा. पुणे येथील कृषी उत्पन्न बाजार समिती सर्वच बाबतीत पुढे राहील, तिचा नावलौकीक वाढेल यासाठी सर्वांनी प्रयत्न करावेत, अशी अपेक्षा उपमुख्यमंत्र्यांनी व्यक्त केली.
तरुण तरुणींमध्ये क्रीडा संस्कृती रुजवण्याचे कार्य सुरु
बालेवाडी येथे ऑलिम्पिक भवनाच्या उभारण्यासाठी ७५ कोटींचा आराखडा तयार करण्यात आला आहे. त्याला मूर्तस्वरुप देण्याचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. विभागीय, जिल्हा आणि तालुका क्रीडा संकुलासाठी निधी देण्यात येत आहे. देशाला पहिले ऑलिम्पिक पदक मिळवून देणाऱ्या स्व. खशाबा जाधव यांचा जन्म दिन आपण राज्य क्रीडा दिन म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे. खेळाडूंना प्रोत्साहन मिळावे म्हणून बक्षिसांच्या रकमेत वाढ करण्यात आली आहे. पुणे जिल्ह्यातून आता पुणे शहर, पिंपरी-चिंचवड शहर आणि पुणे ग्रामीण असे ३ संघ क्रीडा स्पर्धेत सहभागी होतात. यापूर्वी पुणे जिल्ह्यातून एकच संघ भाग घेत असे. एकंदरीतच राज्यात तरुण तरुणींमध्ये क्रीडा संस्कृती रुजवण्याचे कार्य सुरु असल्याचे त्यांनी सांगितले.