
शिंदे गटाच्या मागणीनुसार मुदतीत वाढ
मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी शिवसेनेतून बंड केल्याच्या घटनेला एक वर्ष उलटूनही अजून १६ आमदारांच्या अपात्रतेचा (16 MLA Disqualification) प्रश्न मार्गी लागलेला नाही. सुप्रीम कोर्टाने उद्धव ठाकरेंचा (Uddhav Thackeray) मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा म्हणजे झालेली मोठी चूक असं ठरवत ठाकरे आणि शिंदे यांच्यातील सत्तासंघर्षाचा निकाल एकनाथ शिंदे यांच्या बाजूने लावला. यावेळेस १६ आमदारांच्या अपात्रतेचा प्रश्न मात्र विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांकडे (Rahul Narvekar) सोपवण्यात आला. यावर ठरल्यानुसार आजपासून सुनावणी होणार होती. मात्र शिंदे गटाने मुदत वाढवून मागितल्याने आता दोन आठवडे हा निकाल लांबणीवर गेला आहे. त्यानुसार पुढील सुनावणी २ ऑक्टोबर रोजी होणार आहे.
आज होणार्या सुनावणीला ठाकरे गटाचे सर्व १४ आमदार व शिंदे गटाचेही आमदार उपस्थित होते. १२ वाजल्यापासून अनुक्रमणिकेनुसार एक एक करत ३२ याचिकांवर सुनावणी केली जाणार होती. मात्र शिंदे गटाच्या वकीलांनी कागदपत्रं मिळाली नसल्याने बाजू मांडण्यात अडचणी येत आहेत, असे सांगून वेळ वाढवण्याची विनंती केली. त्यानुसार नार्वेकरांनी वेळ वाढवत एका आठवड्यानंतर दोन्ही पक्षांना आपलं म्हणणं सादर करण्याचे आदेश दिले आहेत. मात्र, अंतिम सुनावणी २ ऑक्टोबर रोजी होणार आहे.
दरम्यान, शिंदे गटाचे आमदार सुहास कांदे (Suhas Kande) यांनी आपल्यालाही लवकरात लवकर निकाल हवा आहे, असे स्पष्ट केले. वकिलांना कागदपत्रं मिळत नसल्याने त्यांनी वेळ वाढवून मागितला आहे, मात्र शिंदेसाहेबांच्या आदेशानुसार आम्ही सर्वजण सुनावणीसाठी उपस्थित राहिलो. आम्हालाही लवकर निर्णय अपेक्षित आहे, असं ते यावेळेस म्हणाले.