
जळगाव : राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार पहिल्यांदाच जळगाव जिल्ह्यात आले असता, त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे सरकारचे लक्ष वेधले. मराठा समाजाला आरक्षण देताना (Maratha Reservation) ओबीसी कोट्यातून आरक्षण (OBC Reservation) दिल्यास ओबीसीमधील गरीब लोकांवर एक प्रकारे अन्याय होईल, असे देखील शरद पवार (Sharad Pawar) यांनी म्हटले आहे. त्यामुळे आरक्षणाचा कोटा वाढवण्याची आवश्यकता असल्याचे शरद पवार यांनी म्हटले आहे.
अनेक गावांमध्ये पिण्याच्या पाण्याची समस्या असून त्याकडे आतापासून सरकारने लक्ष देण्याची आवश्यकता आहे. त्यात लोड शेडींगची समस्या देखील चिंताजनक ठरत असल्याचा आरोप शरद पवार यांनी केला आहे. शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे सरकारचे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप देखील शरद पवार यांनी केला आहे.
यावर्षी हवा तेवढा पाऊस पडला नाही. पाऊस नसल्याने राज्याची स्थिती चिंताजनक आहे. अनेक ठिकाणी दुबार पेरणीची परिस्थिती असल्याचे शरद पवार यांनी म्हटले आहे. विमा कंपन्याच्या माध्यमातून एक रुपयात पीक विमा देण्याचा निर्णय सरकारने घेतला होता. त्यामुळे आशा निर्माण झाली होती. मात्र, आता शेतकऱ्यांना त्याचा फायदा मिळत नसल्याचा आरोप शरद पवार यांनी केला आहे. ही परिस्थिती केवळ जळगाव जिल्ह्यातील नव्हे तर मराठवाड्यासह अनेक ठिकाणी हीच स्थिती असल्याचे शरद पवार म्हणाले. विमा कंपन्यांमुळे शेतकरी संकटात सापडला असून त्याकडे सरकारने लक्ष देण्याची आवश्यकता असल्याचे शरद पवार यांनी म्हटले आहे.
दरम्यान, मराठा समाजावर झालेल्या लाठीचार्जवर देवेंद्र फडणवीस यांनी माफी मागितली आहे. त्यांनी माफी मागितली म्हणजे आदेश त्यांनीच दिले होते, अशी एक प्रकारे त्यांनी कबुली दिली असल्याचे शरद पवार यांनी म्हटले आहे. त्यांनी आता राजीनामा देण्याची मागणी देखील शरद पवार यांनी केली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर भ्रष्टाचाराचे आरोप केले होते. त्या आरोपांची सरकारने चौकशी करावी. त्या आरोपांवर आधी उत्तर द्या. पंतप्रधानांनी त्या आरोपांची वस्तुस्थिती सांगावी, असे आवाहन देखील शरद पवार यांनी केले आहे. नसता असे आरोप करु नये, असे आवाहन देखील शरद पवार यांनी केले आहे.