Chandrayaan 3 : भारताचा वैज्ञानिक सिंहनाद आणि काहींची कोल्हेकुई!

Share
  • विशेष : रवींद्र मुळे, नगर

कुठल्याही क्षेत्रात भारताला जेव्हा यश मिळते, तेव्हा स्वाभाविक तेथे तिरंगा फडकत असतो आणि देशाच्या फडकत असणाऱ्या तिरंग्यामुळे सर्व जनतेची छाती भरून येत असते. हा एक स्वाभिमानाचा विषय असतो. त्याचे राजकीयकरण होण्याऐवजी सामाजिक संदेशाचा विचार करून त्यातून काय पोहोचवायचे? याचा विचार होणे गरजेचे आहे.

२३ ऑगस्ट २०२३ रोजी देशात संध्याकाळी अभूतपूर्व वातावरण होते. फक्त क्रिकेट सामन्याच्या वेळी आमची देशभक्ती जागृत होते असे काहींना वाटत होते; परंतु २३ ऑगस्ट रोजी देशातील आम जनतेने चांद्रयान अभियान प्रकल्पाला मिळालेले यश ज्या पद्धतीने साजरे केले ते खरोखर उत्स्फूर्त देशभक्तीचे उत्कट दर्शन होते. अर्थात ज्यांची वृत्ती कायमच राजकारणातील लाभ आणि नुकसान या भोवती फिरत असते, त्यांनी वेगवेगळ्या प्रतिक्रिया व्यक्त करण्यास सुरुवात केली आहे. त्यांना समाज एकत्र येऊन देशभक्तीची अभिव्यक्ती करतो, हे मानवणारे नाही. त्यामुळे त्यांचे कवित्व असेच चालू राहणार आहे.

खेळ, युद्ध, विज्ञान किंवा कुठल्याही क्षेत्रात भारताला जेव्हा यश मिळते, तेव्हा स्वाभाविक तेथे तिरंगा फडकत असतो आणि देशाच्या फडकत असणाऱ्या तिरंग्यामुळे सर्व जनतेची छाती भरून येत असते. हा एक स्वाभिमानाचा विषय असतो. त्याचे राजकीयकरण होण्याऐवजी सामाजिक संदेशाचा विचार त्यातून काय पोहोचवायचे, याचा विचार होणे गरजेचे आहे.

देशाच्या गौरवाचे क्षण नकळत ज्या राजसत्तेच्या काळात येतात त्या राजसत्तेला, त्यावेळी असणाऱ्या नेतृत्वाला याचा काही प्रमाणात निश्चितच राजकीय फायदा होत असतो. इंदिराजी यांना १९७१ साली भारत-पाक युद्धातील विजयाचे श्रेय मिळाले आणि त्याचा राजकीय फायदाही मिळाला ही वस्तुस्थिती आहे. पोखरणची चाचणी करून जगाला आम्ही अण्वस्त्रधारी आहोत हे सांगण्याची गरज होती. तो विषय अनेक दिवस आधीच्या शासनाने बासनात गुंडाळून ठेवला होता. पण अटलजी यांनी सगळी आंतरराष्ट्रीय दडपणे झुगारून देत निर्णय घेतला आणि त्यानंतर त्या बंधनावर मात करत देशाची अर्थव्यवस्था पण योग्य वळणावर आणली. याचे श्रेय त्यांना द्यावेच लागेल. इतिहासाला तशी नोंद घ्यावीच लागेल.

इस्रोची स्थापना १९६९ साली झाली. त्यापूर्वीपासून अंतराळ क्षेत्रात भारताची प्रगती होण्यासाठी अनेक भारतीय शास्त्रज्ञ प्रयत्न करत होते. पुढे माननीय एपीजे यांच्या नेतृत्वात या संस्थेने निर्णायक गती घेतली. क्षेपणास्त्रे विकसित झाली. उपग्रह निर्माण झाले. त्या शृंखलेत चांद्रयान अभियान हे महत्त्वाकांक्षी अभियान होते. २०१४ साली मोदी सरकार आल्यानंतर पंतप्रधान मोदी यांनी सर्वच क्षेत्रांत भारताला पुढे नेण्याचा ध्यास धरताना स्वतःचे कार्यक्षमता आणि समर्पण याचे उदाहरण प्रस्तुत केले आहे. आपल्या मनात असलेला ध्यास समाजमानसात बिंबवण्यामध्ये नेतृत्वाची खरी कसोटी असते आणि माननीय नरेंद्र मोदी यांनी क्रीडा, विज्ञान, संरक्षण, उद्योग या सर्व क्षेत्रांत त्यांचा असलेला ध्यास समाज मनावर आणि त्या त्या क्षेत्रातील मान्यवरांच्या मनात बिंबवत नेला आहे.

यश मिळवण्यासाठी कठोर मेहनत, त्या विषयातील पारंगत असण्याची आवश्यकता आणि योग्य प्रकारची साधनांची उपलब्धता आणि प्रोत्साहन देण्यासाठी आवश्यक ती कृतिशीलता या सगळ्यांची गरज असते आणि मोदीजी यांनी कठोर मेहनतीचे उदाहरण स्वतःच्या व्यवहारातून सर्वांच्याच समोर प्रस्तुत केले आहे, त्या त्या क्षेत्रातील पारंगत लोकांना निर्णयाचे स्वातंत्र्य दिले आहे, साधने उपलब्ध करून देण्यासाठी आवश्यक निर्णय घेतले आहेत आणि प्रोत्साहन देताना एक पालक म्हणून भूमिका पण बजावली आहे. हे निर्विवाद सत्य आहे.

मागील वेळी अपयश मिळाल्यावर मुख्य प्रकल्प प्रमुख मोदीजी यांच्या खांद्यावर डोके ठेवून रडले त्याची अनेकांनी चेष्टा केली. मोदीजी यांना अनेकांनी दूषणे पण दिली. पण आपल्या भावना आणि दुःख व्यक्त करण्यासाठी देशाच्या पंतप्रधानांचा खांदा डोके ठेवायला मिळणे आणि त्यातून सांत्वनपर मोदीजी यांचा पाठीवर हात फिरणे यातच कालच्या चांद्रयान अभियान ३ च्या यशाची बीजे रोवली गेली होती.

आज अनेकांचा जळफळाट होतो आहे की, या यशाचा फायदा मोदीजी यांना होणार आहे. त्यामुळे आमच्या महाराष्ट्रातील जाणत्यांनी ‘नेहरू यांनी विज्ञानवादी दृष्टिकोन दिला म्हणून चांद्रयान-३चे यश मिळाले’ असे म्हटले आहे. मग त्यासाठी इतकी वर्षे का लागली? आपण ज्या सरकारमध्ये होता त्या सरकारच्या काळात का नाही ही उपलब्धी झाली? असे प्रश्न उपस्थित केले, तर याचे उत्तर त्यांना देता येणार नाही. कारण याचे उत्तर त्यांच्याकडे नाही. मोदीजी यांच्यावर टीका करणाऱ्या आमच्या दीदींनी तर थेट राकेश रोशन यांनाच चंद्रावर पाठवून दिले. असले राजकारणी बघितल्यावर यांना मोदींवर टीका करण्याचा कोणताच अधिकार नाही हे प्रकर्षाने जाणवते. मोदी द्वेषापायी यांना देशाची प्रगती नको आहे की काय? असे वाटायला लागते.

अनेक वर्षांच्या पारतंत्र्याचा परिणाम म्हणून पश्चिमी वसाहतवादी दृष्टिकोनाचा प्रभाव भारतातील राजकीय मंडळी, पत्रकार, विचारवंत आणि प्रकाश राजसारखे टिनपाट सेलिब्रिटी यांच्यावर इतका झाला आहे की, भारताच्या निर्भेळ यशाला ते नेहमीच अपशकुन करत आले आहेत. अशा प्रसंगात डावी इकोसिस्टिम पण लगेच गतिमान आणि कृतिशील होत असते. रशियाच्या यानाला चंद्राच्या दक्षिण दिशेला उतरता आले नाही ते त्यात अयशस्वी झाले. मग भारत कसा काय यशस्वी होतो? ही खंत बीबीसीपासून सगळ्यांना आहे. त्यामुळे इथल्या राजकारण्यांना हाताशी धरून भारताच्या यशात कुठेतरी काही तरी शोधण्याचा प्रयत्न आणि मोदीजी यांना याचे श्रेय मिळू नये यासाठी प्रयत्न करणे हा या सगळ्यांचा मुख्य उद्देश आहे.

वास्तविक गेल्या १० वर्षांत इस्रो ही संस्था जनसामान्यांची व्हावी, ग्रामीण भागातील अनेक हुशार विद्यार्थ्यांना तिकडे जाण्याचे आकर्षण निर्माण व्हावे यासाठी योजनाबद्ध प्रयत्न केले गेले जात आहेत. या चांद्रयान अभियानात ही अनेक असे शास्त्रज्ञ सामील होते आणि त्यात महिलांचे प्रमाण हे लक्षणीय होते. भारतातील महिलांच्या नकारात्मक स्थितीबद्दल बोलणारे जाणीवपूर्वक या गोष्टीकडे दुर्लक्ष करतात, हा भाग वेगळा.

आणखी एक मुद्दा भारताच्या प्रगतीला रोखण्यासाठी पुढे केला जातो! यातून सामान्यांचे काय भले होणार? यापेक्षा गरिबांसाठी काही योजना करता आल्या नसत्या का? वगैरे, वगैरे. देशाच्या आत्मसन्मान संबंधित कुठल्याही विषयाला आर्थिक मापदंड लावून भ्रम निर्माण करण्याचा हा काही मंडळींचा जुना खेळ आहे. मग राम मंदिराची उभारणी असो, संसद भवनाचे बांधकाम असो किंवा चांद्रयान अभियान असो. काही गोष्टींचे परिणाम हे दूरगामी असतात हे आपण लक्षात घेऊन समाजाच्या प्रगतीला या भ्रमात अडकवू न देता पुढे गेले पाहिजे.

यापूर्वी पण कोरोना व्हॅक्सिनच्या वेळेस ज्यांना भारताच्या १४० कोटी जनतेच्या बाजारपेठेवर डोळा ठेवून पैसे कमवायचे होते. त्यांचे मनसुबे भारतीय शास्त्रज्ञांनी उधळून लावले. पण त्याला मोदी व्हॅक्सिन म्हणून संबोधून ते घेऊ नका म्हणणारी नतद्रष्ट मंडळी हीच होती.

जणू काही २०२४ पर्यंत भारत कुठल्याच क्षेत्रात यशस्वी होऊ नये असे प्रयत्न किंवा मनसुबे यांचे आहेत की काय असे वाटावे इतकी खालच्या पातळीवर ही सर्व मंडळी गेली आहेत. कुठल्याही प्रकारे भारताची होणारी प्रगती किंवा यश मोदींना फायद्याचे आहे, या भयाने ग्रासलेले हे विरोधक कदाचित आगामी होणाऱ्या क्रिकेटच्या विश्वचषक स्पर्धेच्या बाबतीत पण अपशकुन करण्यास मागे-पुढे पाहणार नाहीत!

या यशामुळे या सगळ्या डाव्या इको सिस्टीमला दुःख होण्याचे अजून एक कारण म्हणजे या वैज्ञानिकांची ईश्वराप्रती असणारी श्रद्धा हे पण आहे. डाव्या लोकांची धर्म ही अफूची गोळी ही कल्पना फक्त हिंदूंच्या पुरती मर्यादित आहे. मग सगळे वैज्ञानिक बालाजीचे दर्शन घेतात म्हणजे हे कसले आले आहेत वैज्ञानिक असे म्हणतच होते आणि त्यामुळेच हे चांद्रयान अभियान अयशस्वी ठरले. म्हणजे हिंदूंच्या श्रद्धेची टिंगलटवाळी करण्याची नामी संधी मिळणार, असे त्यांना वाटत होते. पण त्यांच्या दुर्दैवाने आणि भारताच्या भाग्याने भारताचे पाऊल चंद्रावर पोहोचले आणि या डाव्या इकोसिस्टीमचे सगळे मनसुबे उधळले गेले. त्यात या लोकांच्या दुर्दैवाने रशियाने घाईघाई पाठवलेले यान अपयशी ठरले, हे त्यांचे आणखी एक दुःखाचे कारण!

मुळात ग्रहमाला आणि अंतराळ यांच्याशी आमचे वैज्ञानिक आणि भावनिक दोन्ही प्रकारचे नाते आमच्या हिंदू/भारतीय तत्त्वज्ञानात अधोरेखित केले गेले आहे. अंतराळातील ग्रहांच्या आधारावर निर्माण झालेले ज्योतिष विज्ञान ही भारताची जगाला अभूतपूर्व भेट आहे; परंतु ज्ञानाचे हे भांडार तक्षशीला आणि नालंदाच्या आगीत भक्ष झाले आणि या ज्ञानाला अंधश्रद्धेच्या भोवती विणले गेले.

चंद्र हे तर आमचे अधिकच आकर्षणाचे ठिकाण. त्याला भाऊ म्हणून ओवळणाऱ्या भगिनी आणि मामा म्हणून कच्च्या-बच्च्यांना समजावून सांगणाऱ्या मातृशक्तीची आमची संस्कृती. नवग्रह पूजन करणारे आम्ही! आमच्या तत्त्वज्ञानात केवळ पृथ्वी नाही, तर सर्व ग्रह, तारे यांच्यावर असणाऱ्यांच्या कल्याणाची कामना केली आहे. त्यामुळे चांद्रयान अभियान हे भारतीय कल्याणकारी विचार पृथ्वीवरील मर्यादा ओलांडून पुन्हा आपले भावनिक नाते सर्व ग्रहसृष्टीवर नेण्याचा आधुनिक आविष्कार आहे.

शेवटी एकूणच आंतरराष्ट्रीय स्तरावरच्या घडामोडी या भारताच्या दृष्टीने सकारात्मक होत चालल्या आहेत. आर्थिक क्षेत्रात होणारी प्रगती, आत्मनिर्भर भारताचा मंत्र, स्टार्ट अपमध्ये होणारी वाढ, खेळामध्ये खेलो भारत अभियानातून होणारी प्रगती, नवे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण या सर्वांचा एकत्रित परिणाम म्हणून भारताने जणू आता कात टाकली आहे. भारत आता खऱ्या अर्थाने मानसिकदृष्ट्या स्वतंत्र होण्याच्या स्थितीत आहे. भारतीय जनमानस वसाहतवादी दृष्टिकोनाचा प्रभावातून बाहेर पडण्यास सज्ज झाला आहे.

या बदलत्या भारताला अमृत काळातून शताब्दीपर्यंतचा प्रवास करताना चांगली मनुष्यशक्ती आणि मनुष्यबळ तयार करण्याचे आव्हान आमच्यापुढे आहे. ब्रेनड्रेन थांबवून ब्रेनगेन तर होईलच. पण उद्या येथील व्यवस्था, तंत्र आणि तंत्रज्ञान चालवण्यासाठी इथलाच समाज सक्षम करण्याची ही वेळ आहे. त्या अर्थाने या वैज्ञानिक शंखनादचे प्रतिध्वनी सर्व क्षेत्रात उमटतील, या दृष्टीने प्रयत्नाला लागू या. अपशकुन करणारे प्रयत्न करत राहतील आणि एक दिवस शांत होतील. भारताची प्रगतीची वाटचाल आता कुणी रोखू शकेल, अशी अजिबात शक्यता नाही.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

 

Recent Posts

चंद्रपूर: येत्या २४ एप्रिल पर्यंत उष्णतेचा ‘येलो अलर्ट’

चंद्रपूर : गेल्या आठवड्यापासून चंद्रपूर जिल्ह्याला तीव्र उन्हाचा तडाखा बसत असून दिनांक २१ ते २४…

21 minutes ago

KKR vs GT, IPL 2025: गुजरातविरुद्ध घरच्या मैदानावर कोलकत्त्याचा लाजिरवाणा पराभव

कोलकाता: इंडियन प्रीमियर लीग २०२५मध्ये कोलकाता नाईट रायडर्सचा गुजरात टायटन्सविरुद्ध लाजिरवाणा पराभव झाला आहे. गुजरातने…

7 hours ago

उबाठाला राणेंचा दणका! सिंधुदुर्गात होणार १५०० कार्यकर्त्यांचा पक्षप्रवेश!

२४ एप्रिलला एकनाथ शिंदे यांची शक्तिप्रदर्शन सभा! सिंधुदुर्ग : राज्याचे उपमुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख एकनाथ…

8 hours ago

ही कणकवली नव्हे, कुडाळ आहे! निलेश राणे यांच्याशी पंगा नको!

माजी नगरसेवक राकेश कांदे यांचा वैभव नाईकांना थेट इशारा सिंधुदुर्ग : चेंदवण येथील सिद्धिविनायक उर्फ…

8 hours ago

नाल्यातून गाळ काढताना ३० सेकंदाचा व्हिडीओ कंत्राट कंपनीला बंधनकारक

लहान नाल्यातील गाळ काढण्यापूर्वीचे आणि नंतरचे सीसीटीव्हीद्वारे चित्रीकरण मुंबई (खास प्रतिनिधी): पावसाळापूर्व कामांचा भाग म्हणून…

9 hours ago

PM Modi : आजची धोरणं, उद्याचं भारत! – पंतप्रधान मोदींचा नागरी सेवकांना मंत्र

PM Modi : आजची धोरणे, निर्णय पुढील हजार वर्षांच्या भविष्याला आकार देणार आहेत : पंतप्रधान…

9 hours ago