
एसटी वाहतूकही बंद राहणार
सोलापूर : जालना जिल्ह्यात आरक्षणाच्या मुद्द्यावर मराठा समाजाच्या (Maratha Reservation) चालू असलेल्या आंदोलनावर (Jalna Maratha Andolan) पोलिसांनी लाठीचार्ज केल्याची घटना काल घडली. या घटनेचा सर्वच स्तरांतून निषेध व्यक्त करण्यात येत आहे. सोलापूर जिल्ह्यातही या घटनेच्या निषेधार्थ सकल मराठा समाजाच्या (Sakal Maratha Samaj) वतीने संपूर्ण जिल्हाभर प्रत्येक तालुक्यातून जाणारे राष्ट्रीय महामार्ग व राज्य महामार्ग रविवारी ३ सप्टेंबरला सकाळी दहा ते अकरा या वेळेत एक तास बंद करण्याचे ठरले आहे. यावेळेस संपूर्ण जिल्ह्यातील मराठा समाजातील तरुणांना रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याचे आवाहन केले आहे.
सोलापूर शहर, करमाळा, माढा, मोहोळ, सांगोला, पंढरपूर, बार्शी, अक्कलकोट, दक्षिण सोलापूर, उत्तर सोलापूर या ठिकाणी त्या त्या तालुक्यातील लोकांनी रास्तारोको (Rasta Roko Andolan) करून जाहीर निषेध दर्शवायचा आहे, असं आवाहन सकल मराठा समाज, सोलापूर जिल्ह्याच्या वतीने करण्यात आलं आहे.
मराठा आंदोलक आक्रमक झाल्यानंतर काही ठिकाणी एसटी गाड्यांची तोडफोड तर काही ठिकाणी बस जाळण्याचे प्रकार घडत आहेत. संभाव्य नुकसान आणि प्रवाशांची सुरक्षितता, यामुळे सध्या राज्यातील बहुतेक जिल्ह्यांमधील एसटी वाहतूकही बंद ठेवण्यात येणार आहे. पोलिसांच्या सूचना आल्यावरच त्याठिकाणी बससेवा सुरू होणार आहे.
नेमकं प्रकरण काय?
जालना येथे मराठ्यांना आरक्षण मिळावे म्हणून शांततेच्या मार्गाने आमरण उपोषण करणाऱ्या मनोज जरांगे पाटील यांना पाठिंबा दर्शविण्यासाठी जमलेल्या अबाल वृद्ध, महिला, पुरुष, लहान मुले यांच्यावर काल शुक्रवारी पोलिसांनी अमानुषपणे लाठीहल्ला केला. ग्रामस्थ शांततेच्या मार्गाने आंदोलनस्थळी बसले असताना पोलीस कर्मचारी मात्र फौज फाटा घेऊन दंगलीप्रमाणे हेल्मेट व संरक्षक जाळी घेऊन आंदोलन स्थळी जातात, याचाच अर्थ पोलिसांनी जाणून-बुजून हा हल्ला केला आहे, त्यामुळे त्याचा जाहीर निषेध समाजाच्या वतीने होत आहे.