Saturday, July 6, 2024
Homeताज्या घडामोडीMaratha Andolan : बंदोबस्त हटवला; मनोज जरांगेंचे तणावपूर्ण शांततेत पुन्हा आंदोलन सुरु!

Maratha Andolan : बंदोबस्त हटवला; मनोज जरांगेंचे तणावपूर्ण शांततेत पुन्हा आंदोलन सुरु!

जालना : आम्ही चार दिवसांपर्यंत तुमचा अन्याय सहन करत होतो, पण कालचा प्रकार गंभीर घडला. पण त्यानंतरही आम्ही शांततेत आंदोलन करु (Maratha Andolan) आणि आता तर आरक्षण घेऊनच आंदोलन थांबवू, असा निर्धार करत मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी हे आंदोलन पुन्हा सुरु केले आहे. अंतरवाली सराटी गावातून सध्या पोलीस बंदोबस्त हटवण्यात आला असून गावात तणावपूर्ण शांतता आहे.

स्वराज संघटनेचे प्रमुख संभाजीराजे छत्रपती यांनी आज (२ सप्टेंबर) आंदोनलस्थळी भेट दिली. दुपारी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारही आंदोलनस्थळी भेट देणार आहेत.

यावेळी बोलताना मनोज जरांगे पाटील म्हणाले, काल घडलेला प्रकार आम्ही मरेपर्यंत विसरणार नाही. आमचे गाव संपूर्ण माळकरी आहे. अत्यंत शांततेत हे आंदोलन सुरु होते. गृहमंत्री म्हणतात आमच्या पोलिसांना मारलं, अहो साहेब ही जनता तुमची आहे. या जनतेला मारायला नव्हते पाहिजे. हा केवळ आंदोलकांवर झालेला लाठीचार्ज नाही, संपूर्ण मराठा समाजावर झालेला हल्ला आहे. याचे परिणाम तुम्हाला भोगावेच लागतील. तुम्ही दोघेही जनतेच्या मनातून उतरला आहात. आता ज्यांनी काल हल्ला केला त्या सर्वांवर बडतर्फीची कारवाई सरकारने केली पाहिजे, केवळ निलंबन करुन चालणार नाही. तसेच मराठा समाजाला तातडीने आरक्षण द्या, अशी मागणीही जरांगे पाटील यांनी केली आहे.

मराठा आरक्षण व इतर मागण्यांसाठी जालन्यातील अंबड तालुक्यातील अंतरवाली सराटी येथे आंदोलन सुरू झाले होते. मनोज जरांगे यांच्या नेतृत्वाखाली उपोषण आंदोलन सुरू होते. या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी या तालुक्यातील वीस ते बावीस गावांमध्ये कडकडीत बंद पुकारण्यात आला होता. या आंदोलनाला पाठिंबा वाढू लागला होता. बीड जिल्ह्यातील गेवराई तालुक्यातील अनेक गावांतही बंद पुकारण्यात आला. येथील तरुणांनी आंदोलनाच्या समर्थनार्थ सराटी गावांत दुचाकी रॅली काढण्यात आली होती.

या आंदोलनाची दखल मुख्यमंत्री एकनाथ शिंदेही यांनी घेतली होती. गुरुवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मनोज जरांगे यांच्याशी मोबाइलद्वारे संपर्क साधला होता. परंतु जरांगे यांनी उपोषण मागे घेतले नाही. शुक्रवारी अनेक गावांतून पाठिंबा वाढू लागला होता. त्यामुळे शुक्रवारी पोलिसांनी काही आंदोलनकर्त्यांना ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी मोठा गोंधळ उडाला. संतप्त झालेल्या आंदोलनकर्त्यांनी दगडफेक सुरू केली. तर पोलिसांनी प्रत्युत्तरात जोरदार लाठीचार्ज केला. त्यामुळे मोठा तणाव निर्माण झाला. यात काही पोलीस आणि आंदोलनकर्तेही जखमी झाले.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

 

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -