मराठवाडा वार्तापत्र: डॉ. अभयकुमार दांडगे
मराठवाड्यात यंदा पावसाने चांगलीच दडी मारली आहे. याचा प्रतिकूल परिणाम पिकांवर होत आहे. मराठवाड्यातील बीड, जालना, लातूर, परभणी, हिंगोली व छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यांमध्ये दुष्काळी स्थिती निर्माण झाली आहे. काही गावांमध्ये पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण झाली आहे. शेतीला पाणी न मिळाल्याने पिके करपली आहेत. कृषी विभागाकडून पिकांच्या नुकसानीचे सर्वेक्षण सुरू आहे. अशा परिस्थितीत मात्र मराठवाड्यात राजकीय पक्षांकडून आरोप-प्रत्यारोपांची राळ सुरू आहे. आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून राज्यातील सर्वच पक्ष आणि गटांनी मराठवाड्यावर लक्ष केंद्रित केले आहे. गेल्या आठवड्यात शरद पवार यांची बीडमध्ये सभा झाली.
शरद पवार दोन दिवस मराठवाड्यात होते. त्यानंतर २७ ऑगस्ट रोजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही बीड जिल्ह्यात सभा घेऊन आपली ताकद दाखविण्याचा प्रयत्न केला. हिंगोलीत उद्धव ठाकरे यांनी देखील २७ रोजी सभा घेतली, तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांनी ‘शासन आपल्या दारी’ हा कार्यक्रम रविवारीच परभणीमध्ये घेतला. राष्ट्रवादीतील अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी २६ ऑगस्ट रोजी छत्रपती संभाजीनगरमध्ये कार्यकर्ता मेळावा घेतला. याचबरोबर अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी देखील २६ ऑगस्ट रोजी वैजापूरमध्ये एका धार्मिक कार्यक्रमाला उपस्थिती लावली होती. राजकीय व्यक्तींच्या या सभांना आपापल्या परीने नागरिक हजेरी लावत आहेत. सभांना गर्दी तर होत आहे; परंतु ही गर्दी कोणी कशी जमवली हे सर्वच राजकीय नेत्यांना माहीत आहे. या गर्दीवरून एखाद्या नेत्याची किंवा पक्षाची लोकप्रियता किंवा नेत्यांप्रती असलेले प्रेम याची बांधणी करता येत नाही. काहीही असो; परंतु सध्या मराठवाड्यातील दुष्काळी स्थितीत राजकीय वातावरण ढवळून निघत आहे.
मराठवाड्यातील सहा जिल्ह्यांमध्ये सुमारे ४० लाख शेतकऱ्यांसमोर येणाऱ्या काळात मोठे संकट उभे राहणार आहे. बँक, सावकार आदींकडून घेतलेले कर्ज कसे फेडणार या विवंचनेत शेतकरी आहेत. ऑगस्टनंतर सप्टेंबरमध्येही सरासरीपेक्षा कमी पाऊस पडण्याची शक्यता शास्त्रज्ञांनी वर्तवली आहे. अशा दुष्काळसदृश परिस्थितीत मराठवाड्यात निर्धार सभा, स्वाभिमान सभा, कार्यकर्त्यांचा मेळावा यावर राजकीय मंडळींनी जोर दिला आहे. परभणी येथे झालेल्या कार्यक्रमात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मराठवाड्याला दिलासा मिळेल, असे आश्वासन पुन्हा एकदा दिले. मराठवाड्यातील दुष्काळ कायमस्वरूपी कमी करण्यासाठी वॉटरग्रीड हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प हाती घेतला आहे, हा प्रकल्प पूर्ण करण्यासाठी वीस हजार कोटी रुपयांची गरज आहे. यासाठी केंद्र सरकारकडे पाठपुरावा करू, असे आश्वासन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी परभणी येथील कार्यक्रमात दिले. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देखील बीड येथील कार्यक्रमात पाणीटंचाईच्या मुद्द्यावर हात घातला. मराठवाड्यातील पाणीटंचाईचे संकट दूर करण्यासाठी आम्ही तिन्ही नेते प्रयत्नशील आहोत, असे ते म्हणाले. राज्यात शिवसेनेत दोन गट पडल्यापासून एकमेकांत आरोप-प्रत्यारोपाचे सत्र आजही सुरू आहे.
परभणीत ‘शासन आपल्या दारी’ या उपक्रमात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाकरे गटाचे नेते उद्धव ठाकरे यांच्यावर तोफ डागली, तर हिंगोलीतील सभेत उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि भाजपवर जोरदार टीकास्त्र सोडले. ऑनलाइन काम करणाऱ्यांना आम्ही एका झटक्यात लाईनवर आणले, असा टोला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लगावला, तर उद्धव ठाकरे यांनी ‘शासन आपल्या दारी, अन् थापा मारते लई भारी’ असे सांगत शेतकऱ्यांवर अन्याय होत असल्याची टीका केली. दरम्यान बीडमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी घेतलेल्या सभेत त्यांच्या सहकाऱ्यांनी शरद पवार यांच्यावर नाव न घेता टीका केली व त्यांना अनेक प्रश्न सभेतून उपस्थित केले. दरम्यान बीड येथे झालेल्या सभेत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या करिश्मामुळे उपमुख्यमंत्री झालो, अशी स्पष्ट कबुली दिली.
बीड येथील सभेचे संयोजक व कृषिमंत्री धनंजय मुंडे तसेच पक्षाचे कार्यकारी अध्यक्ष प्रफुल्ल पटेल, छगन भुजबळ, हसन मुश्रीफ, माजी आमदार अमरसिंह पंडित आदी नेत्यांनी नाव न घेता शरद पवार यांच्यावर टीका केली व त्यांना अनेक प्रश्न विचारले. मराठवाड्यातील हिंगोली व नांदेड जिल्हा वगळता अन्य जिल्ह्यात पाऊस नसल्याने सोयाबीन, मका, कापूस, उडीद, मूग या पिकांनी माना टाकायला सुरुवात केली आहे. खरिपात सोयाबीन या नगदी पिकाचा पेरा दरवर्षीप्रमाणे यंदाही वाढलेला आहे. हे पीक तीन महिन्यांत तयार होते. त्यातही दोन ते अडीच महिने पुरेल असा व आवश्यक असलेला पाऊस पडलेला नाही. त्यामुळे खरिपाचे उत्पादन ५० टक्क्यांपर्यंत घटण्याची शक्यता आहे.
गतवर्षी सोयाबीन आणि कापूस उत्पादक शेतकऱ्यांनी चांगला भाव मिळावा म्हणून आलेले पीक घरातच ठेवले होते. पण भाव न मिळाल्याने त्याचाही पुढे मोठा प्रश्न निर्माण झाला होता. गेली तीन ते चार वर्षे चांगला पाऊस पडल्याने शेतकरी सुखात होता. मात्र, यंदा पावसाने त्याच्या तोंडचे पाणी पळवीत दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण केली आहे. मराठवाड्याची लोकसंख्या जवळपास एक कोटीच्या घरात आहे. त्यांच्या पिण्याच्या व शेतीच्या पाण्याचा मोठा प्रश्न उपस्थित झाला आहे. अशा गंभीर परिस्थितीत मराठवाड्यात मात्र आरोप-प्रत्यारोपांची राग सुरू आहे.