माझे कोकण: संतोष वायंगणकर
कोकणातला महत्त्वाचा असा सण म्हणजे गणेशोत्सव होय. हजारो चाकरमानी मुंबई, पुणे भागांतून कोकणात येत असतात. कोकण रेल्वे मार्गावर जादा रेल्वे गाड्या सोडण्यात आल्या आहेत. गणेशोत्सव, दिवाळी, डिसेंबर वर्षअखेर अशा सर्व हंगामात रेल्वेने प्रवासही नकोसा होऊन जातो एवढी प्रचंड गर्दी म्हणजे मुंगीलाही शिरायला वाव नाही अशीच काहीशी स्थिती रेल्वे प्रवासात होत असते. मात्र, तरीही कोकणातील उत्सव काळात अनंत अडचणींना सामोरे जात कोकणवासीय कोकणात येत असतात. जेवढे प्रवासी कोकण रेल्वेने येतात तितकेच प्रवासी मुंबई-गोवा महार्मावरून येतात. मुंबई-गोवा महामार्गाचे काम गेली वीस वर्षे रखडले आहे. त्याची अनेक कारणे आहेत. गणेशोत्सव जवळ आल्याने अनेकांना कोकणवासीयांची आठवण झाली. याला मुंबई, ठाणे, डोंबिवली महानगरपालिकांच्या निवडणुकांचीही पार्श्वभूमी आहे. मात्र, यामध्ये महाराष्ट्राचे सार्वजनिक बांधकाममंत्री म्हणून मुंबई-गोवा महामार्गाच्या संबंधी घेतलेली भूमिका अधिक महत्त्वाची आहे.
एका कालमर्यादेत मुंबई-गोवा महामार्गाची रायगड जिल्ह्यातील एका लेनचे काम पूर्ण करण्यासाठी ज्या पद्धतीने ते कष्ट घेत आहेत त्याला तोड नाही. गेल्या दोन महिन्यांत मुंबई-गोवा महामार्गाची महाराष्ट्राचे सार्वजनिकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी तब्बल सात वेळा प्रत्यक्ष पाहणी तर केलीच; परंतु ठरावीक कालावधीत गणेशोत्सव काळात मुंबईकर चाकरमान्यांना मुंबई-गोवा महामार्गावरून प्रवास करताना कमी त्रास होईल यासाठी अथक परिश्रम आणि प्रयत्नही केले आहेत. १० सप्टेंबरपर्यंत मुंबई-गोवा महामार्ग काही भागात एकेरी वाहतुकीसाठी योग्य व्हावा त्याचं नियोजन करून दिले आहे. एकिकडे मध्यंतरीच्या काळात पाऊस कोसळत होता. तेव्हाही बांधकाममंत्री रवींद्र चव्हाण या मार्गाच्या कामाच्या नियोजनात व्यस्त होते. सार्वजनिक बांधकाममंत्री म्हणून आणि कोकणचे सुपूत्र म्हणून रवींद्र चव्हाण यांनी मुंबईकर चाकरमान्यांचा मुंबई-गोवा महामार्गावरचा प्रवास सुखकर होण्यासाठी सारे प्रयत्न चालविले आहेत.
महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि केंद्रीय उद्योगमंत्री नारायण राणे यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन कोकणात गणेशोत्सव काळात कोकणवासीयांना प्रवास अधिक सुखकर होण्यासाठी मुंबई-गोवा महामार्गावर ज्या भागात रस्त्याचे काम अपूर्ण आहे त्या भागात मुंबईकर चाकरमान्यांची वाहतूक कोंडी न होता व्यवस्थितरीत्या प्रवास करता यावा यादृष्टीने निधी कमी पडू न देता रस्ताकाम गतीमानतेने होण्यासाठी निर्देश द्यावेत असे नारायण राणे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निदर्शनास आणून दिले होते. यामुळे मुंबई-गोवा महामार्गाच्या या कामात सुरुवातीपासूनच सार्वजनिक बांधकाममंत्री रवींद्र चव्हाण यांनी कालबद्धतेत काम पूर्ण करण्याचे नियोजन केले होतेच. याच कामात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजितदादा पवार या सर्वांचे अधिक बारकाईने लक्ष आहे. यामुळेच १० सप्टेंबरपर्यंत किमान एक लेन तरी पूर्ण होईल अशी अपेक्षा आहे. डिसेंबर अखेरपर्यंत मुंबई-गोवा महामार्गाचे काम पूर्ण होईल, असे केंद्रीय रस्ते विकास मंत्री नितीन गडकरी यांनी यापूर्वीच जाहीर केले आहे. त्यामुळे डिसेंबरअखेर या मार्गाचे काम पूर्ण होईल हा विश्वास बाळगायला काहीच हरकत नसावी.
‘नकटीच्या लग्नाला सतराशे विघ्न’ तशी मुंबई-गोवा महामार्गाच्या कामाला गती येतेय असं वाटत असतानाच अडथळेही तेवढेच येत असतात. ही सर्व अडथळ्यांची शर्यत पार करीत काम सुरू आहे. अपयश आले तर त्या अपयशाला धनी व्हायला कोणी तयार नसतो. यशाचे बाप हजार असे म्हणतात. आजच्या घडीला या सगळ्याला छेद देण्याचे काम महाराष्ट्राचे सार्वजनिक बांधकाममंत्री रवींद्र चव्हाण यांनी केले आहे. सकारात्मकतेने कोणत्याही स्थितीत मुंबई-गोवा महामार्ग ठरावीक कालमर्यादेत पूर्ण करायचाच हा निर्धार करूनच रवींद्र चव्हाण कामाला लागले आहेत. या महामार्गाच्या कामाच्या बाबतीत इतक्या मायक्रो लेव्हलला काम चालले आहे की, कोणत्याही स्थितीत या गणेशोत्सवात रायगड जिल्ह्यातील ज्या भागात महामार्गाचे काम अपूर्ण आहे ते काम पूर्ण करून घेण्याचा निर्धार करूनच त्यांनी प्रयत्न सुरू केले. त्यात यशही मिळत आहे. अवघड वाटणारा रस्ताही आता केवळ सकारात्मकतेने होतोय.
मुसळधार पावसाचा पालघरमध्ये पहिला बळी पालघर : मुंबई, ठाण्यासह उपनगरीय भागात काल रात्रभर जोरदार पाऊस…
मुंबई : कांदिवली पश्चिमेकडील पोयसर नदीवर बसवण्यात आलेल्या सक्शन पंपाचे पाईप फुटल्याने आज कांदिवलीत मोठ्या…
मुंबई मनपा, पोलीस प्रशासन आणि आपत्कालीन यंत्रणेला सहकार्य करा : एकनाथ शिंदे अजित पवार यांनीही…
हार्बर रेल्वे तसेच मेल एक्स्प्रेस रद्द झाल्याने अडकलेल्या प्रवाशांच्या सोयीसाठी बससेवा मुंबई : मुंबईत काल…
मुसळधार पावसामुळे घडली दुर्दैवी घटना मुंबई : मुंबईसह ठाणे आणि उपनगरांत काल रात्रीपासून मुसळधार पाऊन…
मुंबई : राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात (Maharashtra Monsoon Sessions) आज एक महत्त्वाचा ठराव मांडला जाण्याची…