Dnyaneshwari : ज्ञानेश्वरी - त्रिवेणी संगम


  • ज्ञानेश्वरी : प्रा. मनीषा रत्नाकर रावराणे


अर्जुनाच्या मनाची ही तगमग ज्ञानदेव आपल्यापुढे ज्ञानेश्वरीतून चित्रित करतात. अर्जुनाची ही अवस्था समजून घेऊन त्याला समजावणारे श्रीकृष्णही ज्ञानेश्वरीतून साकारतात. या दोघांच्या स्वभावाचे, व्यक्तिमत्त्वाचे पैलू, रंग ज्ञानदेव रंगवतात. त्यामुळे ‘ज्ञानेश्वरी’ एक सुरस नाट्य वाटतं.


कथा, कविता आणि नाटक यांचा त्रिवेणी संगम म्हणजे श्रीज्ञानेश्वरी! मोहाने व्याकूळ झालेला अर्जुन! त्याला समजावू पाहणारे श्रीकृष्ण! अर्जुन हा एक असामान्य वीर, पण तो एक संसारी माणूस! त्यामुळे त्याचं मन लढण्यासाठी माघार घेतं, कारण समोर सगेसोयरे! त्याच्या मनाची ही घालमेल, तगमग ज्ञानदेव आपल्यापुढे चित्रित करतात. अर्जुनाची ही अवस्था समजून घेऊन त्याला समजावणारे श्रीकृष्णही ज्ञानेश्वरीतून साकारतात. या दोघांच्या स्वभावाचे, व्यक्तिमत्त्वाचे पैलू, रंग ज्ञानदेव रंगवतात. त्यामुळे ‘ज्ञानेश्वरी’ एक सुरस नाट्य वाटतं. एकेका प्रसंगाच्या प्रभावी चित्रणातून हे कथानक पुढे सरकू लागतं. मग तो युद्धभूमीवरील शंखनाद असो की, श्रीकृष्णाने सारथी होणं असो किंवा अर्जुनाने दोन्ही सेना न्याहाळणं असो.


ही कथा प्रवाही करत पुढे पुढे नेण्याची किमया ज्ञानदेवांची रसाळ लेखणी करते. कवी म्हणून त्यांच्याविषयी काय बोलावं? साध्या साध्या गोष्टीत ज्याला अर्थ सापडतो, सौंदर्य जाणवतं तो कवी! ज्ञानेश्वर तर या काव्यशक्तीचा कळसच आहेत. अफाट कल्पना, चित्रमय दाखले, सुंदर शब्द, नादमय अक्षरं यांच्या मिलाफातून ज्ञानेश्वरी झाला आहे ‘काव्यग्रंथाचा रावो’ म्हणजे काव्याचा राजा असा ग्रंथ!
कथानकातील प्रसंगांना ज्ञानदेवांच्या परीसस्पर्शाने रसमय केलं आहे. उदाहरणादाखल दुसर्या अध्यायात आलेलं अर्जुनाचं भांबावलेपण, माघार घेणं, त्याविषयी श्रीकृष्णांचं मनोगत पाहूया. त्यात ज्ञानदेव काय सांगतात ते ऐकूया. ‘भगवान आपल्या मनात विचार करतात, या प्रसंगी अर्जुनाने हे काय आरंभिले आहे?’ (ओवी क्र. ८४)


‘ह्याची कोणत्या उपायाने समजूत पटेल? (ओवी क्र. ८५) याविषयी श्रीकृष्ण विचार करू लागले. त्यांचं वर्णन करताना माउली दाखला देतात तो भूतबाधा निवारणारा मांत्रिक किंवा असाध्य रोग दूर करण्यासाठी दिव्य औषधं देणारा वैद्य! किती साजेसे दाखले देतात! पुढे माऊली म्हणतात, मग श्रीकृष्णांनी रोषयुक्त भाषणास आरंभ केला. ज्याप्रमाणे आईच्या रागात गुप्तरूपाने स्नेह असतो. (ओवी क्र. ८७) किंवा कडू औषधाच्या आत अमृतासारखी गोडी असते, ती वरून दिसत नाही, तिचा परिणाम दिसतो. (ओवी क्र. ८९) त्याप्रमाणे वरकरणी रागाने; परंतु आत मायेने भरलेला उपदेश करण्यास श्रीकृष्णांनी आरंभ केला! कीं औषधाचिया कडवटपणीं। जैसी अमृताची पुरवणी।


ते आहाच न दिसे परी गुणीं। प्रकट होय॥ ओवी क्र. ८९.
ज्ञानदेव या दाखल्यातून श्रीकृष्ण-अर्जुन नात्याला रंग देतात. कसं आहे हे नातं? तर आई व मूल! हे नातं म्हणजे प्रेमाची परिसीमा! ज्याप्रमाणे आई मुलावर रागावते, पण अंतरंगात मुलाच्या कल्याणाची कळकळ असते. तीच तळमळ श्रीकृष्णांच्या ठिकाणी ज्ञानदेव दाखवतात. तसंच अर्जुनाला कृष्णांविषयी वाटणारी माया, जिव्हाळाही साकारतात. ते जणू मनाच्या रंगमंचावर हे भावनारंग मांडतात. म्हणून ‘ज्ञानेश्वरी’ वाचताना नाटक पाहिल्याचा आनंद मिळतो, तर ‘औषधाचिया कडवटपणीं। जैसी अमृताची पुरवणी’ यासारख्या सुंदर दृष्टान्तातून लयीची शिकवण मिळते. वाचताना ती श्रोत्यांच्या तनात आणि मनात झिरपू लागते. मग भोवतालची सृष्टी तशी दिसू लागते - अपार, अनंत! ‘ज्ञानेश्वरी’च्या भिंगातून!


(manisharaorane196@gmail.com)



Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

 
Comments
Add Comment

कोजागिरी पौर्णिमा आज! दूध चंद्रप्रकाशात कधी ठेवाल? जाणून घ्या पूजा विधी आणि महत्त्व

मुंबई: हिंदू धर्मात अश्विन महिन्यातील पौर्णिमेला 'कोजागिरी पौर्णिमा' किंवा 'शरद पौर्णिमा' म्हणून विशेष महत्त्व

कधी आहे संकष्टी चतुर्थी? जाणून घ्या गणेशाच्या बारा अवतारांचे महत्त्व

हिंदू पंचांगानुसार प्रत्येक महिन्यातील कृष्ण पक्षाच्या चौथ्या दिवशी संकष्टी चतुर्थी साजरी केली जाते. भगवान

Horoscope: दसऱ्याला बनतोय गुरू-बुध शक्तीशाली योग, या राशींना होणार लाभ

मुंबई: केंद्र योग आणि गुरु-बुध युतीमुळे मेष, कर्क, आणि धनु या राशींना १ ऑक्टोबर २०२५ च्या आसपास मोठा आर्थिक आणि

Navratri Ashtami kanya pujan 2025 : मुलींच्या पूजनाने पूर्ण होतील सर्व मनोकामना! महाअष्टमीला कन्या पूजनाचा विधी आणि शुभ मुहूर्त जाणून घ्या

नवरात्रोत्सव हा हिंदू धर्मातील शक्ती उपासनेचा एक अत्यंत पवित्र आणि महत्त्वाचा उत्सव आहे. या नऊ दिवसांमध्ये,

दसऱ्यानंतर ‘या’ राशींचे नशीब चमकणार! होणार धनलाभ आणि प्रगती

मुंबई: ज्योतिषशास्त्रानुसार, ग्रहांचे राशी परिवर्तन (गोचर) मानवी जीवनावर मोठा परिणाम करतात. लवकरच बुध ग्रह आपली

Navratri 2025 : नवरात्रीत कांदा आणि लसूण खाणं पाप? यावर प्रेमानंद महाराज काय म्हणाले?

शारदीय नवरात्र उत्सवाला २२ सप्टेंबरपासून भव्य सुरुवात झाली आहे. देशभरातील श्रद्धालूंनी या नऊ दिवसांच्या