
मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री घेणार आढावा
मुंबई : राज्यभरात पावसाने पाठ फिरवल्यामुळे बळीराजा प्रचंड चिंतेत आहे. मराठवाड्यात तर बळीराजावर हातात तांब्या घेऊन त्याने थेंब थेंब पाणी घालून पिकांना वाढवण्याची वेळ आली आहे. मात्र, काही ठिकाणी प्यायलाही पाणी नसल्याने पिकांना कुठून पाणी आणायचे, या चिंतेने बळीराजा ग्रासला आहे. पिके करपून चालली आहेत पण पाऊस मात्र पडायचे नाव घेत नाही. यावर तोडगा काढण्यासाठी राज्य सरकारने एक मोठे पाऊल उचलले आहे. यासाठी मंत्रालयात (Mantralaya) मुख्यमंत्र्यांच्या वॉर रुममध्ये (War room) दुष्काळ नियंत्रण वॅार रुम (Drought Control War Room) बनवण्यात येणार आहे.
मंत्रालयाच्या सातव्या मजल्यावर मुख्यमंत्र्यांची वॅार रुम आहे. या वॅार रुममध्ये दुष्काळ नियंत्रण वॅार रुम बनवण्यात येणार असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) हे या वॅार रुममधून दुष्काळी परिस्थितीचा आढावा घेणार आहेत. दुष्काळाच्या उंबरठ्यावर असलेली गावे, तालुके, जिल्हे, विभाग यांवर नजर ठेवली जाणार आहे. त्यांना वॅार रुमशी जोडून त्यांना दुष्काळी परिस्थितीतून बाहेर काढण्यासाठी उपाय योजना केल्या जाणार आहेत.
पाण्याचे आरक्षण केले जाणार
दुष्काळी परिस्थितीवर उपाय योजना म्हणून राज्यातील पाणी साठा आणि स्त्रोत यांच्या उपलब्धतेनुसार पाण्याचे आरक्षण केले जाणार आहे. नुकतंच राज्य सरकारने धरणातील पाणी साठ्याचे आरक्षण करण्याचे आदेश दिले होते. यानुसार उपलब्ध पाणी साठा पिण्यासाठी, शेतीसाठी, व्यावसायिक वापराकरता आरक्षित केला जाणार आहे. यासंबंधी विशेष अधिकारी नेमून आढावा घेतला जाणार आहे आणि त्यानुसार निर्णय घेतले जाणार आहेत. राज्यात सरासरी पेक्षा कमी पाऊस पडल्याने यंदा राज्यातील काही भागात दुष्काळी परिस्थिती उद्भवू शकते. यामुळे राज्य सरकारने मोठे पाऊल उचलले आहे.