Thursday, July 4, 2024
Homeताज्या घडामोडीDhananjay Munde : जो मैं बोलता हूँ, वो मैं करके दिखाता हूँ...

Dhananjay Munde : जो मैं बोलता हूँ, वो मैं करके दिखाता हूँ…

धनंजय मुंडेंकडून अजितदादांचं फिल्मी स्टाईलमध्ये कौतुक

मी कृषिमंत्री असलो तरी अनेक अडचणी : धनंजय मुंडे

बीड : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांची काल २७ ऑगस्टला धनंजय मुंडे यांचा मतदारसंघ असलेल्या बीडमध्ये जाहीर सभा पार पडली. या सभेत सत्तेत सहभागी झालेल्या राष्ट्रवादीच्या बंडखोर आमदारांनी जोरदार फटकेबाजी केल्याचं पाहायला मिळालं. यावेळी राज्याचे कृषिमंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांचं देखील भाषण प्रभावी ठरलं. यावेळेस कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी शरद पवारांवर (Sharad Pawar) निशाणा साधला तर अजितदादांचं तोंडभरुन कौतुक केलं.

धनंजय मुंडे म्हणाले, १७ ऑगस्टच्या पवार साहेबांच्या सभेत त्यांनी सांगितलं की या जिल्ह्याने साहेबांवर फार प्रेम केलं. प्रेम केलं पण त्या प्रेमाच्या पोटी या जिल्ह्याला साहेबांनी काय दिलं हा प्रश्नचिन्ह आहे. पण साहेबांचं उत्तरदायित्व विकासाच्या माध्यमातून आजपर्यंत या जिल्ह्याला कोणी दिलं असेल तर ते आदरणीय अजितदादांनी दिलं. म्हणून ही सभा उत्तराची नाही तर उत्तरदायित्वाची सभा आहे, असं धनंजय मुंडे म्हणाले.

धनंजय मुंडे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं कौतुक केलं, ते म्हणाले की, आजची सभा ही बीड जिल्ह्याच्या विकासाची, अस्मितेची, सन्मानाची आणि जिल्ह्यातील संपूर्ण दुष्काळ मिटवणारी सभा आहे. त्यासाठी आपला आवाज दिल्लीत गेला पाहिजे. बीड जिल्ह्याच्या फार मोठ्या अपेक्षा आहेत. त्या सर्व अपेक्षा आपण पूर्ण केल्या आहेत. उगाचच अजितदादांना ‘एकच वादा, अजितदादा’ म्हणत नाहीत. पुढे ते दादांना उद्देशून म्हणाले, एखाद्या पिक्चरच्या डायलॉगमध्ये तुमचं वर्णन करायचं झालं तर ‘जो मैं बोलता हूँ, वो मैं करके दिखाता हूँ… और जब मैं नहीं बोलता… पुढचं तुम्हाला सांगायची गरज आहे का?, असं म्हणताच सर्वांनी जोरदार टाळ्याशिटट्या वाजवल्या.

उत्तरदायित्व पुढे नेले ही चूक केली का?

पुढे ते म्हणाले की, बीड जिल्ह्यातील मान्यवरांनी अनेक अपेक्षा व्यक्त केल्या आहेत. आम्ही बीडकरांची सेवा करत राहणार आणि आमचे उत्तरदायित्व पार पाडणार. पण मला एका गोष्टीची खंत वाटते. माझा इतिहास सर्वांना माहिती आहे तरीही १७ तारखेच्या पूर्वसंध्येला माझा इतिहास विचारला गेला आणि धनंजय मुंडेंनी तो इतिहास जनतेला सांगावा असे सांगितले. माझ्या राजकीय इतिहासाच्या सुरुवातीच्या काळात अजितदादांनी मदत केली असेल तर अजितदादांचे नेतृत्व स्वीकारून उत्तरदायित्व पुढे नेले ही चूक केली का? स्व. मुंडे साहेबांच्या हाताला धरून संघर्ष केला. पुढे प्रश्नांसाठी संघर्ष करायचा, प्रश्न सोडवायचे हा माझा इतिहास आहे.

२०१४ ते २०१९ पर्यंत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने सर्वाधिक संघर्ष केला हे ‘लोक माझ्या सांगाती’ पुस्तकाच्या दुसऱ्या आवृत्तीमध्ये माझ्या दैवताने लिहीले आहे. त्यामध्ये विधानसभेपेक्षा विधान परिषदेच्या विरोधी पक्षनेत्याची कर्तबगारी जास्त होती असे सांगण्यात आले. हा माझा इतिहास आहे. आज सवाल इस बात का नहीं शिशा तुटा है, सवाल तो इस बात का है की पत्थर कहा से आया।”

मी कृषिमंत्री असलो तरी अनेक अडचणी आहेत…

माझ्या पाचवीला संघर्ष पुजला आहे. मी कृषी विभागाचा मंत्री असलो तरी अनेक अडचणी आहेत. तुम्ही आज शेतमजुराच्या पोराला कृषी विभागाची जबाबदारी दिली त्यामुळे तुम्हाला अभिमान वाटेल अशी जबाबदारी मी पार पाडेन, आज आदरणीय शरद पवार साहेबांच्या व्यासपीठावर आम्हाला संस्कार दिसत नाहीत. कोणीही उठावे आणि काहीही बोलावे हे साहेबांचे संस्कार नाहीत, असेही कृषिमंत्री धनंजय मुंडे यावेळी बोलताना म्हणाले.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

 

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -