मायभाषा: डॉ. वीणा सानेकर
सध्या महाविद्यालयांमध्ये अगदी चैतन्यशील वातावरण आहे. हा महिना विविध मंडलांच्या उद्घाटनांचा! मुले नुसती झपाटल्यासारखी उत्साहात वावरत असतात. चैतन्याने सळसळत असतात. वाङ्मय मंडळे ही मराठी विभागाचा श्वास असतात. इंजिनीअरिंग, मेडिकल, कायदा, विज्ञान इत्यादी महाविद्यालयांमध्ये मराठी विषय नसतो. पण तिथे वाङ्मय मंडळे असतात. एकांकिका स्पर्धांमध्ये भाग घेण्याकरता धडपडणारी मुले असतात. यातली काही मुले उत्तम मराठी गाणी गातात. लोककलांमधले कौशल्य व नैपुण्य दाखवतात. मराठीतून उत्तम कविता लिहितात. याचा अर्थ नव्या पिढीचेही आपल्या भाषेवर प्रेम आहे. त्यांना संगीत, साहित्य, कला या सर्व माध्यमांतून अभिव्यक्ती करणे आवडते. नि तसे असेल, तर महाविद्यालयांच्या मराठी विभागांना वर्षभरात एक-दोन कार्यक्रम करून चालणार नाह, तर सातत्याने मुलांना आपल्या भाषेशी जोडणारे उपक्रम शोधायला हवे.
मी गेली तीसपेक्षा अधिक वर्षे सोमय्या कला वाणिज्य महाविद्यालयात अध्यापन करते. ‘मराठी प्रबोधन’ हे आमचे वाङ्मय मंडळ. मराठी विषय निवडून साहित्याचा अभ्यास करणारे व त्याकरता पदवी स्तरावर व पुढेही मराठीचा अभ्यास करणारे विद्यार्थी संख्येने कमी-कमी होत आहेत. हे चित्र मुंबईसारख्या शहरात सर्वदूर आहे. मात्र मराठी वाङ्मय मंडळांच्या कार्यक्रमांमध्ये भाग घेणाऱ्या विद्यार्थ्यांची ऊर्जा मात्र आहे तशीच आहे.
साधारणपणे १९९५ पासून आमचा मराठी विभाग ‘आशय’ नावाचे हस्तलिखित प्रकाशित करतो. मुले अंकाकरिता विषय ठरवतात. ग्रंथालयात संदर्भ संशोधन करतात. सुंदर अक्षर असणारी मुले शोधून काढतात. याही वर्षी स्वातंत्र्याच्या सुवर्णमहोत्सवी वर्षाच्या परिपूर्तीची संकल्पना मुलांनी निवडली आहे.
कोरोना काळात मुलांनी यूट्यूब चॅनल सुरू केले. इन्स्टाग्राम, फेसबुक ही माध्यमे मुले मराठीच्या कार्यक्रमांकरिता वापरू लागली आहेत. वाङ्मय मंडळाचे शीर्षकगीत तयार करून ते सादर करायची जय्यत सुरू आहे.
काही दिवसांपूर्वी मला दिनकर गांगल सरांचा फोन आला ते नवी कल्पना सांगण्याकरिता. उत्साहाने भारलेला आवाज नि नावीन्यपूर्णतेचा ध्यास. तरुणाईशी संवाद साधायची जी सहजता मी त्यांच्याशी बोलताना अनुभवते, ती पाहिली की वाटते, तरुणाईकरिता हे असे सोबत असणे हीदेखील त्यांची ताकद ठरेल.
मुलं करत राहतील नवीन नवीन.
आपण फक्त सोबत असायचे.
ती लढतील आपल्या भाषेकरिता.
ती जगवतील नि जपतील तिला प्राणपणाने!