कविता : एकनाथ आव्हाड
बाबा म्हणाले, या वेळी
कोकणात सहलीला जाऊ
रायगड जिल्ह्यातील काही
ठिकाणं चला पाहू...
रायगडमधील थंडहवेचे
ठिकाण माथेरान
वृक्षराजींसोबत मस्त
आल्हाददायक हवामान...
रायगडमधील वरदविनायक
मंदिराचा अनोखा थाट
आजूबाजूचा प्रदेश सारा
होई लगेच तोंडपाठ...
रायगडमधील महाडचे
शांत चवदार तळे
पाण्याच्या सत्याग्रहावेळी
अशांत का ते कळे...
रायगडमधील रायगड किल्ला
लक्ष वेधून घेई
ऐतिहासिक परंपरेची
साक्ष सदैव देई...
रायगडमधील मुरुड जंजिरा
भव्य उभा जलदुर्ग
पराक्रमाच्या सांगून कथा
साहसाचा दावितो मार्ग...
रायगडमधील अलिबागचा
सागरकिनारा पाहू
चैतन्याने तो उसळून म्हणतो
आळसाला पळवून लावू...
रायगड दर्शनाच्या निमित्ताने
मनसोक्त फिरून येऊ
आनंदाच्या नव्या वाटा
सतत शोधत राहू...
काव्यकोडी : ए कनाथ आव्हाड
१) कच्च्याची लागते, आंबट फोड
पिकल्यावर होतो, मधुर गोड
कच्च्याचे लोणचे, लागे चवदार
पिकल्यावर पोळी होई, रूचकर फार
कोकणातून जेव्हा, येतो हा घरी
हवीहवाशी वाटे, चव जिभेवरी
रस याचा पिऊन, एकदा तरी पाहा
फळांचा राजा, कोण बरं हा?
२) सकाळच्या वेळी, हळूच डोकावतो
दुपारच्या वेळी, डोळे दिपवतो
संध्याकाळी क्षितिजाला, जाऊन टेकतो
रात्रीच्या कुशीत म्हणे, गुडूप झोपतो
हा एक आहे, तप्तगोल तारा
त्याच्याभोवती ग्रहांचा, केवढा पसारा
भास्कर, रवी याला, म्हणतात सर्वत्र
सांगा बरं हा कोण, आपला मित्र?
३) पर्वतावरून ती, धावत येते
सागरास शेवटी, जाऊन मिळते
गावागावाला, वळसा घालते
माहेरवासीणीशी, हितगुज बोलते
भूक, तहान ती, साऱ्यांची भागविते
अडचणीतून मार्ग, काढाया शिकविते
थांबत नाही, पुढे पुढे जाते
बाग, शेती, कोण फुलवते?
उत्तर :
१) आंबा
२) सू्र्य
३) नदी