
सातारा : सध्या पावसाने दडी मारल्याने शेतकरी चिंतेत आहे. सातारा जिल्ह्यात टंचाईची स्थिती गंभीर बनत चालली आहे. शिराळा तालुक्याचा अपवाद वगळता अन्यत्र पाऊस झालेला नाही. पेरण्या झालेल्या नाहीत. खरीप वाया गेला आहे. अशा परिस्थितीत कोयना धरणातील (Koyna Dam) पाणीसाठा अवघे ६८ टीएमसी आहे. या क्षेत्रात ७०० मिलिमीटर पावसाची अपेक्षा असली तरी धरण शंभर टक्के भरेल का, याबाबत चिंता व्यक्त करण्यात येत आहे.
१५ ऑक्टोबरपर्यंत हा पाऊस अपेक्षित असून त्यानंतर धरण पाणीसाठ्याचे नियोजन केले जाईल. तोवर सिंचन, वीजनिर्मिती, पिण्याचे पाणी याबाबतच्या धोरणात कोणताही बदल केला जाणार नाही, असे पाटबंधारे विभागाने स्पष्ट केले आहे. या स्थितीत जिल्ह्याची संपूर्ण भिस्त ही सिंचन योजनांवरच आहे. त्यात कोयना धरणावर अवलंबून टेंभू, ताकारी, आरफळ योजना, तर चांदोली धरणावर अवलंबून म्हैसाळ योजना महत्त्वाची आहे. या योजना सध्या पूर्ण क्षमतेने चालवल्या जात आहेत. त्यासाठी पुरेसा पाणीसाठाही उपलब्ध करून देण्यात आला आहे.
कोयना धरणातून सिंचन योजनांसाठी ३८ टीएमसी पाणी उपलब्ध केले जाते. परंतु, आता पावसाळ्यात उपसलेले पाणी आणि धरणातील पाणीसाठा कमी होणे चिंताजनक आहे.
कोयना व्यवस्थापन तूर्त याकडे तटस्थपणे पाहत आहे. जी काही धोरणे आखायची, ती १५ ऑक्टोबरनंतर, असे निश्चित केले आहे. कोयना धरणक्षेत्रात आतापर्यंत ४३०० मिलिमीटर पाऊस झाला आहे. आणखी ७०० मिलिमीटर पावसाची अपेक्षा आहे.
तो किती पडतो, यावरच पुढील सगळे धोरण बदलणार आहे. धरण शंभर टक्के भरले तर शेती, उद्योग, पिण्यासाठीचे पाणी आणि वीजनिर्मिती यासाठीच्या कोट्यात काहीही बदल होणार नाही, मात्र धरण कमी भरले तर मात्र परिस्थिती बिघडण्याची शक्यता आहे.