
विक्रम लँडर ज्या ठिकाणी उतरले त्या ठिकाणाचं पंतप्रधानांनी केलं नामकरण
बंगळुरु : भारताने अद्वितीय अशी कामगिरी करत चांद्रयान-३ (Chandrayaan-3) मोहिम फत्ते केली. संपूर्ण जगाने याची दखल घेत भारताचे अभिनंदन केले. चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर (South pole of Moon) उतरणारा भारत हा जगातील पहिला देश ठरला. या चांद्रयान मोहिमेच्या यशानंतर भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी आणखी एक मोठी घोषणा केली आहे. चांद्रयानातील विक्रम लँडर (Vikram Lander) ज्या ठिकाणी उतरले त्या ठिकाणाला यापुढे 'शिवशक्ती' (Shivshakti) या नावाने ओळखलं जाणार आहे. यानिमित्ताने भारताने चंद्रावर आपलं अढळ असं स्थान निर्माण केलं आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या ब्रिक्स परिषदेसाठी (BRICS) दक्षिण आफ्रिका व ग्रीसच्या दौर्यावर होते. भारतात दाखल होताच पंतप्रधान बंगळुरु येथील इस्रोच्या (ISRO)मुख्यालयात आले. त्यानंतर शास्त्रज्ञांशी संवाद साधण्यासाठी ते इस्रो कॅम्पसमध्ये पोहोचले. यावेळी भारताचे मून लँडर ज्या ठिकाणी चंद्रावर उतरले ते ठिकाण 'शिवशक्ती' म्हणून ओळखले जाईल, अशी घोषणा केली आहे.
तसेच चांद्रयान-२ ने चंद्राच्या ज्या पॉइंटवर गेलं होतं. त्या पॉइंटला तिरंगा (Tiranga) हे नाव दिलं जाणार आहे, अशी घोषणा मोदी यांनी केली. 'हा तिरंगा बिंदू भारताच्या प्रत्येक प्रयत्नाची प्रेरणा ठरणार आहे, हा तिरंगा बिंदू आपल्याला शिकवेल की कोणतेही अपयश अंतिम नसते.' असेही पंतप्रधान यावेळी म्हणाले. याचबरोवर शास्त्रज्ञांच्या चमूचे अभिनंदन करत त्यांनी अनेक गौरवोद्गार काढले.
जिथे कोणी पोहोचले नव्हते तिथे आपण पोहोचलो
पंतप्रधान मोदी म्हणाले, जिथे कोणी पोहोचले नव्हते तिथे आपण पोहोचलो. आपण ते केले जे यापूर्वी कोणी केले नाही. २३ ऑगस्टचा तो दिवस माझ्या डोळ्यांसमोर प्रत्येक सेकंदाला पुन्हा पुन्हा फिरतोय. टच डाउनची खात्री झाल्यावर इस्रो केंद्रात आणि देशभरात लोकांनी ज्या प्रकारे आनंद साजरा केला, ते दृश्य कोणीच विसरू शकणार नाही. काही आठवणी अजरामर होतात. तो क्षण अजरामर झाला.
तुम्ही रोल मॉडेल आहात
पंतप्रधान नरेंद्र मोदी इस्रोच्या शास्त्रज्ञांना संबोधित करताना म्हणाले, तुम्ही नवीन पिढीचे रोल मॉडेल आहात. तुमचे संशोधन आणि अनेक वर्षांच्या मेहनतीने हे सिद्ध झाले आहे की तुम्ही जे ठरवता ते तुम्ही करून दाखवता. देशातील जनतेचा तुमच्यावर विश्वास आहे आणि तो विश्वास संपादन करणे ही छोटी गोष्ट नाही. देशातील जनतेचे आशीर्वाद तुमच्याबरोबर आहेत.
भारताची गणना आता पहिल्या रांगेत
एक काळ असा होता जेव्हा आपली गणना तिसर्या रांगेत व्हायची. आज व्यापारापासून तंत्रज्ञानापर्यंत भारताची गणना पहिल्या रांगेत उभ्या असलेल्या देशांमध्ये होत आहे. तिसऱ्या रांगेपासून पहिल्या रांगेपर्यंतच्या या प्रवासात आपल्या इस्रोसारख्या संस्थांचा मोठा वाटा आहे, असं कौतुक पंतप्रधानांनी केलं.