राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार
कोल्हापूर : एकीकडे जगात देशाची मान उंचावत असताना दुसरीकडे आपल्या देशातील शेतकऱ्यांचे अतोनात हाल होत आहे. कांदा उत्पादक शेतकऱ्यांकडे केंद्र सरकार आणि राज्य सरकार ढूंकून बघायला तयार नाही. यवतमाळ जिल्ह्यातील १८ दिवांसत २४ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. असे असतानाही त्या प्रश्नाकडे पाहले जात नाही. तर मणिपूर जळत असताना तिथे आया बहिणींची अब्रु लुटली जात असतानाही केंद्र सरकार त्यांच्याकडील ताकदीचा वापर करत नाही. तेव्हा आया बहिणींची अब्रु सांभाळण्याची ज्यांच्याकडे ताकद नाही त्यांना सत्तेत राहण्याचा अधिकार नाही, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी म्हटले आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसची स्वाभिमानी सभा कोल्हापूर येथील दसरा मैदानात आयोजित करण्यात आली होती या सभेचे अध्यक्ष स्थानिक छत्रपती शाहू महाराज होते. यावेळी मंचावर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, खासदार श्रीनिवास पाटील, आमदार रोहित पवार, राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड, अनिल देशमुख, महिला प्रदेश अध्यक्ष विद्याताई चव्हाण, प्रदेश युवक अध्यक्ष महबूब शेख, मुख्य प्रवक्ते महेश तपासे फोजीया खान, शशिकांत शिंदे, रोहित आर. आर. पाटील तसेच कोल्हापूर जिल्हाध्यक्ष तसेच प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.
शरद पवार पुढे बोलताना म्हणाले की, सध्या देशातील शेतकऱ्यांचे प्रश्न ज्वलंत आहेत. कांद्यावर केंद्रावर ४० टक्के निर्यात कर लावला. हे अन्यायकारक आहे. असे असतानाच मुख्यमंत्री म्हणतात तुम्ही कृषीमंत्री असताना कांद्यासाठी काय केले? तर मी त्यांना एवढेच सांगू इच्छितो की मी कृषी मंत्री असताना कांद्यावर कधीही निर्यात कर लावला नाही. जिरायत शेतकरी कांदा पिकवतो. त्या शेतकऱ्याच्या कांद्याला अधिक किंमत कशी मिळेल यासाठी मी प्रयत्न करणार मी असे कृषी मंत्री असताना लोकसभा अध्यक्षांना सांगितले होते. आपल्याला आपल्या राज्यातील तरुणांच्या हाताला काम द्यायचे आहे. त्यासाठी कारखाने आले पाहीजे असे असताना महाराष्ट्रात येणारे कारखाने गुजरातला नेले जात आहेत. इथल्या तरुणांना मिळणारी संधी घालवली जात आहे. याकडेही उघड्या डोळ्यांनी बघितले पाहीजे, असेही यावेळी शरद पवार साहेब यांनी म्हटले आहे.
शरद पवार याविषयी सविस्तर बोलताना म्हणाले की, कांद्यापाठोपाठ आता केंद्र सरकार साखर निर्यात बंद करण्याचे प्रयत्न करणार आहे. तर काही दिवसांपूर्वी दिल्लीमध्ये एक वर्षभर शेतकऱ्यांनी आंदोलन केले. दिल्लीच्या कडाक्याच्या थंडीत कडक उन्हाळ्यात शेतकरी रस्त्यावर बसले होते. मोदी सरकार आणि त्यांच्या मंत्र्यांनी त्या शेतकऱ्यांकडे डुंकूनसुद्धा पाहिले नाही. शेतकऱ्यांचा एवढा अपमान इतिहासात कोणत्याच सरकारनी केला नाही. तेव्हा अशा सरकारला सत्तेवर ठेवायचे की नाही याचा निर्धार तुम्हाला करायचा आहे असेही शरद पवार म्हणाले.
शरद पवार पूढे म्हणाले की, मिळालेली सत्ता सामान्यांसाठी वापरायची असते हे कोल्हापुरनं आपल्याला सांगितलं. शिवाजी महाराजांनी असं राज्य उभं केलं जे भोसल्यांचं राज्य नव्हतं तर ते रयतेचं राज्य होतं. दुसरे एक राजे या देशात होऊन गेले ज्यांनी आपली सत्ता घेऊन समाजाच्या बाजूनं राहिलं. त्यांनी चुकीच्या गोष्टींना पाठिंबा दिला नाही. ढोंगी लोकांना त्यांनी कधी संमती दिली नाही भोंदूहगिरीचा पुरस्कार शांहूंनी कधी केली नाही ते म्हणजे शाहू महाराज, अशा शब्दांत त्यांनी शाहू महाराजांचा दाखला देताना भाजपवर टीका केली.
भारतानं चांद्रयान-३ हे चंदाच्या दक्षिण ध्रुवावर यशस्वीरित्या लँड केलं आहे. भारतानं हा विश्वविक्रम रचल्यानं अनेक स्तरांतून भारतावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. एकीकडे आपण चंद्रावर पोहोचलो मात्र दुसरीकडे आपली जनता महागाईने त्रस्त आहे असं म्हणत त्यांनी मोदी सरकारवर टीका केली आहे. देशाकडे संपूर्ण जगाच्या नजरा लागल्या होत्या. आपलं चांद्रयान-३ यशस्वी लँडही झालं आपल्या देशातील तज्ज्ञांनी अशक्य ते शक्य करुन दाखवलं. ही कामगिरी करण्यात महत्त्वाचा वाटा कोणाचा आहे तर इस्रोची स्थापना करणाऱ्या पंडीत नेहरू यांची. तसंच, इंदिरा गांधी, एपीजे अब्दुल कलाम, अटलबिहारी वाजपेयी किंवा नरेंद्र मोदी असोत, या सगळ्यांच्या प्रयत्नाने आज ही इस्रो संघटना जगात महत्त्वाची ठरली आहे. इस्रोने आज हे चांद्रयान तयार केलं परंतु ते तयार करण्यासाठी विक्रम साराभाई, सतीश धवन अशी अनेक नाव सांगता येतील, ज्यांचं यात योगदान आहे आणि त्यामुळे भारतानं आज चंद्राला गवसणी घातली आहे असेही यावेळी शरद पवार यांनी स्पष्ट केले आहे
पुढे बोलताना शरद पवार म्हणाले की केंद्र सरकार सत्तेचा वापर हा विरोधी पक्षाच्या नेत्यांना त्रास कसा देता येईल यासाठी करण्यात येत आहे. महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना सांगण्यात आले आमच्या गटात या, आमच्या पक्षात या नाही तर तुमची जागा तुरुंगात असेल. त्यांनी आपली भूमिका सोडली नाही म्हणून १४ महिने त्यांना तुरुंगात टाकले. सामनाचे संपादक संजय राऊत यांनाही तुरुंगात टाकले. नवाब मलिक केंद्र सरकारच्या चुकीच्या कारभारावर टीका करत होते. त्यांनाही तुरुंगात टाकले. आता दोन महिन्यांसाठी त्यांना जामीन मिळाला आहे. त्यांना वाटले आम्ही घाबरून जाऊ. मलाही निवडणुकीच्या आधी ईडीची नोटीस आली. ते म्हणाले उद्या या मी म्हणालो आजच येतो. ज्या प्रकरणात मला ईडीची नोटीस आली ती एका बँक व्यवहारातून आली होती. त्या बँकेत माझं खातंही नव्हतं. तेव्हा आपली बाजू सत्याची असेल तर आपल्याला घाबरण्याचे कारण नाही. आजचं राजकारण कसं बदलतं आहे ते आपण पाहात आहोत. ईडीचा धाक दाखवला जात आहे. तो धाक दाखवल्यामुळे काहींनी भूमिका बदलली. कोल्हापुरात काही लोकांना ईडीची नोटीस आली. मला वाटलं की कोल्हापुरचे लोक स्वाभिमानी, शूर असतील पण तसं धाडस त्यांनी दाखवलं नाही. भगिनींनी म्हटलं की आम्हाला असा त्रास देण्यापेक्षा गोळ्या घाला. त्या भगिनींनी धाडस दाखवले पण घरातील प्रमुख घाबरले, असेही शरद पवार यांनी म्हटले आहे
कोल्हापूरकरांनी एकदा ठरवलं की, ते करूनच दाखवतात. खटक्यावर बोट अन् जागेवर पलटी. जे जे लोक आपला विचार सोडून पलीकडे गेले आहेत. ज्यांना या भूमीला महत्व द्यायचं नसेल तर मग कोल्हापूरकरांना माहिती आहे की त्यांचं काय करायचं अशा शब्दांत आमदार रोहित पवार यांनी बंडखोरांना धडा शिकविण्याचे आवाहन केले. कोल्हापूरच्या दसरा चौकात आज स्वाभिमान सभेचे आयोजन करण्यात आले होते. त्या सभेत आमदार रोहित पवार बोलत होते.
तुम्हाला शिवसेना चालते मग भाजप का नाही असा प्रश्न वारंवार विचारला जातो. यावर बोलताना जितेंद्र आव्हाडांनी शाहू महाराज आणि प्रबोधनकार ठाकरेंचा एक किस्सा सांगितला. ते म्हणाले शाहू महाराज बेडला खिळले होते. ते प्रबोधनकार ठाकरेंना कोदंड म्हणायचे. त्यांनी प्रबोधनकार ठाकरेंना बोलावून घेतले. त्यावेळी शाहू महाराजांनी त्यांच्याकडे प्रतापसिंहराजेंचा खरा इतिहास समोर आणण्यास सांगितले. त्यानुसार प्रबोधनकारांनीही तो इतिहास समोर आणला. यातून शिवसेनेचे हिंदुत्व मानवतावादी आहे, तर भाजपचे हिंदुत्व हिंसावादी आहे. त्यामुळे आम्हाला शिवसेना मान्य आहे असे राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी यावेळी सांगितले.
अनिल देसमुख बोलताना म्हणाले, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीतले आपले सहकारी आपल्याला सोडून भाजपाबरोबर गेले आणि त्यांच्या सरकारमध्ये सामील झाले आहेत. शरद पवारांच्या आशीर्वादाने मोठे झालेले हे लोक आता शरद पवारांना सोडून गेले आहेत. मुळात हे लोक का सोडून गेले? केवळ ईडीच्या धाकाने हे सगळे लोक पळून गेले. परंतु ईडीची भीती तर मलाही होती. ईडीचा धाक मलाही दाखवला होता. मला म्हणाले आमच्याशी तडजोड करा परंतु मी त्यांना म्हटलं आयुष्यभर तुरुंगात राहीन पण तुमच्याबरोबर सौदा करणार नाही.
छत्रपती शाहू महाराजांचा समतेचा विचार महाराष्ट्राने मान्य केला आहे मात्र अधून मधून त्याचं विसर होत आहे. आपला विचार काय आहे हे बघण्याची वेळ आली आहे. कोल्हापूर जिल्हा हा सदैव राष्ट्रवादी काँग्रेसच्या पाठीमागे म्हणजे शरद पवार साहेब यांच्या पाठीमागे खंबीरपणे सदैव उभा राहिलेला आपण पाहिला आहे सध्या नवीन मंत्री झालेल्यांना मी विचारलं होतं की तुमचा विचार कसा काय बदलला आणि कधी बदलला हे मला तुम्ही सांगा मात्र अधिवेशन झाले असताना देखील अद्यापही त्यांनी मला ते सांगण्याकरिता वेळ त्यांना मिळाला नाही आहे त्यामुळे आता हा जाब आपल्याला त्यांना विचारावा लागेल. कोल्हापूर जिल्हा महाराष्ट्रातील सर्वात पुरोगामी जिल्हा आहे आणि महाराष्ट्र म्हणजे भारतामध्ये सर्वात पुरोगामी राज्य आहे. जे कोल्हापूर मध्ये घडून ज्याची सुरुवात होते तेच संपूर्ण महाराष्ट्रात घडते आणि ते भारतात देखील घडतंय ते अलीकडच्या काळात दिसून येत नाही ते आता आपल्याला दुरुस्त करायचे आहे त्यासाठी शरद पवार साहेबांनी हा जो विचार आपल्यासमोर ठेवलेला आहे त्याच्या मागे आपण सर्वजण उभे राहण स्वाभिमानी नेता कसा काम करतो आणि अभिमानी नेता कसा वेगळा काम करतो यासाठी आज कोल्हापूर जिल्ह्याला आज फुले शाहू आंबेडकर यांचा विचार महत्त्वाचा ठरत आहे असे छत्रपती शाहू महाराज यांनी म्हटले आहे.
पुण्यातील लोकायात नावाची सामाजिक संस्था मधील कार्यकर्त्यांनी या देशाची लोकशाही टिकवावी याकरिता दोन लाखाचे पगार असलेल्या नोकऱ्यांवर पाणी फिरून जनजागृतीचे काम २०२४च्या लोकसभा निवडणुकीपर्यंत करत आहे. या संस्थेमध्ये आयआयटी पास झालेले आणि तीन लाख रुपये महिन्याला पगार घेणारे स्वप्नील आणि त्यांचे सगळे सहकारी आहेत. पण मागच्या वर्षभरापासून तर पुढच्या २०२४ पर्यंत दोन लाखाच्या नोकरीवर पाणी सोडून पुढची दोन वर्षांनी देशासाठी द्यायचे आहे. लोकशाही विरोधात काम करणाऱ्या त्या विरोधात आवाज उठवायचा म्हणून जनजागृती करत आहे या सर्वांनी स्वाभिमानी सभेमध्ये जनजागृती करण्यासाठी गाणे देखील गायले त्यानंतर पवार यांनी त्यांचे स्वागत देखील केले, असे देखील छत्रपती शाहू महाराज यांनी म्हटले आहे