
डबलिन : भारत (india) आणि आयर्लंड (ireland) यांच्यात रंगलेल्या पहिल्या टी-२० सामन्यात भारताने डकवर्थ लुईस नियमानुसार दोन धावांनी विजय मिळवला आहे. या विजयासह भारताने या मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे. भारताला या सामन्यात विजयासाठी १४० धावांचे आव्हान मिळाले होते. पावसामुळे खेळ जेव्हा थांबवण्यात आला तेव्हा टीम इंडियाने ६.५ ओव्हरमध्ये २ बाद ४७ धावा केल्या होत्या.
त्याआधी आयर्लंडने पहिल्यांदा फलंदाजी करताना कँफर आणि मकार्थी यांच्या शानदार फलंदाजीच्या जोरावर भारतासमोर १४० धावांचे आव्हान ठेवले होते. दोघांनी ७व्या विकेटसाठी ५७ धावांची भागीदारी केली. मकार्थीने शेवटच्या बॉलवर षटकार ठोकत अर्धशतक पूर्ण केले. भारताने या सामन्यात नाणेफेक जिंकत पहिल्यांदा गोलंदाजीचा निर्णय घेतला होता.
आयर्लंडचे सुरूवातीचे सहा विकेट पटापट गेले. त्यामुळे शंभरच्या आतच आयर्लंडचा डाव संपतो की काय असे वाटत होते. मात्र मकार्थी आणि कँफर यांनी केलेल्या शानदार भागीदारीमुळे आयर्लंडला १४० धावांचा टप्पा गाठता आला.
बुमराहने रचला इतिहास
बुमराहने आज आयर्लंडविरुद्ध मैदानात उतरताच इतिहास रचला. टी-२०चे नेतृत्व करणारा बुमराह पहिला गोलंदाज कर्णधार ठरला आहे. याआधी टी-२०चे नेतृत्व केवळ फलंदाज कर्णधारांनी केले आहे.