नागपुरात देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ध्वजारोहण
नागपूर : राज्याच्या विकासासाठी राज्य सरकार कटिबद्ध आहे. केंद्रात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राज्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात सर्वसामान्यांना दिलासा मिळत असून राज्याचा विकास चांगल्या पद्धतीने सुरू असल्याचे राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी सांगितले.
नागपुरात स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने फडणवीसांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी ते बोलत होते.
“प्रत्येक शेतकऱ्यांना एक रूपयामध्ये आपल्या सरकारने विमा दिला आणि अनेक शेतकऱ्यांनी या विम्याला प्रतिसाद दिला. महाराष्ट्रातील दीड कोटी शेतकऱ्यांनी यामध्ये सहभाग घेतला. सध्या पावसाचे प्रमाण कमी आहे पण मला अशी आशा आहे की पाऊस अजून येईल. शेतकऱ्यांच्या मदतीसाठी आम्ही नेहमीच प्रयत्नशील असतो.” असं ते म्हणाले.
शेतकऱ्यांना ज्या गोष्टी लागतात त्या आम्ही देतो, मागेल त्याला शेततळे, मागेल त्याला पेरणी यंत्र आणि अशा अनेक गोष्टी आम्ही मागेल त्या शेतकऱ्यांना देत आहोत. त्याचबरोबर नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजनेंतर्गतसुद्धा शेतकऱ्यांना फायदा होत आहे. या योजनेंचा लाभ सगळ्या शेतकऱ्यांपर्यंत पोहचून त्यांच्यामध्ये समृद्धी येईल.
शेतमालावर प्रक्रिया झाली पाहिजे, त्याला भाव मिळाला पाहिजे, त्याचबरोबर शेती व्यवसाय वाढीकडे सुद्धा आमचं लक्ष असल्याचं देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत.
पंतप्रधान आवास योजनेमार्फत आणि मोदी आवास योजनेमार्फत भटके, आदिवासी, ओबीसी समाजातील नागरिकांना घर देण्यात येणार आहे.गरिबांना घर देण्याची संधी यावर्षी आपल्याला मिळाली आहे. प्रत्येक गरिबांच्या डोक्यावर छत असेल तेव्हाच त्याला स्वातंत्र्याचा खरा अर्थ कळेल. पंतप्रधान मोदी आणि मुख्यमंत्री शिंदेंच्या नेतृत्वामध्ये हे काम चांगल्या पद्धतीने होईल असं म्हणत त्यांनी नागरिकांना स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.