
उबाठा गट व काँग्रेस एकत्र निवडणूक लढवणार
मुंबई : राज्याचे राजकारण (Maharashtra Politics) पाहता कोणतीही शक्यता वर्तवणं कठीण झालं आहे. कधी कोण कुठल्या पक्षाची बाजू घेईल, हे सांगता येत नाही. अनेक उलथापालथी होत असतानाच आता महाविकास आघाडीत (Mahavikas Aghadi) बिघाडी झाल्याची एक खबर समोर आली आहे. आगामी निवडणुकीत मविआमधील उबाठा गट (Thackeray gat) व काँग्रेस (Congress) एकत्र निवडणूक लढवणार असल्याचे ठरले आहे. यांतून शरद पवारांच्या राष्ट्रवादीला (Sharad Pawar NCP) मात्र वगळण्याची चिन्हे आहेत.
नुकतीच राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) आणि शरद पवार यांची भेट झाली. ही गुप्तपणे झालेली भेट असली तरी माध्यमांनी ती समोर आणल्याने त्यावर अनेक चर्चा सुरु झाल्या. राष्ट्रवादीत सारं काही आलबेल असल्याचे दावे त्यांचे नेते करतात मात्र ही सरळ सरळ फूट असल्याचे सातत्याने दिसून येते. पण आता मात्र काका-पुतण्यांच्या भेटींमुळे संभ्रम निर्माण होत आहेत. याच कारणाने कदाचित उबाठा आणि काँग्रेस शरद पवारांशिवायच निवडणूक लढवण्यासाठी तयारी सुरु केल्याची चर्चा आहे.
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि उद्धव ठाकरे यांच्यात नुकतीच एकांतात चर्चा झाली. त्यामुळे राज्यातील महाविकास आघाडीमधून शरद पवार आणि त्यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला डच्चू देण्याची तयारी काँग्रेस आणि उद्धव ठाकरे गटाने केली असल्याचे स्पष्ट होत आहे. ऐनवेळी राष्ट्रवादीने दगा दिल्यास महाविकास आघाडी कोलमडून पडेल. त्यामुळे आतापासूनच दोन्ही गटांनी आपला प्लॅन बी तयार ठेवला आहे. यावर शरद पवारांची नेमकी भूमिका काय, हे मात्र कळू शकलेले नाही.