
मुंबई: हरमनप्रीत सिंहच्या(harmanpreet singh) नेतृत्वात भारतीय पुरुष संघाने(indian mens team) आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफीच्या(asian champion trophy) सेमीफायनलमध्ये जपानला(japan) 5-0 अशी मात देत फायनलमध्ये एंट्री घेतली आहे. भारतीय संघ पूर्णपणे जपान संघावर भारी पडला. भारताला(india) फायनलमध्ये मलेशियासोबत(malaysia) लढावे लागेल. मलेशियाने त्यांच्या सेमीफायनलमध्ये दक्षिण कोरियाचा 6-2 असा पराभव केला होता. भारताकडून आकाशदीप सिंह(18), हरमनप्रीत सिंह(23), मनदीप सिंह(30), सुमित (39), शमशेर सिंह(51) यांनी गोल केले. जपानच्या संघाला एकही गोल करण्याची संधी संपूर्ण सामन्यादरम्यान मिळाली नाही.
पहिल्या क्वार्टरमध्ये दोन्ही संघांमध्ये काँटे की टक्कर पाहायला मिळाली. कोणत्याच संघाला यात गोल करता आला नाही. दुसऱ्या क्वार्टरमधील चौथ्या मिनिटाला आकाशदीपने पहिला गोल करत संघाचे खाते खोलले. यानंतर कर्णधार हरमनप्रीतने पेनल्टी कॉर्नरचे गोलमध्ये रूपांतर केले आणि भारताला 2-0 अशी आघाडी मिळवून दिली. तिसरा फिल्ड गोल भारताच्या मनदीप सिंहने केला. मनदीपने हरमनप्रीतच्या शॉटला शानदार पद्धतीने गोलमध्ये रूपांतरित करीत भारताला हाफ टाईमपर्यंत 3-0 अशी आघाडी मिळवून दिली.
हरमनप्रीत पुन्हा विजयाचा हिरो
भारतीय संघाने सेकंड हाफच्या सुरूवातीला 3-0 अशी आघाडी घेतली होती. भारतासाठी चौथा गोल सुमितने तिसऱ्या क्वार्टरमध्ये केला. तीन क्वार्टरच्या खेळानंतर भारताने 4-0 अशी आघाडी घेत आपला विजय निश्चित केला होता. चौथ्या क्वार्टरच्या सुरूवातीला शमशेर सिंगने हरमनप्रीतच्या शानदार पासला जपानच्या गोल पोस्टमध्ये धाडत ही आघाडी आणखीनच मजबूत केली. हा स्कोर भारताचा अंतिम स्कोर ठरला.